मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनविण्यात यूडब्ल्यूए महत्वपूर्ण भूमिका बजावेल
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन
मुंबई, दि. १८ - मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (यूडब्ल्यूए) इंडिया, मुंबई कॅम्पसच्या उद्घाटनामुळे नवे बळ मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या संस्था, पायाभूत सुविधा आणि प्रतिभावान मनुष्यबळ यांच्या माध्यमातून भविष्यातील उद्योग व संशोधन परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यूडब्ल्यूए इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन झाले. यावेळी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर रॉजर कूक, यूडब्ल्यूएच्या चॅन्सलर डॉ. डायन स्मिथ-गँडर, कुलगुरू प्रा. अमित चकमा, विद्यापीठाचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, यूडब्ल्यूएसारख्या ऑस्ट्रेलियातील अग्रगण्य संशोधनाधिष्ठित विद्यापीठाने भारतातील आपला पहिला कॅम्पस मुंबईत स्थापन करण्याचा निर्णय घेतला, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ‘ग्रुप ऑफ एट’मधील भारतात कॅम्पस सुरू करणारे यूडब्ल्यूए हे पहिले विद्यापीठ ठरले आहे. हा निर्णय आजच्या मुंबईची क्षमता आणि जागतिक स्तरावरील तिच्या वाढत्या महत्वाची साक्ष देणारा आहे. मुंबई ही देशाची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजनाची राजधानी असली तरी पुढील पिढीसाठी ती जागतिक ज्ञान आणि नवोपक्रम केंद्र बनविण्याचे राज्य शासनाचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यासाठी मुंबईलगत विकसित होत असलेल्या ‘मुंबई 3.0’ प्रकल्पात एज्युकेशन सिटी, मेडी-सिटी, इनोव्हेशन सिटी, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर इकोसिस्टम तसेच संशोधन व उद्योगविकासाची नवी केंद्रे उभारली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.