Thursday, 17 September 2026

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी कृष्णाखोरे, कोकणातील पाणी आणणार

 मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा

मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी कृष्णाखोरे,

कोकणातील पाणी आणणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            छत्रपती संभाजीनगर, दि. १७ (जिमाका)- मराठवाड्याचा आधी स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला आता दुष्काळाशी संघर्ष सुरु आहे. आताही  पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही परिस्थिती बदलवण्यासाठी  कोकणातील आणि कृष्णाखोऱ्यातील वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करु,असा शब्द आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.

 

            मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री फडणवीस छत्रपती संभाजीनगर येथे आयोजीत मुख्य शासकीय सोहळ्यास उपस्थित होते. श्री. फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण, मानवंदना, शहीदस्मारकास अभिवादन करण्यात आले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आज मोठ्या उत्साहात साजरा झाला.

 

            सिद्धार्थ उद्यान येथे आयोजीत या सोहळ्यास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, महापौर समीर राजूरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे, खा.संदिपान भुमरे, खा. डॉ. कल्याण काळे, विधानपरिषद सदस्य आ.सतिष चव्हाण, आ. अंबादास दानवे, आ. सुहास शिरसाट, विधानसभा सदस्य आ. रमेश बोरनारे, आ. प्रदीप जयस्वाल, आ. प्रशांत बंब, आ. विलास भुमरे, आ. अनुराधा चव्हाण, आ. नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, माजी खासदार चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, मुक्तिसंग्राम सैनिक, त्यांचे कुटूंबिय, शासकीय अधिकारी- कर्मचारी, पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi