Friday, 3 November 2023

मुंबई लोकलचे धावते जग*

 *मुंबई लोकलचे धावते जग*


   मुंबई मध्ये लोकलने प्रवास करणाऱ्यांचे एक स्वतंत्र जग आहे.....प्रत्येकाचा एक ७.५९- 

९.१३, ५.२३, ६.०३ अशा लग्नाचा मुहूर्त असल्यासारख्या वेळा असलेल्या गाड्याचे ग्रुप असतात. आपली नेहमीची ट्रेन इंडिकेटरला लावलेली असली की तो एकदम कम्फर्टेबल असतो चढायला कितीही गर्दी असली तरी 

त्याला त्याची चिंता नसते....

आणखी एक खासियत असते. प्रत्येकाचा डबा ठरलेला, डब्याला तीन दरवाजे असतात, त्यातला दरवाजा ठरलेला, इतक्यावर थांबत नाही, त्या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे मुसंडी मारायची की उजवीकडे हेदेखील ठरलेलं असतं.... अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा डोळा दिसत असतो तसं त्याला आपण पकडायची सीट दिसत असते....नेहमीची जागा पकडली की आजचा दिवस चांगला जाणार ह्याची त्याला 

खात्री पटते.....जागेवर बसल्या नंतर शेजारी आपले सखे सोबती आहेत ना याची खातरजमा केली जाते....मग गप्पा ,भंकस,तर काही ग्रुप मध्ये भजन,तर काही जण पत्ते काढतात....

Ladies डब्यात अशीच परिस्थितीअसते .....

भजन, पत्ते मात्र नसतात,

तिथेही आपला सगळा ग्रुप जमला की नाही ते बघितलं जातं.....गप्पा लगेचच सुरू होतात....त्यात एकमेकींच्या साड्या, ड्रेस, हेअर स्टाईल, मुलंबाळं, त्यांची आजारपणं,  

शिक्षणातली प्रगती.....अनेक विषय....क्वचित घरच्या,ऑफिसच्या कुरबुरी.....ह्या ग्रुप मध्ये वय वर्षे २० ते ६० एवढी 'रेंज'असते.....प्रत्येकीचा वाढदिवस साजरा करण्यात येतो, शिवाय केळवण,डोहाळेजेवण, कोणी रिटायर होणार असेल तिला सेन्डऑफ....त्याशिवाय हळदीकुंकू भोंडला....सगळं यथासांग पार पाडलं

जातं...... खायचं प्यायचं एकेक जण स्वतः करून किंवा विकत घेऊन येणार....पेपर डीश, चमचे, टिशू पेपर सगळं साग्रसंगीत.


आपल्या नेहमीच्या गाडी बद्द्ल प्रत्येकाला विशेष जिव्हाळा असतो.....दसऱ्याला लवकर येऊन त्या गाडीचे प्रवासी गाडी, आपला डबा सजवतात. गाडीचा मोटरमन, गार्ड रिटायर होतो तेव्हा गाडीचे नेहमीचे प्रवासी त्याला निरोप देतात.....प्लॅटफॉर्म वरच.....अतिशय हृद्य असा सोहळा असतो तो.....


लोकल मधलं शॉपिंग हा आणखी एक पैलू..... सकाळच्या वेळी,टिकल्या, रुमाल, पर्सेस, कानातले, बांगड्या, हेअरपीन्स ,थंडीत स्कार्फ, मफलर ह्या गोष्टी विकणाऱ्यांचा सुळसुळाट..... आणखी एक व्हरायटी स्टोरमध्ये मिळतात तेव्हढ्या वस्तू विकणारा असतो.... लायटर, बॅटरी, सेलोटेप, नेलकटर, कात्री, इअरबड्स, नाडी बंडल.....हे सगळं एका हुक वर अडकवलेले.....

चार साडे चार नंतर भाजीवाल्या, फळवाल्या, फ्रायम ,वेफर्स, चकल्या,राजगिरा लाडू यांची छोटी छोटी पाकिटं विकणारे.....त्यात भाजीवाल्यांना जास्त डिमांड.....कारण भाजी खरेदी झाली की मोठं काम झालं....अनेक बायका पालेभाजी घेतली तर ती निवडायचं काम पण गाडीतच उरकून घेतात....

फुलवाल्या, गजरेवाल्याचाही फेरा होतो .मुसळधार पाऊस पडत असतांना सोनचाफ्याची फुलं, मोगऱ्याचे, जाई जुई चे गजरे विकणारी चढली की अख्ख्या डब्याला वर्दी मिळते.....ह्या फेरीवाल्यांची चढायची उतरायची स्टेशन ठरलेली असतात .... सेंट्रल रेल्वे वर विद्याविहार, कांजूर, नाहूर..... जिथे एक आणि दोन प्लॅटफॉर्म एकत्र असतात.....एक चिकुवाली किंवा संत्र वाली असेल तर ती गाडीतूनच आवाज देणार "चिकुवाली हाय गं" म्हणजे प्लॅटफॉर्म वर कोणी चिकुवाली असेल तर ती गाडीत चढणार नाही......एकाच डब्यात दोन दोन चिकुवाल्यांचा 'बिझिनेस' कसा होणार? शाळेचं तोंड सुद्धा न पाहिलेल्यांची ही 'बिझिनेस मॅनेजमेंट'

कौतुकास्पदच......


या प्रवाशांची परिभाषा पण ठरलेली असते ..... किचन ..म्हणजे डब्यातील सगळ्यात टोकाचा छोटा भाग.

पूर्वी गाड्या बारा किंवा नऊ डब्याच्या असत.... सतत इंग्लिश मध्ये बोलणाऱ्या तामिळ ,केरळी बायका सुद्धा त्या गाड्यांना, बारा डब्बा, नऊ डब्बा' असेच म्हणणार....


समानता हे ह्या जगाचं वैशिष्ट्य रेल्वे स्टेशन बाहेर बायका कोणीही असोत एकदा का गाडीत चढल्या की सगळ्या 'प्रवासी'होतात....बँकेत मोठ्या हुद्द्यावर असणारी, कोर्टात वकिली करणारी, दुकानात सेल्स गर्लचं काम करणारी, कोणी प्रायव्हेट कंपनीत काम करणारी....सगळ्या जणी गुण्यागोविंदाने डब्यात नांदत असतात.....


 या जगात सचोटी तर ओतप्रोत भरलेली असते.... कुठल्याही विक्रेत्याचे पैसे बुडत नाहीत.....कानातले विकणारा, कानातल्याचे बॉक्स खरेदी करणाऱ्या बाई कडे देऊन दरवाज्यात हवा खायला जातो....आपण समोर नसताना एखादं कानातले कोणी पर्स मध्ये टाकेल अशी शंका सुद्धा त्याच्या मनात येत नाही ......त्याचा विश्वास अगदी सार्थ असतो..... उलट त्याला उतरायची घाई असेल आणि पैसे पर्स मधून काढेपर्यंत तो उतरला तर खिडकीतून त्याला हाका मारून, किंवा प्लॅटफॉर्म वरच्या एखाद्या दुसऱ्या विक्रेतीचं लक्ष वेधून तिच्याकडे ते पैसे कानातलंवाल्याला द्यायला सांगितले जातात....ती पण त्याचा शोध घेऊन त्याचे पैसे देते.....यातलं कोणीही फारसं श्रीमंत नसतं.... पैसे ढापले,बुडवले तरी पकडलं जाण्याची शक्यता नसते....तरी कोणी कोणाला फसवत नाही......चिकू वाली चिकूची मोठी टोपली एका ठिकाणी ठेवून डबाभर फिरत असते पण तिच्या टोपलीतून चिकू निवडून घेताना एखादा जास्त चिकू घेतला जात नाही....


परोपकार हा तसा मुंबईचाच गुण..... त्यामुळे तो गाडीत दिसतोच दिसतो.... तुफान गर्दी असलेल्या ट्रेन मध्ये एखादीला चक्कर आली तर तिला सावरायला अनेक हात पुढे येतात..... महत्प्रयासाने मिळालेली विंडो सीट तीला बसायला दिली जाते....मग पाणी,लवंग,वेलची, आवळा सुपारी,कॅडबरी ह्या गोष्टी ऑफर केल्या जातात...... ती कुठे उतरणार आहे ते विचारुन त्या स्टेशन वर उतरणारी कोणीतरी तिची जबाबदारी घेते.....तिला हाताला धरून स्टेशन वर उतरते.....ती सावरली असेल तर रिक्षात बसवून दिले जाते.....आणि हे सर्व नावगाव सुद्धा माहीत नसलेल्या बाई करतात....आणि कसलीही अपेक्षा न ठेवता.....त्याचा गाजावाजा न करता....


अजून अनेक गोष्टी,किस्से सांगता येतील....त्याला अंत नाही....पण आता आवरतं घेते.....


 चैतन्य, उत्साह, सचोटी,आपुलकी, निरपेक्ष परोपकार,अशा दुर्मिळ गुणांनी 

ठासून भरलेल्या ह्या धावत्या जगाला सलाम.


*मेधा दीक्षित*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi