नेपाळ-तिबेट पूर आपत्ती : महाराष्ट्रातील नागरिकांच्या
सुरक्षिततेसाठी २४X७ समन्वय
- बेपत्ता नागरिकांच्या शोध व ओळखीसाठी केंद्र व राज्य यंत्रणांशी सातत्याने समन्वय
मुंबई, दि. १० : नेपाळ–तिबेट प्रदेशातील पूर आपत्तीमध्ये महाराष्ट्रातील नागरिक अडकले असल्याचे वृत्त प्राप्त होताच महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्र तातडीने २४x७ कार्यान्वित करण्यात आले. अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करणे, तिची पडताळणी करणे तसेच बचाव व मदतकार्याचा समन्वय साधण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत विविध स्तरांवर कार्यवाही करण्यात आली आहे असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.
नागरिकांची माहिती तातडीने संकलित करण्यासाठी वेब-आधारित लिंक विकसित करण्यात आली. तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती गोळा करून तिची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्राप्त अद्ययावत माहितीची यादी तात्काळ भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयासह संबंधित यंत्रणांना पाठविण्यात आली.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे नोंद असलेल्या ४०६ पर्यटकांपैकी ६७ नागरिकांचा अद्याप शोध लागलेला नसून, उर्वरित नागरिक महाराष्ट्रात सुखरूप परतले आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध, ओळख आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
यासाठी भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय, नेपाळ व चीनमधील भारतीय दूतावास, केंद्रीय फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, नवी दिल्ली, दूरसंचार विभाग तसेच बेपत्ता नागरिकांचे कुटुंबीय यांच्याशी सातत्याने समन्वय साधण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment