Thursday, 10 September 2026

जाळीचा देव-सावळदबारा रस्त्याच्या विकासासाठी नियमानुसार कार्यवाही करावी

 जाळीचा देव-सावळदबारा रस्त्याच्या विकासासाठी नियमानुसार कार्यवाही करावी

-वनमंत्री गणेश नाईक

·         कालिंका देवी मंदिर परिसरातील कामे निसर्ग पर्यटन योजनेतून करावीत

 

मुंबई, दि. ९ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सावळदबारा हे राखीव वनक्षेत्र आहे. जाळीचा देव ते सावळदबारा गाव रस्त्याचा विकास करण्यासह मौजे टिटवी येथील कालिंका देवी मंदिर व परिसराची विकासकामे निसर्ग पर्यटन योजनेतून करण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.

जाळीचा देव ते सावळदबारा गाव रस्ता वन विभागाच्या जागेतून विकसित करणे तसेच कालिंका देवी मंदिर परिसराच्या विकासासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत वनमंत्री श्री. नाईक बोलत होते. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

वनमंत्री श्री. नाईक म्हणाले की, ऐतिहासिक वास्तूंचे जतन तसेच ऐतिहासिक मंदिरांच्या परिसराचा विकास करण्यात यावा. आवश्यकतेनुसार पर्यायी जागाही उपलब्ध करून द्यावी.

जाळीचा देव ते सावळदबारा हा रस्ता अजिंठा-बुलढाणा राज्य महामार्गाला जोडलेला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी वन विभागाच्या नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देशही वनमंत्री श्री. नाईक यांनी दिले.

सोलापुरातील ऐतिहासिक शिवलिंगाच्या जतनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी

 

सोलापुरातील ऐतिहासिक शिवलिंगाच्या जतनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी

-         वन मंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई, दि. ९ : सोलापूर येथील मौजे मजरेवाडीमधील ऐतिहासिक शिवलिंगाविषयी गुरुदेव सेवा मंडळ आणि स्थानिक नागरिकांची श्रद्धा आहे. या ऐतिहासिक स्थळाचे जतन तसेच शिवलिंगाच्या उपासनेसाठी नियमानुसार मूळ जागा अथवा पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

गुरुदेव सेवा मंडळाची पूर्वापार वहिवाट असलेली जागा मंडळाच्या ताब्यात देण्यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस आमदार शिवशरण बिराजदार पाटील यांच्यासह वन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वन मंत्री श्री. नाईक म्हणाले की, ऐतिहासिक शिवलिंगाचे जतन आणि स्थानिक नागरिकांच्या उपासनेसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी. सध्याची जागा उपलब्ध करून देणे शक्य नसल्यास पर्यायी जमीन देण्यासाठी नियमानुसार कार्यवाही करावी.

वर्धा येथे राज्यातील पहिले कडुनिंब संशोधन व संवर्धन केंद्र उभारण्याची कार्यवाही करावी

 वर्धा येथे राज्यातील पहिले कडुनिंब संशोधन व

संवर्धन केंद्र उभारण्याची कार्यवाही करावी

-         वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, दि. ९ : कडुनिंब हे भारतीय परंपरेतील अत्यंत उपयुक्त औषधी आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचे वृक्ष आहे. कडुनिंब संशोधन व संवर्धन, जैवविविधतेचे जतन, कृषिवानिकी, प्रशिक्षण व जनजागृतीसह स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील भिडी येथे राज्यातील पहिले कडुनिंब संशोधन व संवर्धन केंद्र उभारण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.

वर्धा जिल्ह्यातील भिडी येथील शासकीय रोपवाटिकेत राज्यातील पहिले कडुनिंब संशोधन व संवर्धन केंद्र स्थापन करण्यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत वनमंत्री गणेश नाईक बोलत होते. यावेळी आमदार राजेश बकाणे, मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांच्यासह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वनमंत्री श्री. नाईक म्हणाले की, राज्यातील पहिले कडुनिंब संशोधन व संवर्धन केंद्र पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून कडुनिंबाचे संशोधन व संवर्धन, जैवविविधतेचे जतन, कृषिवानिकीचा प्रसार, प्रशिक्षण आणि जनजागृतीला चालना मिळेल. तसेच स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होऊन शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होईल.

कडुनिंब प्रजातीसंदर्भात यापूर्वी झालेल्या संशोधनाची माहिती तसेच सध्या उपलब्ध असलेल्या संशोधनाच्या व्याप्तीबाबत संशोधन विभागाने सविस्तर अहवाल सादर करावा. या केंद्रासाठी आवश्यक जमीन आणि निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाहीही तातडीने करावी, अशा सूचना वनमंत्री श्री. नाईक यांनी यावेळी दिल्या

