महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचे सुशासनाचे तत्त्व आजही आदर्श
- सभापती प्रा. राम शिंदे
"सुशासन म्हणजे लोकहिताचा, न्यायाचा आणि संवेदनशीलतेचा समतोल राखणारी शासनव्यवस्था जेंव्हा-जेंव्हा सुशासनाची चर्चा होते, तेव्हा महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचे नाव श्रद्धेने घेतले जाते. यावर्षी त्यांच्या जन्माचा त्रिशताब्दी वर्षप्रवेश असून, संपूर्ण देशभरात त्यांचे कार्य नव्या पिढीसमोर पोहोचवण्याची गरज आहे. त्यांच्या कार्यपद्धतीतून आजच्या काळातही प्रेरणा घेण्यासारख्या अनेक बाबी आहेत," असे प्रतिपादन विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी चर्चासत्रात सांगितले.
लॉर्ड थॉमस लॉरेन्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय विचारवंतांनी त्यांचे वर्णन 'फिलॉसॉफर क्वीन ऑफ इंडिया' असे केले. त्यांनी महिलांसाठी सैन्यतुकडी स्थापन करणे, शेतकऱ्यांना करमाफी देणे, विहिरी-तलावांच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे, भूमापन आणि अभिलेख तयार करणे अशा अनेक प्रशासनिक सुधारणांद्वारे लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासनाची मुहूर्तमेढ रोवली.
या अनुषंगाने 'भिलकौडी प्रयोग' हे सुशासन आणि संवेदनशीलतेचा अद्वितीय संगम असल्याचे उदाहरण पुढे आले. महाराणी अहिल्यादेवी यांनी भिल्ल समाजाला प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी दिली. बदल्यात त्यांना ‘एक कौडी’ शुल्क ठरवले. या प्रयोगातून भिल्ल समाजाला रोजगार मिळाला आणि प्रवाशांना संरक्षण. सुशासन हे केवळ नियमांचे पालन नव्हे, तर समाजाच्या सर्व घटकांना समाविष्ट करून शाश्वत उपाय शोधणे आहे. ही भूमी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची असून, त्यांनी संसदीय लोकशाहीला जबाबदारी, सहकार आणि नैतिकतेचे प्रतीक मानले. हे चर्चासत्र सुशासनाच्या परंपरेला चालना देणारे ठरेल, असा विश्वास विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment