भारतीय स्त्रीशक्तीचे जगाला विराट दर्शन
-उपमुख्यमंत्री अजित पवार
· उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून
भारतीय महिला कबड्डी संघाचे विश्वविजेतेपदाबद्दल अभिनंदन
मुंबई, दि. २५ :- ढाका येथे झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चायनीज तैपेइचा ३५-२८ असा पराभव करून भारतीय महिला कबड्डी संघाने विश्वविजेतेपद पटकावले. भारतीय महिला खेळाडूंनी चिकाटी, जिद्द आणि संघभावनेच्या जोरावर जगासमोर भारतीय स्त्रीशक्तीचे विराट सामर्थ्य अधोरेखित केले आहे. हा विजय केवळ क्रीडाक्षेत्रातील पराक्रम नसून देशातील लाखो मुलींना प्रेरणा देणारा ऐतिहासिक क्षण आहे. भारतीय महिलांची विक्रमी कामगिरी नव्या भारताच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारी असून, त्यांच्या खिलाडूवृत्तीसह कठोर परिश्रमाला मनापासून सलाम करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी संघाचे अभिनंदन केले.
आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, भारतीय महिला कबड्डी संघाने दाखवलेली जिद्द, तंत्र आणि संघभावना प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. संजू देवी आणि उपकर्णधार पुष्पा यांच्या निर्णायक चढायांमुळे अंतिम फेरीत भारताने आघाडी घेत विजयाला गवसणी घातली. प्रशिक्षक तेजस्विनी बाई यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने पुन्हा एकदा जागतिक कबड्डीवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
No comments:
Post a Comment