*भारत कधी हारतो?*
भारताने क्रिकेट सामना जिंकल्यानंतर भरपूर फटाके वाजवून आपण आनंद व्यक्त करतो. परंतु नेहमीच्या आपल्या रोजच्या जीवनात आपण भारताला अनेक वेळा स्वतःहून हरवत असतो. चला जाणून घेऊया आपण भारताला कुठे कुठे आणि कधी कधी हरवतो.
ज्यावेळी कचरा हा कचरा कुंडीत न टाकता कुठेही रस्त्यावर टाकतो तेव्हा भारत हारतो.
जेव्हा आपण बाहेर सार्वजनिक ठिकाणी, रेल्वे मध्ये, बस मध्ये, गाडी चालवत असताना पचापच पिचकाऱ्या मारतो तेव्हा भारत हारतो.
येथे थुंकू नये असा फलक लावलेला असतो तेथेच थुंकतो तेव्हा भारत हारतो.
कोर्ट, कचेरी, सार्वजनिक इमारती मधील सगळे जीने, कोपरे, स्वच्छता गृहे लाल बुंद करतो तेव्हा भारत हारतो.
थुंकू नये म्हणून देवाचे फोटो लावावे लागतात आणि तरीही थुंकतो तेव्हा भारत हारतो.
काढलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर न भरता कर्ज कसे बुडीत जाईल असा विचार करतो तेव्हा भारत हारतो.
ग्राहकांकडून वाजवी नफा घेऊन माल न विकता अवास्तव नफा घेतो तेव्हा भारत हारतो.
खरेदीसाठी बाहेर पडताना थैली न घेता जातो आणि भरपूर प्लास्टिक पिशव्या घेऊन घरी येतो तेव्हा भारत हारतो.
गर्दीच्या ठिकाणी रांगेत न जाता मध्येच घुसतो तेव्हा भारत हारतो.
आंदोलन, मोर्चे काढताना सरकारी, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करतो तेव्हा भारत हारतो.
लोकांशी कठोरपणे अव्यवहाने वागतो तेव्हा भारत हारतो.
शेजारीपाजारी किरकोळ कारणावरून वाद घालतो तेव्हा भारत हारतो.
गरीब भाजीवाल्याकडे हुज्जत घालतो आणि हाॅटेलमध्ये गेल्यावर चार पाच हजारांचे झटक्यात ऑनलाईन पेमेंट करतो तेव्हा भारत हारतो.
बसमध्ये, रेल्वेमध्ये प्रवास करताना कचरा आणि अस्वच्छता करतो तेव्हा भारत हारतो.
पर्यटनासाठी बाहेर निसर्गात गेल्यावर तेथे कचरा, बाटल्या फेकतो तेव्हा भारत हारतो.
वाहने चालवताना फोनवर बोलत गाडी चालवतो तेव्हा भारत हारतो.
वाहतुकीचे नियम न पाळता अत्यंत बेदरकारपणे वाहने चालवतो व आपल्या बरोबर दुसऱ्यांच्या जीवाला धोका उत्पन्न करतो तेव्हा भारत हारतो.
कायदे, नियम हे दुसऱ्यांनी पाळण्यासाठी आहेत असा विचार करतो व स्वतः बेदरकारपणे वागतो तेव्हा भारत हारतो.
गाडी पार्क करताना मोकळी जागा आहे म्हणून कशीही पार्क करतो तेव्हा भारत हारतो.
प्रत्यक्ष आणि फोनवर बोलताना शिष्टाचाराचे पालन करत नाही तेव्हा भारत हारतो.
आपला धर्म संस्कृती टिकावी वाढावी यासाठी काहीही करत नाही व फक्त मौजमजा करण्यासाठी जगतो तेव्हा भारत हारतो.
घरातील सदस्यांना नातेवाईकांना चांगली, सन्मानाने वागणूक देत नाही तेव्हा भारत हारतो.
दुसऱ्याचं वाईट चिंतन करतो, द्वेष मत्सर करतो तेव्हा भारत हारतो.
गैरमार्गाने भ्रष्टाचार करून घरात पैसा आणतो तेव्हा भारत हारतो.
समाजात वावरताना महिलांकडे वाईट नजरेने पाहतो तेव्हा भारत हारतो.
स्वदेशीचा आग्रह न धरता विदेशी वस्तू व वाहने खरेदी करतो तेव्हा भारत हारतो.
पाण्याचे हवेचे कसलाही विचार न करता प्रदूषण करतो तेव्हा भारत हारतो.
पाणी, वीज, पेट्रोल डिझेल यांचा अंधाधुंद वापर करतो तेव्हा भारत हारतो.
आपल्याला मिळणारा पगार, मानधन, मजुरी याचा योग्य परतावा न देता कामचुकारपणा करतो तेव्हा भारत हारतो.
आपल्याकडे असलेले पद, पैसा आणि प्रतिष्ठा यांचा वापर लोकांच्या मदतीसाठी न करता त्रास देण्यासाठी करतो तेव्हा भारत हारतो.
आपापसातील किरकोळ गोष्टी व वाद विवादावर समझोता न करता पोलीस स्टेशन आणि कोर्ट गाठतो तेव्हा भारत हारतो.
मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी आदर्श नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न न करता व विचारांना गौण समजून फक्त पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी शिक्षण देतो तेव्हा भारत हारतो.
जगातून, समाजातुन फक्त घेतो आणि घेतो परंतु आणि सामाजिक जबाबदारी म्हणून काहीच परत देत नाही तेव्हा भारत हारतो.
कामाच्या वेळी मागे आणि श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करतो तेव्हा भारत हारतो.
देवाधर्मावर अनाठायी टिका करतो, आपल्या अर्धवट विचारांचे ओंगळवाणे प्रदर्शन करून जातीवाद करतो तेव्हा भारत हारतो.
वेळेवर नगरपालिका कर, घरपट्टी, शेतसारा, आयकर आपण भरत नाही तेव्हा भारत हारतो.
आपली परीस्थिती चांगली असताना आपण सरकारी योजनांचा फायदा घेत असतो तेव्हा भारत हारतो.
आपल्या कुटुंबाच्या, गावाच्या नावाला डाग लागेल असे जेव्हा काम करतो तेव्हा भारत हारतो.
आपण जाणीवपूर्वक शक्य असताना मतदान करत नाही तेव्हा भारत हारतो.
आपण देश हित लक्षात न घेता पैसे घेऊन मतदान करतो तेव्हा भारत हारतो.
छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा आदर्श न घेता त्यांच्या विचारांची अवहेलना करतो तेव्हा भारत हारतो.
यातील ज्या गोष्टी करायला नकोत तरी आपण करत असलो आणि ज्या गोष्टी करायला हव्यात परंतु करत नसलो तर भारत जिंकला म्हणून फटाके वाजवण्याला काय अर्थ राहिला? तो ही एक पोरकटपणा, उथळपणा करुन परत भारत हरवला.
यामध्ये भारताची हार तर आहेच तत्पुर्वी अयोग्य, असंस्कारी, अविचारी असा ठप्पा आपण स्वतः आपल्यावर मारून घेतो. यामध्ये प्रथम आपण स्वतः मारतो आणि काही कारण नसताना देशाची मान खाली घालायला लावतो.
अजून अशा बऱ्याच गोष्टी असतील आपल्या वागणुकीने आपण भारताला रोज पराजित करत असतो. त्या गोष्टी आपले वैयक्तिक अनुभव आहेत त्यांचे आत्मपरीक्षण करा आणि भारताचे प्रामाणिक नागरिक म्हणून भारताला हरवणे बंद करा. कारण ते आपल्याच हातात 🫵 आहे.
◆◆◆