युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील
नागरिकांसाठी राज्य आत्पकालीन कार्य केंद्राकडून सूचना
मुंबई, दि. १ : इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्य-पूर्व व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून, परदेशात वास्तव्यास असलेल्या व अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक सूचना जारी केल्या असल्याची माहिती राज्य आत्पकालीन कार्य केंद्राकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार खात्याने, तसेच विविध भारतीय दूतावासांनी २४×७ आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित केले असून, राज्य शासन या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे, तसेच दूतावासाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नये
मध्य-पूर्व व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीत स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सुरक्षा सूचनांचे काटेकोर पालन करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच स्थानिक घडामोडींवर लक्ष ठेवावे. आपत्कालीन परिस्थितीत भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास नेहमीप्रमाणे कार्यरत आहे. भारतीय नागरिकांनी शांतता राखून परिस्थितीबाबत जागरूक राहावे आणि पुढील अधिकृत सूचनांची प्रतीक्षा करावी.
No comments:
Post a Comment