Monday, 31 August 2026

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबत मानसिक आरोग्याचे संगोपनही गरजेचे -

 विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबत मानसिक आरोग्याचे संगोपनही गरजेचे

-         महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई, दि. ३१ : बदलत्या काळातील वाढती स्पर्धा लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या मानसिक आरोग्याचे संगोपन करणे काळाची गरज आहे. यश आणि अपयश हे आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत, ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केले.

 

अंजुमन-ए-इस्लाम संचलित सैफ तय्यबजी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे वर्ल्ड मेमन ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) इंडिया आणि यामा पटेल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामाजिक उपक्रमात गरजू पालकांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या.

 

यावेळी अंजुमन-ए-इस्लामचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. झहीर आय. काझी, सैफ तय्यबजी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या अमीना काझी, अंजुमन-ए-इस्लामचे वरिष्ठ उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, वर्ल्ड मेमन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष हाजी हसीन आघाडी, यामा पटेल फाउंडेशन तसेच डब्ल्यूएमओ मुंबईचे शहर अध्यक्ष हाजी मुदस्सर पटेल, हाजी इम्तियाज मोटरवाला, नसीन मकलाई, हुरिया पटेल आणि मुमताज परफ्यूमवाला यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीतबद्ध गीतांची ‘शब्द सुरांची मैफल’ · ४ सप्टेंबर रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीतबद्ध गीतांची शब्द सुरांची मैफल

·         ४ सप्टेंबर रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 

मुंबई, दि. ३१  : ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय गीतांचा सुरेल आविष्कार रसिकांना अनुभवता यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने शब्द सुरांची मैफलया विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार,  ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई ४०००२५ येथे होणार आहे.

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या प्रदीर्घ आणि समृद्ध संगीत कारकिर्दीचा गौरव करण्यासोबतच त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा सांगीतिक वारसा रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी संगीत क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संगीतशैलीने स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या अशोक पत्की यांच्या विविध लोकप्रिय गीतांचा सांगीतिक प्रवास या मैफलीच्या माध्यमातून उलगडणार आहे.

या कार्यक्रमास पद्मश्री अशोक सराफ, निवेदिता जोशी-सराफ, साधना सरगम आणि स्वप्नील बांदोडकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमात धनंजय म्हसकर, अनघा पेंडसे, प्राजक्ता सातार्डेकर आणि अभिषेक नलावडे हे गायक आपल्या सादरीकरणातून अशोक पत्की यांच्या संगीतबद्ध गीतांना सुरेल उजाळा देणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन मयुरेश साने करणार आहेत. कार्यक्रमाच्या वाद्यवृंदामध्ये तबला मयुरेश शेर्लेकर, ढोलकी व हँडसॉनिक जयंता बगाडे, ऑक्टोपॅड सिद्धार्थ कदम, बासरी संदीप कुलकर्णी, कीबोर्ड झंकार कानडे व अक्षय कावळे यांचा सहभाग राहणार आहे. हार्मोनियम आणि संगीत संयोजन विनय चेऊलकर यांचे आहे. गायक आणि वादकांच्या सुरेल सादरीकरणातून अशोक पत्की यांच्या संगीतबद्ध गीतांचा समृद्ध ठेवा रसिकांसमोर सादर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशातील संगीतपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याबरोबरच ज्येष्ठ व मान्यवर कलाकारांच्या कलाकृती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या प्रदीर्घ आणि समृद्ध संगीत कारकिर्दीचा गौरव करण्यासोबतच त्यांच्या संगीतबद्ध गीतांचा सांगीतिक वारसा रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत संगीत, नाट्य, लोककला आणि विविध सांस्कृतिक कलाप्रकारांच्या जतन, संवर्धन व प्रसारासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

शब्द सुरांची मैफलया कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार असून, प्रवेश विनामूल्य आहे. मुंबईतील संगीतप्रेमी, कलारसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीतबद्ध गीतांची ही विशेष मैफल अनुभवावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक  प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

0000

संजय ओरके/विसंअ

आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न जारी · पूरस्थितीत महाराष्ट्रातील बाधित नागरिकांची संख्या ४०५

  

आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न जारी

·         पूरस्थितीत महाराष्ट्रातील बाधित नागरिकांची संख्या ४०५

 

मुंबई, दि. ३० : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक व नागरिकही अडकले आहेत. यातील ६७ जणांचा संपर्क व शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील एकूण बाधित नागरिक संख्या ४०५ आहे. यापैकी २६२ नागरिकांना स्वगृही आणण्यासाठी यशस्वी कार्यवाही होत असून उर्वरित ७६ संपर्कात असून सुरक्षित आहेत.

 

विशेष पथक काठमांडू येथे दाखल

            संपर्क होऊ शकला नाही अशा पर्यटक नागरिकांच्या शोधासाठी केंद्र सरकारचे विशेष पथक काठमांडू येथे दाखल झाले असून भारताचे नेपाळमधील राजदूत यांनी देखील या पथकाची भेट घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत. आपत्तीमुळे बाधित नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची माहिती घेण्याबरोबरच त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांनुसार प्रवासातील अडचणी दूर करण्याबरोबरच विविध प्रकारची मदत उपलब्ध केली जात आहे.

 

रिचा टूर्स प्रा. लि. या संस्थेमार्फत गेलेल्या ६० नागरिकांच्या गटाशी अद्याप थेट संपर्क प्रस्थापित झालेला नाही. तसेच अन्य ७ नागरिकांची लिंकद्वारे नोंद झाली असून त्यांच्याशीही अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. या व्यक्तींचा ठावठिकाणा व माहिती मिळविण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत.

 

 मुख्यमंत्री कार्यालय आणि प्रशासन बाधित पर्यटक व नागरिक राज्यात सुरक्षितरित्या पोहोचावे यासाठी यावर सातत्याने लक्ष ठेवून आहे. राज्यातील आणखी ६९ नागरिक देखील पुढील प्रवास करून मुंबईत पोहोचतील. तिबेटमधील मानसरोवरजवळील सागा येथून ३७ नागरिक २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी मुंबईत सुखरूप पोहोचले आहेत. तसेच सुरक्षित असल्याची माहिती मिळालेल्या नागरिकांपैकी नागपूरमधील १०५ नागरिक भारतात परतले आहेत.

 

पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या या कठीण परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून त्यांच्या परतीसाठी आवश्यक कार्यवाही करीत आहे

रेशन दुकानापासून वीट निर्मितीपर्यंत

 रेशन दुकानापासून वीट निर्मितीपर्यंत

            ‘उमेदअभियानाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला कृषी क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता विविध व्यवसायांपर्यंत विस्तार दिला आहे. राज्यात स्वयं-सहाय्यता समूहांच्या माध्यमातून रेशन दुकाने, सिमेंट एजन्सी, वीट निर्मिती, केरोसीन एजन्सी आणि टाईल्स निर्मिती यांसारखे व्यवसायही महिलांकडून चालविले जात आहेत.

            ३२ स्वयं-सहाय्यता समूहांमधील ५८ महिला रेशन दुकाने, तर एका स्वयं-सहाय्यता समूहातील २३ महिला सिमेंट विक्रीचा व्यवसाय सांभाळत आहेत. दोन समूहांमधील २४ महिला वीट निर्मिती व्यवसायात कार्यरत आहेत. याशिवाय दोन महिला केरोसीन एजन्सी, तर दोन महिला टाईल्स निर्मितीचा व्यवसाय चालवत आहेत.

५४ महिला उत्पादक कंपन्यांकडून कृषी निविष्ठांचा पुरवठा

 ५४ महिला उत्पादक कंपन्यांकडून कृषी निविष्ठांचा पुरवठा

            कृषी निविष्ठांच्या क्षेत्रातही उमेदच्या माध्यमातून महिलांना नवी संधी उपलब्ध झाली आहे. राज्यातील ५४ महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे बियाणे व खत विक्रीसाठी आवश्यक परवाने उपलब्ध आहेत. या माध्यमातून सुमारे ५४ हजार महिला सभासदांना सेवा दिली जात आहे.

            महिला शेतकरी उत्पादक कंपन्या आपल्या सभासदांची मागणी एकत्रित करून मोठ्या प्रमाणावर बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठांची खरेदी करतात. सामूहिक खरेदीमुळे दर्जेदार निविष्ठा वेळेत आणि योग्य दरात उपलब्ध करून देण्यास मदत होत आहे. परिणामी शेतकऱ्यांचा निविष्ठांवरील खर्च आणि बाजारपेठेवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेनेही या उपक्रमाची वाटचाल सुरू आहे.

रेशन दुकानापासून

शेतीचा खर्च कमी; उत्पादकतेला हातभार

 शेतीचा खर्च कमी; उत्पादकतेला हातभार

            महागडी कृषी यंत्रे खरेदी करण्याची गरज नसल्याने महिला शेतकऱ्यांचा भांडवली खर्च कमी होत आहे. पेरणी, आंतरमशागत आणि कापणीसारखी कामे आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने वेळेत पूर्ण होत असल्याने शेतीतील कार्यक्षमता वाढण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर अवजारे भाड्याने देण्याच्या माध्यमातून समुदाय आधारित संस्थांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळत आहे. अवजार बँकांच्या व्यवस्थापन, देखभाल आणि वाहतुकीमुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत. त्यामुळे एका उपक्रमातून महिला शेतकरी, बचत गट आणि स्थानिक ग्रामीण अर्थव्यवस्था अशा अनेक घटकांना लाभ मिळत आहे.

४०८ कृषी अवजार बँकांची उभारणी

 ४०८ कृषी अवजार बँकांची उभारणी

            वर्ष २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीत राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३५१ तालुक्यांत ४०८ कृषी अवजार बँका स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याचा सुमारे ४० हजार ८०० महिला शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ झाला आहे. या अवजार बँकांमध्ये विविध कृषिपूरक अवजारांसह ट्रॅक्टरचीही सुविधा उपलब्ध आहे. महिला स्वयंसहाय्यता समूह, ग्राम संघ, प्रभाग संघ तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून या अवजार बँकांचे व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे या सुविधा केवळ यंत्रसामग्री उपलब्ध करून देणाऱ्या केंद्रांपुरत्या मर्यादित न राहता समुदायाच्या मालकीच्या आणि व्यवस्थापनाखालील कृषी सेवा केंद्रे म्हणून विकसित होत आहेत.

Featured post

Lakshvedhi