विज्ञान प्रयोगशाळेतून समाजापर्यंत पोहोचवावे
- राज्यपाल जिष्णु देव वर्मा
- रसायन तंत्रज्ञान संस्थेने ‘विज्ञान आणि समाज सप्ताह’ आयोजित करावा
मुंबई, दि. 10 : वैज्ञानिक संशोधन आणि नवोन्मेष केवळ प्रयोगशाळा आणि शोधनिबंधांपुरते मर्यादित न राहता समाजासमोरील समस्या सोडविण्यासाठी उपयोगी ठरले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
रसायन तंत्रज्ञान संस्था (आयसीटी), माटुंगा, मुंबई येथे आयोजित हरित रसायनशास्त्र आणि शाश्वत अभियांत्रिकी विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला ते संबोधित करीत होते. ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. एम. लक्ष्मी कांतम यांच्या सन्मानार्थ रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई आणि इंडियन केमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
वैज्ञानिकांनी व्यवहार्य, परवडणारी आणि मोठ्या प्रमाणावर वापरता येतील अशी हरित तंत्रज्ञाने विकसित करण्यावर भर द्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.
भारताच्या वेगाने विस्तारत असलेल्या उत्पादन आणि रसायन उद्योगांच्या पार्श्वभूमीवर, रसायन तंत्रज्ञान संस्था आणि इंडियन केमिकल सोसायटी यांसारख्या संस्थांनी भारताला हरित रसायनशास्त्र, उत्प्रेरण आणि शाश्वत रासायनिक अभियांत्रिकीचे जागतिक केंद्र बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.
भारताने केवळ इतर देशांनी विकसित केलेले तंत्रज्ञान स्वीकारण्यापुरते मर्यादित न राहता, जगाने स्वीकारावे असे तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे, असेही राज्यपालांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment