Monday, 7 September 2026

बाल हक्क संवर्धनासाठी ‘बालस्नेही पंचायत’ व ‘बालस्नेही प्रभाग’ विशेष उपक्रम ५ सप्टेंबर ते २० नोव्हेंबर २०२६ कालावधीत राज्यभर व्यापक जनजागृती

 बाल हक्क संवर्धनासाठी बालस्नेही पंचायतबालस्नेही प्रभागविशेष उपक्रम

५ सप्टेंबर ते २० नोव्हेंबर २०२६ कालावधीत राज्यभर व्यापक जनजागृती

 

            मुंबई, दि. ५ : बालकांचे हक्क, संरक्षण, सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य, पोषण आणि सहभाग याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या पुढाकाराने राज्यात ५ सप्टेंबर ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत बालस्नेही पंचायतबालस्नेही प्रभागहा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.

            महिला व बाल विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, UNICEF आणि यशदा (YASHADA) यांच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींमध्ये बालस्नेही पंचायत, तर शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बालस्नेही प्रभाग या संकल्पनेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

            उपक्रमाचा प्रमुख उद्देश बालकांना केवळ योजनांचे लाभार्थी न मानता त्यांच्या जीवनाशी संबंधित प्रश्नांवर आपले विचार, मते, कल्पना आणि सूचना मांडण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. बालकांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियोजन व निर्णयप्रक्रियेत अर्थपूर्ण सहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

            बाल हक्कांबाबत जागरूकता निर्माण करणे, मुलांना त्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या समस्या ओळखण्यास सक्षम करणे आणि ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियोजन प्रक्रियेत बालसहभागाला संस्थात्मक स्वरूप देणे, ही या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

ग्रामपंचायत व प्रभाग स्तरावर विविध उपक्रमांतर्गत बालस्नेही पंचायत व बालस्नेही प्रभाग प्रतिज्ञा, बालस्नेही ठराव, ग्रामपंचायत विकास आराखड्यात (GPDP) बालकेंद्रित विकासाच्या बाबींचा समावेश, बालसभा तसेच बाल हक्क व बाल संरक्षणाबाबत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

यासोबतच ग्रामस्तरीय बालकल्याण व संरक्षण समिती तसेच प्रभागस्तरीय बालकल्याण व संरक्षण समित्या सक्रिय करण्यावरही भर देण्यात येणार आहे.

बालस्नेही महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल बालस्नेही पंचायत संकल्पनेअंतर्गत बालकांच्या गरजा व प्राधान्यक्रम विकास आराखड्यात समाविष्ट करणे, बालकांच्या प्रश्नांवर कार्यवाही करण्यासाठी ठराव मंजूर करणे, बालस्नेही व बालविवाहमुक्त प्रतिज्ञा घेणे तसेच बालसभांच्या माध्यमातून मुलांना त्यांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर विशेष भर असेल.

या उपक्रमातून विकसित भारत २०४७या संकल्पनेशी सुसंगतपणे बालकांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना आणि भविष्यातील सक्षम नागरिकत्वाची जडणघडण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या विशेष उपक्रमाचा समारोप २० नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित बाल संसदमध्ये करण्यात येणार आहे. या माध्यमातून बालकांना लोकशाही प्रक्रिया, संसदीय कार्यपद्धती, चर्चा, प्रश्नोत्तर आणि निर्णयप्रक्रियेचा अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

 महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

            मुंबई,दि. ५ : राज्य शासनाच्या वतीने सन २०२५ पासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा 'महाराष्ट्राचा राज्य उत्सव' म्हणून साजरा करण्यात येत आहे. या राज्य उत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६' साठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.

यावर्षीपासून देशभरातील आणि देशाबाहेरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीही स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली असून जास्तीत जास्त  गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता यावे, या उद्देशाने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठीचे अर्ज https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके पटकावावीत, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी केले आहे.

वसुधैव कुटुंबकम्’ ही भारताची जीवनदृष्टी

 वसुधैव कुटुंबकम्ही भारताची जीवनदृष्टी

            भारत हा जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक असून भारतीय संस्कृतीच्या मूलभूत विचारांचा पाया वसुधैव कुटुंबकम्या संकल्पनेत आहे. संपूर्ण विश्व एक असून संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, ही भारतीय जीवनदृष्टी आहे. भारताने आपल्या इतिहासात केवळ वस्तू आणि व्यापाराचा प्रसार केला नाही, तर विचार, ज्ञान आणि जीवनमूल्यांचाही जगभर प्रसार केला आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले.

            भारताचा जागतिक व्यापारातील ऐतिहासिक सहभाग महत्त्वपूर्ण राहिला असून व्यापाराबरोबरच भारतीय विचारांचा आणि जीवनमूल्यांचा विविध देशांवर प्रभाव पडलेला आहे. बौद्ध धर्म हे याचे महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. भारतातून अनेक शतकांपूर्वी जगाच्या विविध भागांत पोहोचलेल्या या विचारधारेने मोठा प्रभाव निर्माण केला आहे. विशेष म्हणजे हा विचारांचा प्रसार युद्ध, संघर्ष किंवा हिंसेच्या माध्यमातून नव्हे, तर विचार आणि मूल्यांच्या प्रभावातून झालेला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

ब्रिक्स राष्ट्रांमध्ये सहकार्याची नवी दालने खुली करण्याचा प्रयत्न

 ब्रिक्स राष्ट्रांमध्ये सहकार्याची नवी दालने खुली करण्याचा प्रयत्न

            संचालिका जान्हवी पवार यांनी ग्लोबल इम्पॅक्ट फोरमच्या व्यापक उद्दिष्टांची माहिती यावेळी दिली.

 सांस्कृतिक समानता आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून ब्रिक्स राष्ट्रांमध्ये नव्या भागीदारीच्या संधी निर्माण करण्याबरोबरच जागतिक स्तरावर सकारात्मक आणि दीर्घकालीन परिणाम साध्य करण्यासाठी हा मंच महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत-ब्राझील सांस्कृतिक संबंधांचे दृकश्राव्य सादरीकरण

            इतिहास आणि लोकजीवनाच्या समृद्ध परंपरेत संगीत, नृत्य, क्रीडा आणि उत्सव हे ओळख व सांस्कृतिक अभिव्यक्तीची प्रभावी माध्यमे ठरले आहेत. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या सांस्कृतिक परंपरांमध्ये असलेल्या साम्यस्थळांचे आणि दृढ भागीदारीचे दर्शन घडविणारे दृकश्राव्य सादरीकरण यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आले.

            कार्यक्रमाच्या प्रभावी आयोजनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जान्हवी पवार आणि एपी ग्लोबल इम्पॅक्ट फोरम यांचे अभिनंदन केले. यावेळी विविध देशांचे राजदूत, उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ प्रतिनिधी, अभ्यासक, समुदायाचे प्रतिनिधी, राजकीय नेते, विचारवंत तसेच उद्योग व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

वरळी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रतिकात्मक दहीहंडी फोडून उत्सवाचा शुभारंभ

 वरळी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रतिकात्मक दहीहंडी फोडून उत्सवाचा शुभारंभ

आज सकाळपासूनच गोविंदा पथकांचा उत्साह पाहायला मिळाला. ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा रे गोपाळाचा जयघोष आणि उंचच उंच मानवी मनोऱ्यांचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी' उत्सवात प्रतिकात्मक दहीहंडी फोडून शुभारंभ केला. दहीहंडीतून निघालेले 'नशामुक्त महाराष्ट्र' मोहिमेचा संदेश देणारे बॅनर यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी प्रदर्शित केले.

यानंतर वरळी येथे जांबोरी मैदानावरील परिवर्तन फौंडेशन आयोजित दहीहंडी' उत्सव प्रसंगी उपस्थित राहून त्यांनी गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. दहीहंडी उत्सवातून युवकांना संघभावना, नेतृत्व, परिश्रम आणि ध्येयपूर्तीची प्रेरणा मिळते. दहीहंडीच्या थरारात सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांचे योगदान महत्त्वाचे असून, त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले. गोविंदा पथकांनी उंच थर रचताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी आयोजकांच्या प्रयत्नांचेही कौतुक केले. यावेळी  सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह लोकप्रतिनिधी, गोविंदा पथके व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

दहीहंडी हा महाराष्ट्राच्या परंपरेचा, साहसाचा आणि संघभावनेचा जागर

 दहीहंडी हा महाराष्ट्राच्या परंपरेचा, साहसाचा आणि संघभावनेचा जागर

दहीहंडी हा केवळ उत्सव नसून महाराष्ट्राच्या परंपरेचा, तरुणाईच्या साहसाचा आणि संघभावनेचा जागर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. घाटकोपर येथील श्रेयस सिनेमा चौकात आमदार राम कदम यांच्या वतीने आयोजित मानाच्या दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. गोविंदा पथकांतील तरुणांचा उत्साह, जिद्द आणि शिस्त पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, दहीहंडीतील मानवी मनोरे हे संघटित प्रयत्नांचे उत्तम उदाहरण आहेत. प्रत्येक गोविंदाची भूमिका महत्त्वाची असते. तळातील गोविंदांच्या मजबूत आधारापासून ते सर्वांत वरच्या थरावर पोहोचणाऱ्या बालगोविंदापर्यंत प्रत्येकाचा समन्वय, विश्वास आणि धैर्य या खेळाला यशस्वी करतात. घाटकोपरची दहीहंडी ही मुंबईतील प्रमुख आकर्षणांपैकी एक बनली असून, येथे देशाच्या विविध भागांतून येणारी पथके सहभागी होतात. त्यामुळे हा उत्सव आता केवळ स्थानिक स्वरूपाचा न राहता व्यापक ओळख निर्माण करणारा सांस्कृतिक सोहळा झाला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

नशामुक्त महाराष्ट्र’ संकल्पनेला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे

 नशामुक्त महाराष्ट्रसंकल्पनेला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वरळी, दादर, घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवाना भेट

गोविंदा पथकांचा सकाळपासूनच मोठा उत्साह

 

मुंबई, दि.५: युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, यासाठी सामाजिक उपक्रमांना व्यापक लोकसहभागाची जोड देणे आवश्यक आहे. उत्साहाने भरलेल्या दहीहंडीच्या उत्सवामधून 'नशामुक्त महाराष्ट्र'  या संकल्पनेला बळकटी देण्याचे काम व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरळी, दादर, घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. मुंबईतील वरळी येथील राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी' उत्सव प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार राम कदम, आमदार अमित साटम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

निरोगी आणि सक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने व्यसनमुक्तीचा संकल्प करावा, तसेच आपल्या कुटुंबात आणि समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

Featured post

Lakshvedhi