Monday, 21 September 2026

उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी

 देशातील सर्वात मोठी सोलर इकोसिस्टीम नागपूरात

उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांचा उद्योजकांसोबत संवाद

 

नागपूर दि. २0 : देशातील सर्वात मोठी सोलर मॉडेल इकोसिस्टीम नागपूर येथे आकार घेत आहे. येत्या दहा वर्षात नागपूर हे सोलर इकोसिस्टीमचे हब होणार आहे, त्यामुळे उद्योजकांनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

 अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील अवादा समूहाला  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली तसेच सोलर मॉडेल निर्मितीची  पहाणी केली, त्यानंतर उद्योजकांशी संवाद साधला.

 अवादा उद्योग समूहाचे संस्थापक व अध्यक्ष विनीत मित्तल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली, यावेळी  राज्यातील पायाभूत सुविधा औद्योगिक विकास आणि मुंबईच्या भविष्यातील बदलांवर उद्योजकांसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद साधला.

 नवीन नागपूरच्या प्रकल्पाविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, येथे स्मार्ट इंडस्ट्रीसाठी इकोसिस्टीम तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी पन्नास टक्के पेक्षा जागा अधिकृत झाली असून गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळत आहे. देशातील पहिले सोलर मॉडेल अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रात तयार होत असून अवादा समूहाला त्यांच्या प्रकल्पाच्या विस्तारासाठी  २५० एकर जागेची आवश्यकता असून ती देण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केली. अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रात उद्योगांसाठी अधिगृहीत केलेल जमीन संपली असून  तिसरी अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक वसाहत तयार करावयाची आहे, तसेच वर्धा जिल्ह्यातील नवीन औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन सुरू असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

 अवादा हा सोलर मॉडल बनवणारा सर्वात मोठा सुपर उद्योग असून, डव्हान्स इंटिग्रेशनमुळे स्मार्ट मॉड्युलची निर्मिती होत आहे.  भूमिपूजनानंतर वेगाने प्रकल्प पूर्ण झाला असून  आज पाच हजार कामगार येथे काम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

      

गौरी गणपती चे सणाला, राकेश शेलार, लक्षवेधी पत्रकार दापोली


 

गणपती महोत्सव लोकसंगीत, निखील भगत, मुरुड


 

Sunday, 20 September 2026

समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या मागास भागात विकासाला आवश्यक असलेल्या सुविधा निर्माण होत असून

 समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या मागास भागात विकासाला आवश्यक असलेल्या सुविधा निर्माण होत असून जेएनपीटी बंदरासोबतच वाढवण पोर्ट बंदर हे जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये समाविष्ट होणार आहे, येथून डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरद्वारे गडचिरोली पर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. यामुळे लॉजिस्टिक खर्च ६० टक्के पेक्षा कमी होईल आणि राज्याच्या विकासाला मोठी संधी उपलब्ध होणार आहे. वाढवण बंदर येत्या तीन वर्षात पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करताना वाढवण हे ग्रीन पोर्ट असून सर्वात सक्षम राहणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

भरती परीक्षा सुधारणांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये टास्क फोर्सचा संवाद

 भरती परीक्षा सुधारणांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये टास्क फोर्सचा संवाद

            मुंबई, दि. 20 : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत करण्यात आलेला उच्चस्तरीय टास्क फोर्स उद्या सोमवार, 21 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संबंधित घटकांशी संवाद साधणार आहे.

            परीक्षा प्रक्रियेतील अडचणी, सूचना आणि अभिप्राय जाणून घेऊन त्याआधारे आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी करण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातील संवाद कार्यक्रम स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. भरती परीक्षांशी संबंधित उमेदवार, संस्था तसेच इतर संबंधित घटकांना आपल्या सूचना व अभिप्राय टास्क फोर्सकडे csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठविता येणार आहेत.

            टास्क फोर्सने यापूर्वी 12 सप्टेंबर रोजी पुणे, 16 सप्टेंबर रोजी नागपूर आणि 17 सप्टेंबर रोजी अमरावती येथे संबंधित घटकांशी संवाद साधला आहे. या विभागांमधून प्राप्त झालेल्या सूचना व अभिप्रायांचा अभ्यास करून भरती परीक्षा प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक बाबींचा विचार केला जाणार आहे.

            याशिवाय कोकण विभागात  29 सप्टेंबर रोजी चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई, तर नाशिक विभागात 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे संवाद आयोजित करण्यात आला आहे. कोकण विभागासाठी konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in, तर नाशिक विभागासाठी nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर अभिप्राय देता येई.

            विभागनिहाय संवादातून प्राप्त सूचनांच्या आधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे आणि परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी टास्क फोर्स शासनास शिफारशी सादर करणार आहे.
                                                                        ०००


अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात ऑनलाईन बुकिंगपासून दर्जेदार आतिथ्य व्यवस्थेपर्यंत प्रवाशांना आधुनिक सुविधा

 अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात

ऑनलाईन बुकिंगपासून दर्जेदार आतिथ्य व्यवस्थेपर्यंत प्रवाशांना आधुनिक सुविधा

-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

            मुंबई, दि. २० : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वसामान्यांची विश्वासार्ह लोकवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने आता लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासाच्या क्षेत्रातही नवी झेप घेण्याची तयारी केली आहे. खासगी आराम बससेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी लवकरच महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल करण्यात येणार आहेत. यामध्ये सुरक्षितता, आरामदायीपणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार प्रवासी सेवेचा संगम या नव्या सेवेत पाहायला मिळणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच एसटी महामंडळाच्या टप्प्यामध्ये व्होल्वो बसेस समाविष्ट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

            मंत्री सरनाईक म्हणाले की, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सध्या अनेक प्रवासी अधिक भाडे देऊन खासगी आराम बससेवेला पसंती देतात. वातानुकूलित सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था, कमी प्रवास वेळ आणि रात्रीच्या प्रवासातील सुविधा यामुळे खासगी आराम बससेवेचा स्वतंत्र प्रवासी वर्ग निर्माण झाला आहे. या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी केवळ पर्याय उपलब्ध करून न देता खासगी आराम बससेवेच्या तोडीची आधुनिक, विश्वासार्ह आणि प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करणारी सेवा देण्याचे उद्दिष्ट एसटीने निश्चित केले आहे.

दिवसा आरामदायी प्रवास, रात्री शयनयानाची सुविधा

            २५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या किमान पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी आरामदायी ४५ आसनी बसेस, तर रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ३० किंवा ४५ शयनयान क्षमतेच्या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्रीच्या प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

मोबाईलवरून तिकीट बुकिंग; खासगी ॲपवरही आरक्षणाची सुविधा

            नव्या आराम बससेवेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना डिजिटल पद्धतीने सहज आरक्षण करता येणार आहे. एसटीच्या अधिकृत ऑनलाईन आरक्षण व्यवस्थेबरोबरच खासगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही या बसेसचे तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा मानस आहे. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावर येऊन तिकीट काढण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाईलवरून बसची वेळ, मार्ग आणि उपलब्ध आसनांची माहिती घेऊन घरबसल्या आरक्षण करता येणार आहे. डिजिटल तिकीट प्रणालीमुळे एसटीची आराम बससेवा आधुनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेशी अधिक प्रभावीपणे जोडली जाणार आहे.

खासगी संस्थेकडून आतिथ्य व्यवस्थापन

            प्रवाशांना केवळ आरामदायी बसच नव्हे, तर हाय-एंड प्रवासी सेवांचा अनुभव मिळावा, यासाठी नव्या व्होल्वो बसेसमधील आतिथ्य व्यवस्थापनासाठी खासगी संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. प्रवाशांचे स्वागत, बसमधील मूलभूत सुविधा, स्वच्छता, प्रवाशांना आवश्यक माहिती आणि सेवा-सुविधांचे व्यवस्थापन यामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर केला जाणार आहे. यामुळे एसटीच्या पारंपरिक प्रवासी सेवेबरोबरच हॉस्पिटॅलिटी आणि ग्राहकसेवेच्या आधुनिक संकल्पनेचा समावेश होणार असून, प्रवाशांना अधिक सुखकर आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 

 

मागणी असलेल्या मार्गांचा सर्वंकष अभ्यास

            महाराष्ट्रातील तसेच आंतरराज्य मार्गांवर खासगी आराम बससेवेला मोठी मागणी असलेल्या मार्गांचा सर्वंकष अभ्यास करण्यात येणार आहे. प्रवाशांची संख्या, प्रवासाची मागणी, उपलब्ध सेवा, मार्गाचे अंतर, प्रवासाचा कालावधी आणि आर्थिक व्यवहार्यता यांचा विचार करून स्पर्धात्मक मार्गांचे सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतर नव्या व्होल्वो आणि शयनयान बसेससाठी मार्ग निश्चित करण्यात येतील.

लालपरीचा आरामदायी प्रवासाचा नवा अध्याय

            ‘प्रवाशांच्या सेवेसाठीहे घोषवाक्य अधिक व्यापक आणि आधुनिक स्वरूपात प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. एसटी महामंडळाची ताकद म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यातील विस्तृत जाळे आणि प्रवाशांचा असलेला विश्वास. या विश्वासाला आधुनिक सुविधा, डिजिटल आरक्षण व्यवस्था आणि दर्जेदार आतिथ्यसेवेची जोड देऊन लांब पल्ल्याच्या प्रवासी सेवेत नवे मानदंड निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

            नव्या व्होल्वो बसेसमुळे एसटीच्या सेवेला आधुनिकतेची जोड मिळणार असून, आरामदायी, सुरक्षित, विश्वासार्ह आणि डिजिटल सुविधा असलेला प्रवास प्रवाशांसमोर उपलब्ध होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार सुविधा आणि एसटीवरील विश्वास यांच्या बळावर लांब पल्ल्याच्या प्रवासी सेवेत लालपरीआता नव्या दमाने, नव्या रूपात आणि नव्या अनुभवासह सज्ज होत आहे.

000


ओबीसींच्या योजनांची माहिती,एकाच दिवशी 800 रोजगार मेळावे

 लोकसंवादअभियानातून गणेशोत्सवात शासकीय योजनांचा जागर

चिंचपोकळी, लालबाग, भायखळ्यातील गणेश मंडळांतील नागरिकांशी थेट संवाद

 

मुंबई, दि. 19 : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात शासकीय योजनांची माहिती थेट गणेशभक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या लोकसंवादअभियानाला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या माध्यमातून चिंचपोकळी, लालबाग आणि भायखळा परिसरातील विविध गणेश मंडळांमध्ये नागरिकांशी संवाद साधून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक जनजागृती उपक्रमांची माहिती देण्यात आली.

शुक्रवारी आयोजित या उपक्रमात इतर मागास बहुजन कल्याण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग, तसेच नशामुक्त महाराष्ट्र आणि नशामुक्त मुंबई अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती गणेशभक्तांना देण्यात आली.

ओबीसींच्या योजनांची माहिती

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ओबीसी समाज घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती ओबीसी कल्याण विभागाचे मुंबई शहरचे सहायक संचालक रविकिरण नाईक आणि विभागीय माहिती अधिकारी धोंडिराम अर्जुन यांनी दिली. नागरिकांना योजनांची माहिती मिळावी आणि पात्र लाभार्थ्यांना त्यांचा लाभ घेता यावा, या उद्देशाने मार्गदर्शन करण्यात आले.

एकाच दिवशी 800 रोजगार मेळावे

तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत 29 सप्टेंबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात 800 रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. पंडित दीनदयाळ रोजगार महाकुंभ महाराष्ट्र रोजगार मेळाव्यांची माहिती लोकसंवाद अभियानाच्या माध्यमातून विभागीय संपर्क अधिकारी काशिबाई थोरात यांनी गणेशभक्तांना दिली. मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या 10 ठिकाणच्या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होऊन उपलब्ध रोजगार संधींचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यासोबतच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली.

Featured post

Lakshvedhi