‘आपले सरकार’ वेबपोर्टल लवकरच पूर्ववत;
तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम
– मंत्री ॲड.आशिष शेलार
मुंबई, दि. ३० : राज्यातील नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा पुरविणारे ‘आपले सरकार’ वेबपोर्टल तांत्रिक अडचणींमुळे तात्पुरते बंद असले तरी ते लवकरच पूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली. या अडचणी दूर करण्यासाठी तज्ज्ञ समिती युद्धपातळीवर कार्यरत असून, प्रणाली अधिक सक्षम आणि सुरक्षित बनविण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
२७ एप्रिलच्या रात्रीपासून तांत्रिक कारणास्तव बंद पडलेल्या या पोर्टलमुळे जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती अर्ज तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज यांसारख्या सेवांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. दररोज लाखो नागरिक या पोर्टलचा वापर करत असल्याने निर्माण झालेली गैरसोय लक्षात घेऊन शासनाने तातडीने उच्चस्तरीय पावले उचलली आहेत.
या पार्श्वभूमीवर मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच महाआयटीचे पदाधिकारी उपस्थित होते. तांत्रिक अडचणींचे मूळ कारण शोधून त्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आयटी तज्ज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञान प्रमुखांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने प्राथमिक तपासणी पूर्ण केली असून आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment