Wednesday, 8 June 2022

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बारावीच्या परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदनसंधीचे सोने करा, देशाचे भविष्य उज्वल करा.

            मुंबई, दि. ८ : बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

            मुख्यमंत्री संदेशात म्हणतात की, आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्व असतेच. परीक्षा भविष्यात येणाऱ्या आव्हानांची तयारी करून घेते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यानंतर सुरु होणाऱ्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. या वाटचालीतून तुम्हाला आपल्या कुटुंबियांसह, समाज आणि देशाचे भविष्य उज्वल करण्याची संधी मिळणार आहे, या संधीचे आपण सोने कराल, हा विश्वास आहे. काहींना या टप्प्यावर यशाने थोडक्यात हुलकावणी दिली असेल, अशांनीही खचून न जाता पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी केल्यास, यश तुमचेच असेल. त्यासाठीही शुभेच्छा.

0000

राज्य मंडळाच्या बारावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

            मुंबई, दि. 8 : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. बारावीची परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक टप्पा असून अंतिम साध्य नाही, त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शिक्षणाच्या बरोबरीनं कला, क्रीडा, तांत्रिक कौशल्य विकसित करुन जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

            राज्यात यंदा 94.22 टक्के विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थीनींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण दोन टक्के अधिक आहे. मुली या मुलांपेक्षा चांगली कामगिरी करत आहेत, ही सुद्धा समाधानाची बाब असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले. बारावीनंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारकीर्द ठरवण्याचा, भविष्यातील वाटचाल ठरवण्याचा निर्णय घ्यायचा असतो. विद्यार्थ्यांची आवड, कल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावा, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे.


००००



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi