‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून
गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य;
-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
· भौतिक सुविधा आणि संस्कारांवरही भर
मुंबई, दि. 7 : राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्याचबरोबर शाळांमधून भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची जपणूक यासाठी ‘चला शाळेत जाऊया’ हे व्यापक अभियान लोकचळवळीच्या स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. या अभियानाच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी सर्व शाळांना 8 आणि 9 सप्टेंबर, 22 आणि 23 सप्टेंबर तसेच 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी भेट देणार आहेत. यासाठी अधिकाऱ्यांना जिल्ह्यांचे पालकत्व नेमून देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
शालेय शिक्षण क्षेत्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर मंत्री भुसे यांनी माध्यम प्रतिनिधींसमवेत संवाद साधताना अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. या बैठकीस आमदार विक्रम काळे, किरण सरनाईक, जयंत आसगावकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, महेंद्र दळवी, विभागाचे प्रधान सचिव रंजीत सिंह देओल, आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत संघटनांच्या प्रतिनिधींनी शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रश्न, मागण्या आणि सूचना मांडल्या.