एआय-आधारित विकासासाठी सर्वन एआय सोबत भागीदारी
महाराष्ट्र शासन आणि सर्वन एआय यांच्यात सामंजस्याच्या पत्राचे (Letter of Intent) आदानप्रदान झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डॉ. प्रत्युष कुमार यांनी या कार्यक्रमास अध्यक्षस्थान भूषवले. महाराष्ट्रात प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी, व्यापक सार्वभौम कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत सुविधा उभारणे हा या सहकार्याचा उद्देश आहे.
या भागीदारीतून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आणि प्रत्यक्ष वापरासाठी सक्षम अशी सार्वभौम कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत रचना उभारण्यावर भर देण्यात येईल. शिक्षण, आरोग्य, कृषी, कल्याणकारी योजना तसेच सार्वजनिक प्रशासन या क्षेत्रांमध्ये एआयचा प्रभावी वापर होण्यासाठी भक्कम पायाभरणी केली जाणार आहे. यासोबतच संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासाला गती देण्यासह उदयोन्मुख एआय क्षेत्रांमध्ये मनुष्यबळ सक्षम करण्यासाठी कौशल्य विकास व प्रशिक्षण कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले जाईल. येत्या काळात 20 मेगावॅट क्षमतेची आणि भविष्यात 50 मेगावॅटपर्यंत विस्तारता येईल अशी एआय-सुसंगत संगणकीय क्षमता उभारण्याचे लक्ष आहे. ही भागीदारी महाराष्ट्राच्या डिजिटल सार्वभौमत्वाला बळकटी देणारी असून, एआय-आधारित विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या प्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार, सर्वन एआय चे संस्थापक डॉ. प्रत्युष कुमार उपस्थित होते.