Thursday, 9 June 2022

तुम्हारा बॉटल हमारा ग्लास


 

मेथी

 *मेथीच्या दाण्याचे फायदे-*


मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे ॲनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत.


1.एक चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचनाची समस्या दूर होते. मेथीचे दाणे आर्थरायटीस आणि साईटिका समस्यांवर रामबाण उपाय आहेत. सुमारे एक ग्राम मेथीदाण्यांची पावडर आणि सुंठ पावडर यांचे मिश्रण गरम पाण्यातून दिवसभर दोन-तीन वेळा घेतल्याने लाभ होतो.


2. केसांमध्ये कोंडा झाला असेल तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट डोक्याला लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा. सुती कापडाने पुसा. कोंडा दूर होईल.


3. मेथीदाणे रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजवून ठेवा. सकाळी या तेलाने डोक्याला मसाज करा. हळू-हळू केस गळणे बंद होईल.


4. पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. दररोज 5 ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग दूर होतात. मेथी आणि सुंठ समान प्रमाणात घेऊन चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये गुळ टाकून खाल्ल्यास संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत होईल.


5. मेथीदाण्यामध्ये असलेले भरपूर फायबर आणि स्टेरॉइड दोन पद्धतीने काम करतात. एक म्हणजे शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. याची मधुमेह्यांसाठी खूप गरज भासते. दुसरे म्हणजे यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो. सोबतच मेथी दाण्यांमुळे प्रतिकारशक्तीतही वाढ होते.


6. अपचन किंवा बद्धकोष्ठता झाल्यास अर्धा चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घ्यावेत. थोडेसे मेथीदाणे सकाळ-संध्याकाळ पाण्यातून घेतल्यास बद्धकोष्ठतेची समस्या नष्ट होऊ शकते.


7. उच्चरक्तदाब कमी करण्यासाठी मेथीचे दाणे खूपच फायदेशीर ठरतात. अर्धा चमचा मेथीचा दाणा घ्या. त्या रात्रभर गरम पाण्यात भिजवा. सकाळी उठून हे पाणी पिऊन घ्या आणि मेथीचे दाणे चाऊन खाऊन टाका. याने उच्च रक्तदाब लवकरच कमी होईल.


8. मेथीदाण्याची पावडरची पेस्ट तयार करून त्वचेवर लावल्यास जळाल्याचे व्रण दूर होण्यास मदत होईल.


9. मेथीदाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करण्यास आणि हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते. दररोज तीन ग्रॅम मेथीदाण्याचे सेवन महिलांसाठी लाभदायक ठरते.

 



Wednesday, 8 June 2022

भवताल

 दोन महासागरांच्या महासंगमाची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी २७)

बेभान वाऱ्याला अंगावर घेत आणि खडकावर आदळणाऱ्या लाटांचा आवाज कानात साठवत आम्ही ‘तो’ सुळका चढून वर पोहोचलो... समोरचे दृश्य रोमांचित करणारे होते. डाव्या हाताला उबदार पण काहीसा शांत असा हिंदी महासागर, तर उजव्या हाताला खवळलेला आणि हुडहुडी भरवणारा अटलांटिक महासागर! बस्स, केवळ मान फिरवायचा अवकाश एकाच वेळी दोन्ही अथांग महासागरांचे विस्तीर्ण रूप डोळ्यांत साठवता येत होते. प्राचीन दीपस्तंभाजवळ लावलेली ‘नवी दिल्ली ९२९६ किलोमीटर’ ही पाटी आपण नेमके कोणत्या ठिकाणी आहोत हे सांगत होती. खाली सर्व बाजूंनी सुळक्याच्या पायथ्याकडे झेपावणाऱ्या लाटा आणि सागराच्या गर्जनेमुळे संमोहित झालो होतो... ठिकाण होते आफ्रिका खंडाचे दक्षिण टोक असलेला ‘केप पॉईंट’ अर्थात दोन महासागरांचा महासंगम!

आजच्या जागतिक महासागर दिनानिमित्त (८ जून) महासागरांच्या संगमाची ही गोष्ट!

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://www.bhavatal.com/CapePoint-Ocean

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी खास भवतालाच्या गोष्टी या सदरातील ही २७ वी गोष्ट)

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी - bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा.)

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


 बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा

-गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई.

            मुंबई, दि 8: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून मुंबई ते पुणे व पुणे ते कोल्हापूर या टप्प्यात बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे कडक कारवाई करावी, वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी भरारी पथक तैनात करावे, ही मोहीम कायमस्वरूपी राबवावी असे, निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.

            बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्याबाबत आज मंत्रालयात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार महेश शिंदे, गृहविभागाचे प्रधान सचिव(विशेष) संजय सक्सेना, वाहतूकचे अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, महामार्ग पोलीस अधिक्षक संजय जाधव, सुनिता साळुंखे-ठाकरे, परिवहनचे वरिष्ठ उपायुक्त अभय देशपांडे, तर दूरदृष्यप्रणालीद्वारे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, पुणे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक उपस्थित होते.

            गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मुंबई ते पुणे-कोल्हापूर येथील महामार्गावर बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे वाहतूकीची शिस्त बिघडते. अशा वाहन चालकांमुळे वाहतूक ठप्प होणे, अपघात, वाहतूक ठप्प झाल्याने सर्वसामान्यांना होणारा त्रास, विनाकारण प्रवासाला होणारा विलंब आदी समस्या उद्भवल्याचे निदर्शनास येत आहे. या वाहनचालकांवर कडक कारवाई केली पाहिजे. यासाठी महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीसांनी संयुक्तपणे कायमस्वरूपी मोहीम राबवावी. बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायमस्वरूपी भरारी पथकाची नियुक्ती करावी. यामुळे महामार्गावरील वाहतूकीला शिस्त लागेल.

            उपलब्ध मनुष्यबळातून दैनंदिन नियोजन करावे. राबविलेल्या मोहिमेचा परिणाम दिसावा, यासाठी काटेकोर नियोजन करून त्यांची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे, अशा सूचनाही गृहराज्यमंत्र्यांनी दिल्या. या महामार्गावरी पोल 36 ते 45 पर्यंत रात्री होणारे अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने दिव्यांच्या खांबांची तसेच इतर आवश्यक बाबींची व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. महामार्गावर निर्माण होणाऱ्या नैसर्गिक अडचणी सोडवूच, परंतु मानवनिर्मित अडचणींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.


००००

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बारावीच्या परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदनसंधीचे सोने करा, देशाचे भविष्य उज्वल करा.

            मुंबई, दि. ८ : बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

            मुख्यमंत्री संदेशात म्हणतात की, आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्व असतेच. परीक्षा भविष्यात येणाऱ्या आव्हानांची तयारी करून घेते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यानंतर सुरु होणाऱ्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. या वाटचालीतून तुम्हाला आपल्या कुटुंबियांसह, समाज आणि देशाचे भविष्य उज्वल करण्याची संधी मिळणार आहे, या संधीचे आपण सोने कराल, हा विश्वास आहे. काहींना या टप्प्यावर यशाने थोडक्यात हुलकावणी दिली असेल, अशांनीही खचून न जाता पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी केल्यास, यश तुमचेच असेल. त्यासाठीही शुभेच्छा.

0000

राज्य मंडळाच्या बारावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

            मुंबई, दि. 8 : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. बारावीची परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक टप्पा असून अंतिम साध्य नाही, त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शिक्षणाच्या बरोबरीनं कला, क्रीडा, तांत्रिक कौशल्य विकसित करुन जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

            राज्यात यंदा 94.22 टक्के विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थीनींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण दोन टक्के अधिक आहे. मुली या मुलांपेक्षा चांगली कामगिरी करत आहेत, ही सुद्धा समाधानाची बाब असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले. बारावीनंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारकीर्द ठरवण्याचा, भविष्यातील वाटचाल ठरवण्याचा निर्णय घ्यायचा असतो. विद्यार्थ्यांची आवड, कल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावा, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे.


००००



 सामाजिक न्याय विभागाकडील चारही महामंडळांच्या भागभांडवलात वाढलाभार्थींची संख्या वाढणार याचा आनंद

-.                                                      धनंजय मुंडे

            मुंबई, दि. 8 : 28 एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 4 महामंडळाचे भागभांडवल वाढवण्याचा निर्णय झाला होता. त्याची अंमलबजावणी होत असून, राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे.

            या शासन निर्णयानुसार महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे भागभांडवल पूर्वी 500 कोटी होते, ते वाढवून एक हजार कोटी करण्यात आले आहे. त्याचबरोबर संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे भागभांडवल 73 कोटींवरून वाढवून एक हजार कोटी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे भागभांडवल 300 कोटींवरून वाढवून एक हजार कोटी आणि राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे भागभांडवल 50 कोटींवरून दहा पटीने वाढवून 500 कोटी करण्यात आले आहे.

            महामंडळाच्या भागभांडवल वाढीसाठी राज्य सरकारने भरभरून निधी दिला असून अतिरिक्त निधी टप्याटप्याने महामंडळांना वितरित करण्यात येईल. या महामंडळांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्यक्ष लाभ मिळणाऱ्या गरजू लाभार्थींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून, त्यांना थेट लाभ मिळाल्याने त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचा विशेष आनंद असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मानले आहेत.

००००


Featured post

Lakshvedhi