Monday, 14 September 2026

आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या विकास उपक्रमांना राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य

 आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या विकास उपक्रमांना राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 13 : आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क महाराष्ट्रात राबवत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास आणि हवामान बदल प्रतिबंध संदर्भातील उपक्रमांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक करत राज्य शासनाकडून अशा सर्व प्रकल्पांना आवश्यक ते सहकार्य आणि पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही दिली.

पाचवे आगा खान म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या अधिकृत दौऱ्यावर आलेले प्रिन्स रहीम आगा खान यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री फडणवीस यांची येथील फेअरमाँट हॉटेल येथे भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे महाराष्ट्राच्या वतीने स्वागत केले. यावेळी विविध सामाजिक विकास प्रकल्प, आरोग्य सुविधा, हवामान कृती, जलव्यवस्थापन, वारसा संवर्धन आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार अमीन पटेल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी आणि सचिव डॉ. राजेश गवांदे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील ग्रामीण भागात जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनासाठी आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कने केलेल्या कार्याचे कौतुक केले. जलटंचाईग्रस्त भागांमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे गावांमध्ये झालेला सकारात्मक बदल उल्लेखनीय असल्याचे सांगत त्यांनी अशा प्रकल्पांचा विस्तार अधिक मोठ्या क्षेत्रात करण्यासाठी राज्य शासन भागीदारी करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणाऱ्या उपक्रमांना शासनाचे पूर्ण सहकार्य राहील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्य शासन आणि आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क यांच्यात सातत्यपूर्ण संवादासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारण्याबाबतही चर्चा झाली. या माध्यमातून विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन त्यांचा विस्तार करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती व्यक्त करण्यात आली. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शहरी उष्णता कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासाची माहिती शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिली. हरित क्षेत्रवाढ, पर्यावरणपूरक नियोजन आणि हवामान कृतीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम राज्यातील शहरांसाठी उपयुक्त ठरतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi