जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलास’मध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विशेष मुलाखत
‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’च्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या नव्या संधी
मुंबई, दि. ११ : राज्यातील युवक आणि युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि आवडीनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वयंरोजगार व उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे राज्यात २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून युवक, उद्योग आणि रोजगाराच्या संधी यांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या शासनाच्या प्रयत्नांबाबत कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांतून विशेष संवाद साधला आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही विशेष मुलाखत मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध होणार आहे. तसेच ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दि. १६ व १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल ॲपवर या मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे. या विशेष मुलाखतीचे निवेदन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले आहे.
अधिकृत समाजमाध्यमे :
X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/
YouTube : https://www.youtube.com/
राज्यातील युवांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ मिळवून देणे तसेच युवकांना स्वयंरोजगार आणि उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे, हा या रोजगार मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. येत्या दि.२९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभर एकाच वेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असून, या माध्यमातून युवकांना विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी, उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ आणि कौशल्याधारित रोजगाराच्या नव्या शक्यता उपलब्ध होणार आहेत.
या विशेष मुलाखतीत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र"ची संकल्पना, त्याचे नियोजन, युवकांसाठी उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी, उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्यविकास, स्वयंरोजगार व उद्योजकतेला प्रोत्साहन आणि राज्यातील भविष्यातील रोजगारनिर्मितीची दिशा याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. युवक व युवतींनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.