सेवा संकल्प अभियानात राज्यातील सर्व जनतेची आरोग्य तपासणी करा.
-सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
- ॲनिमिया निर्मूलन, बाल आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी राज्यव्यापी अभियान राबवावे.
- राज्यात १४४० डॉक्क्टरांची भरती
- आरोग्य संस्थांच्या सेवांचे केंद्रीय नियंत्रण कक्षातून नियमित संनियंत्रण
मुंबई, दि १६:- सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांच्या सर्वसमावेशक आरोग्य तपासणीसह अॅनिमिया निर्मूलन, बाल आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्यसेवा, शालेय विद्यार्थ्यांची तपासणी आणि उपचारांचा पाठपुरावा यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. आरोग्य संस्थांतील सेवांचे नियमित संनियंत्रण, जनआरोग्य समित्यांचा सहभाग, रुग्णवाहिका सेवेचे बळकटीकरण तसेच वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता यावर विशेष भर देण्यात यावा असेही त्यांनी सांगितले.
आरोग्यभवन येथे सेवा संकल्प अभियानात राबविण्यात येणा-या उपक्रमांची मंत्री आबिटकर यांनी माहिती घेतली त्यावेळी त्यांनी सूचना दिल्या. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपूण विनायक, आरोग्यसेवा डॉ. संजय काटकर, नागरी सेवा आयुक्त डॉ. सुनील भाकरे उपस्थित होते.
राज्यातील ॲनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी तपासणी, उपचार आणि नियमित संनियंत्रणावर भर देत विशेष अभियान राबवावे. गर्भवती महिला, शून्य ते दोन वर्षे वयोगटातील बालके, शालेय विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीला प्राधान्य द्यावे. यासाठी सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास आणि आदिवासी विकास विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत देण्यात आले.
राज्यातील ॲनिमियाची स्थिती, लोहयुक्त औषधांचा पुरवठा, रुग्णांकडून औषधांचे सेवन आणि उपचारानंतरची प्रगती यांचे आरोग्य संस्थानिहाय संनियंत्रण करण्यात यावे. मध्यम आणि तीव्र स्वरूपाच्या ॲनिमियाने ग्रस्त गर्भवती महिलांसाठी ‘फेरिक कार्बोक्सिमाल्टोज’ उपचाराच्या वापराबाबत तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रमाणित मार्गदर्शक सूचना तयार करण्याचा प्रस्ताव सादर करावा. उपचाराबरोबरच पोषणविषयक मार्गदर्शन आणि नियमित हिमोग्लोबिन तपासणीवर भर द्यावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
आरोग्य सेवेतील मनुष्यबळाची कमतरता पूर्ण करण्यासाठी राज्यात १४४० डॉक्टरांची भरती, तसेच दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी उत्तरदायित्व ठरणे आवश्यक आहे. १५ हजार आरोग्य समित्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य अभियान राबवावे असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment