रामटेक, नाशिक येथे नव्या फिल्म सिटी उभारणार
– सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार
महाराष्ट्राची आणि मुंबईची ओळख चित्रपट नगरी म्हणूनही जगभरात आहे. मराठी तसेच अन्य चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्राने चित्रपटसृष्टीला समृद्ध परंपरा दिली आहे. या परंपरेला पुढे नेत चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सुविधा अधिक सक्षम करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. मुंबईतील फिल्म सिटी, एन. डी. स्टुडिओ, कोल्हापूरमधील चित्रिकरण सुविधा यांसोबतच आता रामटेक आणि नाशिक येथे नवीन फिल्म सिटी उभारण्याच्या दिशेने राज्य शासन काम करत आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
चित्रपटसृष्टीतील ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन कलाकार, तंत्रज्ञ व अन्य सहकाऱ्यांनी महाराष्ट्राची ही समृद्ध परंपरा जगभर पोहोचवली असून या सर्वांच्या योगदानाला आपण नमन करतो, असे ॲड. शेलार यांनी नमूद केले. यंदा ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंतीचे वर्ष असल्याचा उल्लेख करून त्यांच्या मानवी मूल्यांवर आधारित चित्रपटांनी रसिकांना समृद्ध केले, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात निर्माण होणारे मराठी तसेच अन्य चित्रपट अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावेत आणि चित्रपट निर्माते, व्यावसायिक, कलाकार व कलावंतांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले.
या ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात उत्कृष्ट कला दिग्दर्शन, उत्कृष्ट छायालेखन, उत्कृष्ट संकलन, उत्कृष्ट ध्वनीमुद्रण, उत्कृष्ट ध्वनीसंयोजन, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट रंगभूषा, उत्कृष्ट बालकलाकार आदी पुरस्कारही प्रदान करण्यात आले.
0000
No comments:
Post a Comment