आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले, संस्थांनी सेवा देताना गुणवत्ता, पारदर्शकता आणि विभागाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या संस्थांची नियमित तपासणी व मूल्यांकन करावे. करारातील अटींचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरोधात दंडात्मक कारवाई, करार रद्द करणे, तसेच आवश्यक असल्यास काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात यावी. बाह्य संस्थांमार्फत कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन, यासह सर्व बाबींची काटेकोर तपासणी करावी, या कामात कुचराई करणाऱ्या व चुकीचे काम करणाऱ्या सेवा पुरवठादारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. बाह्य स्त्रोत्राद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, ज्यायोगे जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ घेता येईल. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले.
बैठकीत राज्यभर सुरू असलेल्या सिकल सेल ॲनिमिया, हत्तीरोग, क्षयरोग, मलेरिया रोग तपासणी व निर्मूलन मोहीम, माता मृत्यू दर कमी करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमांचा आढावा व सद्यस्थितीची माहिती घेण्यात आली. सामान्य नागरिकाला सरकारी दवाखाना हाच आधार आहे याची जाणीव ठेवून रुग्णांना चांगली वर्तणूक, व आरोग्य सेवा देण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले.
No comments:
Post a Comment