Saturday, 5 September 2026

मुक्त व्यापार करारामुळे सर्व क्षेत्रांना संधी

 मुक्त व्यापार करारामुळे सर्व क्षेत्रांना संधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारामुळे भारत आणि युरोपातील सुमारे दोन अब्ज लोकसंख्या, जागतिक व्यापाराचा मोठा हिस्सा आणि विशाल बाजारपेठ परस्परांशी जोडली जाणार आहे. हा करार शेतकरी, मच्छीमार, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्टअप, महिला उद्योजक, उत्पादक आणि सेवा क्षेत्रासाठी व्यापक संधी निर्माण करणारा आहे. दोन्ही बाजूंच्या संवेदनशील क्षेत्रांचे हित जपत हा परस्पर लाभाचा करार करण्यात आला आहे.

 

युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे सागरी बंदर असलेले अँटवर्प-ब्रुज भारतीय निर्यातदारांसाठी युरोपच्या औद्योगिक आणि ग्राहक बाजारपेठेचे महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरेल. बंदराची जलमार्ग, रेल्वे आणि रस्ते वाहतूक व्यवस्था भारतीय उद्योगांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे गोयल यांनी सांगितले.

 

हिरे व दागिने, सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन व बंदरे, संरक्षण व प्रगत उत्पादन तसेच कृषी व अन्नप्रक्रिया या क्षेत्रांमध्ये भारत आणि बेल्जियमच्या क्षमता परस्परपूरक आहेत. बेल्जियमचे तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि भांडवल यांना भारताचे कौशल्य, प्रतिभा, युवा लोकसंख्या आणि मोठी बाजारपेठ यांची जोड मिळाल्यास ही भागीदारी जागतिक स्तरावर यशस्वी होईल. कौशल्य विकास, शैक्षणिक पात्रतेची परस्पर मान्यता, संयुक्त पदवी अभ्यासक्रम आणि मनुष्यबळ गतिशीलतेवरही दोन्ही देशांनी भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.

 

यावेळी बेल्जियमचे मुंबईतील महावाणिज्यदूत फ्रॅंक ग्रीकेन्स, अँटवर्प-ब्रुज बंदराचे ग्लोबल पार्टनरशिप डायरेक्टर टॉम मोनबॉलिऊ, मुख्य ग्राहक संपर्क अधिकारी विलियम डेमोर, फ्लँडर्स इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीएट डेमुंटर यांच्यासह भारत आणि बेल्जियममधील उद्योग, व्यापार, बंदर, गुंतवणूक आणि शासकीय संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि स्कूल बॅग पॉलिसीनुसार, इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात १० दिवसांचा दप्तरविरहित कालावधी

   राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि स्कूल बॅग पॉलिसीनुसार, इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात १० दिवसांचा दप्तरविरहित कालावधी आयोजित करण्यात यावा. या कालावधीत स्थानिक कारागीर व व्यावसायिकांच्या मार्गदर्शनाखाली सुतारकाम, बागकाम, मातीची भांडी बनविणे, हस्तकला, कृषीविषयक व स्थानिक व्यवसायांची ओळख यांसारखे प्रत्यक्ष अनुभवाधारित उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच वर्षभरात क्रीडा, बौद्धिक खेळ, वाचन, कथाकथन, पर्यावरण संवर्धन आणि क्षेत्रभेटी अशा कृतीप्रधान दिवसांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

           शाळांनी विद्यार्थ्यांच्या व दप्तराच्या वजनाची नियमित तपासणी करून त्याची नोंदवहीत नोंद ठेवावी आणि वजन निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यास तत्काळ सुधारणा करावी. पालक सभांमधूनही पालकांना दप्तरात अनावश्यक वस्तू न ठेवण्याबाबत मार्गदर्शन करावे. या संपूर्ण धोरणाची अंमलबजावणी करण्याची प्राथमिक जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची असेल. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांनी शाळांना अचानक भेट देऊन दप्तराचे वजन, दप्तर वेळापत्रक व पिण्याच्या पाण्याची तपासणी करावी आणि शाळानिहाय अनुपालन अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करावा, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

शालेय दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘स्कूल बॅग पॉलिसी २०२०’ ची काटेकोर अंमलबजावणी करा

 शालेय दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी

स्कूल बॅग पॉलिसी २०२०ची काटेकोर अंमलबजावणी करा

प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे निर्देश

 

           मुंबई, दि. ४ : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करून शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी, सुलभ व कृतीप्रधान करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्कूल बॅग पॉलिसी-२०२०ची सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन त्यांच्या शारीरिक वजनाच्या साधारणतः १० टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, याची काटेकोर दक्षता शाळांनी घ्यावी, असे शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

           जास्त वजनाच्या दप्तरामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीचा कणा, खांदे व शारीरिक वाढीवर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या धोरणानुसार, पूर्व-प्राथमिक वर्गातील लहान मुलांना शक्यतो शाळेत दप्तर आणण्याची आवश्यकता भासणार नाही, या दृष्टीने शाळांनी नियोजन करावे. मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दररोज अनावश्यक पाठ्यपुस्तके, वह्या किंवा इतर शैक्षणिक साहित्य आणण्यास सांगू नये, तसेच त्या दिवसासाठी आवश्यक असलेलीच पुस्तके आणली जावीत यासाठी वर्गनिहाय 'दप्तर वेळापत्रक' तयार करावे. याशिवाय, विद्यार्थ्यांनी दररोज सर्व पुस्तके घरी नेण्याची आवश्यकता भासू नये म्हणून शाळांनी वर्गखोल्यांमध्ये कपाटे, शेल्फ किंवा लॉकरची सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. घरातून जड पाण्याची बाटली वाहून आणावी लागू नये यासाठी शाळांनी स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 

बंदर आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील भागीदारीला प्राधान्य

 बंदर आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील भागीदारीला प्राधान्य

महाराष्ट्रात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण असून वाढवण येथे देशातील महत्त्वाचे खोल समुद्री बंदर विकसित होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई महानगर प्रदेशातील बहुपर्यायी दळणवळण प्रकल्पांमुळे महाराष्ट्र जागतिक लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून पुढे येत आहे. अँटवर्प-ब्रुज बंदर आणि महाराष्ट्रातील बंदर परिसंस्थेदरम्यान तंत्रज्ञान, डिजिटलायझेशन, हरित नौवहन, हायड्रोजन, लॉजिस्टिक्स आणि कौशल्य विकास क्षेत्रांत भागीदारी वाढविण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले.

 

अँटवर्प हे जगातील प्रमुख हिरे व्यापार केंद्र असून मुंबईतील भारत डायमंड बोर्स हे भारताच्या हिरे व्यापाराचे केंद्र आहे. हिरे व्यापाराबरोबरच वित्त, बंदरे, लॉजिस्टिक्स, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वत विकास क्षेत्रांतही मुंबई-अँटवर्प आर्थिक भागीदारी विकसित करता येईल. यासाठी दोन्ही देशांतील शासन, बंदर प्राधिकरणे, वाणिज्य मंडळे आणि उद्योगांच्या सहभागातून औपचारिक व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला.

 

मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसचा शुभारंभगणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठी भेट

 मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या २०३० पर्यंत ३,५०० पर्यंत वाढविणार


– केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

· मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसचा शुभारंभ

· गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठी भेट

मुंबई, दि. ३ : मुंबईतील विद्यमान रेल्वे व्यवस्था विश्वासार्ह असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तिचे उन्नयन करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढविण्यासाठी सुमारे १८ हजार कोटी रुपयांची विविध कामे सुरू आहेत. सध्या दररोज धावणाऱ्या सुमारे ३ हजार २०० लोकल फेऱ्या आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणातून २०३० पर्यंत ३ हजार ५०० पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ वर आयोजित मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या शुभारंभ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एक्स्प्रेस रवाना करण्यात आली. कार्यक्रमास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, महापौर रितू तावडे यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.


 

शिबिरात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी

 शिबिरात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी


या शिबिरात विविध वैद्यकीय विभागांमार्फत पत्रकारांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी करण्यात आली. न्यूरोलॉजिस्ट तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गीते, जे.जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, पुणे बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार,ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्यासाहेब लहाने,पोटविकार तज्ज्ञ डॉ. अमित मायदेव, लठ्ठपणा निवारण तज्ज्ञ डॉ. जयश्री तोडकर, यकृत प्रत्यारोपण व पोटविकार तज्ज्ञ डॉ. विभा वर्मा हृदयरोगतज्ज्ञ डॉ. कल्याण मुंडे, जनरल मेडिसिन डॉ. मधुकर गायकवाड, यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी पत्रकारांशी संवाद साधत आरोग्यविषयक तपासणी करीत मार्गदर्शन केले.

शिबिरामध्ये प्राथमिक तपासणी, नेत्ररोग, त्वचारोग, हृदयरोग, स्त्रीरोग, फिजिओथेरपी, जनरल मेडिसिन, अस्थिरोग, कर्करोग, रक्त तपासणी, श्वसनविकार, पोट व पचनसंस्थेचे विकार, कान-नाक-घसा, मानसिक आरोग्य, औषध वितरण, वजन नियंत्रण, आयव्हीएफ व वंध्यत्व उपचार, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग तपासणी आदी विविध वैद्यकीय विभागांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच दंतचिकित्सा, कर्करोग व नेत्ररोग तपासणीसाठीही स्वतंत्र सुविधा ठेवण्यात आली होती.


 


विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी शिबिरातील विविध विभागांना भेट देऊन डॉक्टर, वैद्यकीय पथक आणि पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आरोग्य सुविधांची त्यांनी पाहणी केली.


 


शिबिरामध्ये जे.जे. रुग्णालय, जी. टी. रूग्णालय, सेंट जॉर्ज, कामा रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय, आर. ए. पोदार, के. जी. मित्तल, मुंबादेवी रूग्णालय, कुपर रुग्णालय, नायर, बॉम्बे हॉस्पिटल, हिंदूजा हॉस्पिटल, रिलाईन्स रुग्णालय आणि सेफी रुग्णालयासह मनपा रूग्णालयातील विविध आजारांचे सुमारे ६०० तज्ज्ञ डॉक्टर आणि इतर सहायक सहभागी झाले होते. सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत सुमारे ८९२ पत्रकार आणि इतरांची तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले. शिवाय काही पत्रकारांना शासकीय रूग्णालयात संदर्भित करण्यात आले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब, टेलिव्हीजन जर्नालिस्ट असोसिएशन (टिव्हीजेए, मुंबई हिंदी पत्रकार संघ, मुंबई क्राईम रिपोर्टस असोसिएशन, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, बॉम्बे न्युज फोटोग्राफर असोसिएशन, बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ, व्हॉइस ऑफ मिडिया, पत्रकार विकास संघांचे पदाधिकारी उपस्थित होते

पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाच्या मदत व समन्वयासाठी नोडल अधिकारी

 पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाच्या मदत व समन्वयासाठी नोडल अधिकारी

पत्रकारांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व संघटनांचे अभिनंदन केले. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आजारपणाच्या प्रसंगी आवश्यक ती मदत व समन्वय उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. संबंधित अधिकारी पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक उपचार, शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय समन्वयासाठी मदत करणार आहे. हे आरोग्य तपासणी शिबीर मर्यादित न राहता वर्षभर सातत्याने पत्रकारांना आरोग्यविषयक आवश्यक मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या पुढाकाराने पत्रकारांना एकाच ठिकाणी विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन मिळाले. मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा उपक्रम पत्रकारांच्या आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरल्याची प्रतिक्रिया पत्रकारांनी व्यक्त केली.

Featured post

Lakshvedhi