रामटेक, नाशिक येथे नव्या फिल्म सिटी उभारणार

 रामटेक, नाशिक येथे नव्या फिल्म सिटी उभारणार

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

            महाराष्ट्राची आणि मुंबईची ओळख चित्रपट नगरी म्हणूनही जगभरात आहे. मराठी तसेच अन्य चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्राने चित्रपटसृष्टीला समृद्ध परंपरा दिली आहे. या परंपरेला पुढे नेत चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सुविधा अधिक सक्षम करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. मुंबईतील फिल्म सिटी, एन. डी. स्टुडिओ, कोल्हापूरमधील चित्रिकरण सुविधा यांसोबतच आता रामटेक आणि नाशिक येथे नवीन फिल्म सिटी उभारण्याच्या दिशेने राज्य शासन काम करत आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

            चित्रपटसृष्टीतील ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन कलाकार, तंत्रज्ञ व अन्य सहकाऱ्यांनी महाराष्ट्राची ही समृद्ध परंपरा जगभर पोहोचवली असून या सर्वांच्या योगदानाला आपण नमन करतो, असे ॲड. शेलार यांनी नमूद केले. यंदा ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंतीचे वर्ष असल्याचा उल्लेख करून त्यांच्या मानवी मूल्यांवर आधारित चित्रपटांनी रसिकांना समृद्ध केले, असेही त्यांनी सांगितले.

            महाराष्ट्रात निर्माण होणारे मराठी तसेच अन्य चित्रपट अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावेत आणि चित्रपट निर्माते, व्यावसायिक, कलाकार व कलावंतांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले.

            या ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात उत्कृष्ट कला दिग्दर्शन, उत्कृष्ट छायालेखन, उत्कृष्ट संकलन, उत्कृष्ट ध्वनीमुद्रण, उत्कृष्ट ध्वनीसंयोजन, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट रंगभूषा, उत्कृष्ट बालकलाकार आदी पुरस्कारही प्रदान करण्यात आले.

0000

लोककलेतील श्री गणेश’मधून राज्याबाहेर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जागर · देहरादून, चेन्नई, कोलकाता, सिल्वासा व हैदराबाद येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

 लोककलेतील श्री गणेशमधून राज्याबाहेर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जागर

·         देहरादून, चेन्नई, कोलकाता, सिल्वासा व हैदराबाद येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई, दि. 9 : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राची समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैभव राज्याच्या सीमांपलीकडे पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने लोककलेतील श्री गणेशआणि महा गणेशोत्सव - महाराष्ट्राचा राज्य उत्सवअंतर्गत देशातील विविध शहरांमध्ये विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चेन्नई, सिल्वासा, कोलकाता आणि हैदराबाद येथे सप्टेंबर महिन्यात हे कार्यक्रम होणार आहेत.

देहरादून येथे 16 सप्टेंबर रोजी सायं. 6 वाजता इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी येथे लोककलेतील श्रीगणेश कार्यक्रम होणार आहे. चेन्नई येथे 20 सप्टेंबर रोजी सायं. 6.30 वाजता कृष्णा गणा सभा येथे कार्यक्रम होणार असून, नमन, गण, जाखडी नृत्य, मंगळागौर, आदिवासी नृत्य, धनगरी नृत्य, कोळी नृत्य तसेच जागरण-गोंधळ आदी महाराष्ट्राच्या लोककला प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सिल्वासा येथे 21 सप्टेंबर रोजी सायं. 6 वाजता कला केंद्र, बाल उद्यानासमोर लेझीम, गण-गौळण, बाल्या नृत्य, शास्त्रीय नृत्य आणि विविध गीतांची सुरेल मैफिल रंगणार आहे.

            कोलकाता येथे 22 सप्टेंबर रोजी सायं. 7.30 वाजता महाराष्ट्र निवासातील टिळक हॉल येथे विशेष कार्यक्रम होणार आहे. यात प्रार्थना, गणपती स्तवन, नमन, ओवी, मंगळागौरीची गाणी, भक्तिगीते, गीतरामायण, पारंपरिक लोकसंगीत, देवीचा गोंधळ, कोळीगीते आणि देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तर हैदराबाद येथे 23 सप्टेंबर रोजी सायं. 6 वाजता भारतीय विद्या भवन, किंगकोटी येथे महाराष्ट्राची भक्तीपरंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वैभवाचा परिचय करून देणारा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

            महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी आणि परंपरांशी घट्ट नाते असलेल्या विविध लोककला, लोकसंगीत आणि भक्तिपरंपरांमधून श्री गणेशाविषयीची भक्ती, श्रद्धा तसेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक भावविश्व प्रभावीपणे व्यक्त होते. या कलाप्रकारांना राज्याबाहेर व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच विविध राज्यांतील रसिकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची अनुभूती मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

            हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

            या सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून, संबंधित शहरांतील आणि परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला व सांस्कृतिक परंपरेचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

0000

आदिवासी वसतिगृहातील गृहपाल आणि अधीक्षक संवर्गाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक कार्यवाहीचे निर्देश · प्रलंबित प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविण्यासाठी अधिकारी-कर्मचारी यांच्यात नियमित संवाद व समन्वय ठेवण्याचे आवाहन

 आदिवासी वसतिगृहातील गृहपाल आणि अधीक्षक संवर्गाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक कार्यवाहीचे निर्देश

·         प्रलंबित प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविण्यासाठी अधिकारी-कर्मचारी यांच्यात नियमित संवाद व समन्वय ठेवण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. ९ : आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत विविध कर्मचारी संघटनांनी मांडलेल्या मागण्या व समस्यांचा नियम आणि उपलब्ध तरतुदींनुसार सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री यांनी संबंधित विभागाला दिले. शासकीय निवासस्थान येथे झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

            यावेळी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण संघाचे अध्यक्ष अरुण गाडे तसेच कर्मचारी संघटनांचे विविध प्रतिनिधींनी उपस्थित होते. दूरदृष्य प्रणालीद्वारे आयुक्त गोपीचंद कदम, अपर आयुक्त दिगांबर चव्हाण, नाशिक अपर आयुक्त दिनकर पावरा नागपूर व अमरावती आदिवासी विभागाचे अपर आयुक्त उपस्थित होते.

            मंत्री प्रा.डॉ वुईके म्हणाले की, वसतीगृहातील गृहपाल आणि अधीक्षक याबाबत मांडलेल्या मागण्या व्यापक स्वरूपाच्या असून, त्यातील काही प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. सर्व मागण्यांचे एकाचवेळी निराकरण करणे शक्य नसले तरी प्रत्येक मागणीचा मानवी व सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येईल असे मंत्री वुईके यांनी यावेळी स्पष्ट केले.

            बैठकीत कर्मचारी संघटनांच्या वतीने विविध मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास व उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे, अनुदानित आश्रमशाळांतील पात्र कर्मचाऱ्यांना १०, २० व ३० वर्षांच्या सेवेनुसार वेतनश्रेणीचे लाभ देणे, प्रशासकीय कारवाईपूर्वी वस्तूस्थितीची चौकशी करून नियमानुसार निर्णय घेणे, तसेच आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये २४ तास सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक मनुष्यबळ, सुविधा व सुरक्षा उपलब्ध करून देणे, या मागण्यांवर सर्वसमावेश चर्चा करण्यात आली.

            विभागातील अनेक प्रश्न केवळ संवादाच्या अभावामुळे प्रलंबित राहतात, असे नमूद करून अधिकारी, कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांमध्ये नियमित व प्रभावी संवाद असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही समस्येचे निराकरण वरिष्ठ स्तरावर येण्यापूर्वी संबंधित स्तरावरच करण्यासाठी सक्षम संवाद यंत्रणा निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

            दर दोन ते तीन महिन्यांनी कर्मचारी संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांच्या मागण्या, सूचना व अडचणी जाणून घ्याव्यात, असे निर्देश देत विभागाच्या महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णयांबाबत संबंधित घटकांना आवश्यकतेनुसार विश्वासात घेण्याची अपेक्षा आणि महत्त्वाची सूचना त्यांनी केली.

            विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी हा विभागाच्या कामकाजातील महत्त्वाचा घटक आहे. मुख्याध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहाय्यक आयुक्त, आयुक्त आणि सचिव अशा विविध स्तरांवरील यंत्रणा परस्परावलंबी असल्याने आपण सर्व एक आहोत आणि हा आपला विभाग आहे या भावनेतून काम करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

            आदिवासी विकास विभागांतर्गत शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी ही संपूर्ण विभागाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी आणि विभाग यांच्यातील परस्पर संबंध लक्षात घेऊन संवेदनशीलता, जबाबदारी, विश्वास आणि समन्वयाच्या भावनेतून कामकाज करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

 

            भविष्यात कोणत्याही स्तरावर संवादाचा अभाव राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देताना स्थानिक स्तरावर प्रश्न सुटत नसल्यास तो तातडीने वरिष्ठ स्तरावर कळवावा; मात्र शक्य तितक्या प्रश्नांचे निराकरण संबंधित स्तरावरच करण्यासाठी प्रभावी यंत्रणा विकसित करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

            बैठकीत कर्मचारी संघटनांनी आणि विभागाची भूमिका यावर सकारात्मक चर्चा करताना मंत्री वुईके म्हणाले, परस्पर विश्वास, संवाद, सहकार्य आणि समन्वयाच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्नांचे टप्प्याटप्प्याने निराकरण करण्याची शासनाची भूमिका आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीबाबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

 सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीबाबत

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

           

            मुंबई, दि. ९ : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील पदभरती संदर्भात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक घेण्यात आली.

            

            बैठकीत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीसंदर्भातील विविध बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बँकेची आर्थिक व प्रशासकीय स्थिती, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदे, नोकरभरतीची आवश्यकता तसेच संबंधित नियम व निकष याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.

      सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज अत्यंत उत्कृष्ट असून, बँकेची चांगली आर्थिक व प्रशासकीय कामगिरी लक्षात घेता नोकरभरतीच्या विषयावर निश्चितच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. यासंदर्भातील संपूर्ण माहिती घेऊन सर्व बाबींचा विचार करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000

Featured post

Lakshvedhi