शाळा भेटीदरम्यान शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वर्गखोल्यांची स्थिती, शाळा व परिसराची स्वच्छता, क्रीडांगण व संरक्षक भिंत, वीज, आवश्यक फर्निचर, ई-सुविधा, विद्यार्थ्यांचे गणवेश, पोषण आहाराची गुणवत्ता व वेळेवर वितरण आदी बाबींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तसेच शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आणि सर्वेक्षण अहवालांच्या आधारे आवश्यक सुधारणांचा आढावा घेण्यात आला. यासोबतच संबंधित पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत शैक्षणिक व प्रशासकीय बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
निपुण महाराष्ट्र अभियान, विद्यार्थी गुणवत्ता, पॅट, यूडायस प्लस, पीजीआय इंडेक्स, एसडीजी गोल, पीएम श्री शाळा, आदर्श शाळा, पीएम पोषण योजना, विद्या समीक्षा केंद्र, दीक्षा, महास्कूल जीआयएस आदी विविध शैक्षणिक उपक्रम व योजनांच्या अंमलबजावणीचाही या भेटींमध्ये आढावा घेण्यात आला.
अभियानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये पालक अधिकारी व जिल्हा नोडल अधिकारी यांनी साधारणत: 150 शाळा भेटी करुन शालेय प्रशासन, गुणवत्ता व शासकीय उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन आवश्यक ते मार्गदर्शन केले. अभियानाचा दुसरा टप्पा दि. 22 व 23 सप्टेंबर, 2026 रोजी असून त्यामध्ये सुद्धा शाळा भेटी, तालुका व जिल्हास्तरीय आढावा बैठका आणि आवश्यक सुधारात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे.