मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गतशेततळ्यास अनुदान मर्यादा वाढवली.
- कृषीमंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 6 : वाढती महागाई व डिझेलच्या दरात झालेली वाढ यासारख्या विपरीत परिस्थितीमुळे शेततळे खोदकाम करून जलसंचय करणे हे शेतकरी बांधवांना खर्चिक ठरत होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेततळे अनुदानाची मर्यादा 50 हजार रुपयांवरून 75 हजार रुपये करण्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
कृषी मंत्री श्री.भुसे म्हणाले, राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी शासनाने शेतकऱ्यांचे हित नजरेसमोर ठेवून अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले आहेत. राज्यात कोरडवाहू क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता, टंचाई परिस्थितीत शेतकरी बांधवांना पीक जगवणे जिकीरीचे ठरत होते. यापूर्वी शेततळे खोदकामासाठी 50 हजार रुपये अनुदान देण्यात येत होते. आता हे अनुदान 75 हजार रुपये इतके देण्यात येणार आहे. या शेततळे योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी बांधवांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन कृषीमंत्री श्री.भुसे यांनी केले आहे. प्रतिकूल हवामान परिस्थितीतही शेतकरी बांधवांनी शेततळे व त्यावर आधारित फळबाग लागवड ही शेतीपद्धती आत्मसात करून कृषि निर्यातीत महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेले असल्याचेही श्री.भुसे यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment