राज्यपालांच्या उपस्थितीत ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियानाला सुरुवात
मुंबईला टीबीमुक्त करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक
– राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई, दि. 26 :'टीबी मुक्त भारत अभियान' मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या अभियानाचा शुभारंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सायन येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे आज करण्यात आला. राज्यपालाच्या हस्ते राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सहभागी स्वयंसेवी संस्थांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
लोकभवनच्या पुढाकाराने आयोजित 'टीबी मुक्त मुंबई' मोहिमेच्या उद्घाटनाला मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, आमदार डॉ. ज्योती गायकवाड, आमदार सुनील शिंदे, महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे, शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवाडकर, मार्केट व गार्डन समितीचे उपाध्यक्ष भास्कर शेट्टी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, डॉक्टर्स, आशा सेविका आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी 'टीबी मुक्त मुंबई' च्या अभियानावर आधारित माहिती पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसराची लोकसंख्या जवळपास दोन कोटींच्या घरात पोहोचली आहे. दाट लोकवस्तीमुळे टीबीसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे लोकभवनच्या पुढाकाराने ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान सुरु करण्यात आले असून अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.