'वॉक फॉर वॉटर’मधून महाराष्ट्रात जलसंधारणाची लोकचळवळ अधिक बळकट
– मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
मुंबई, दि. २४ : माती वाचवणे, पाणी जपणे आणि जलसंधारणाच्या कार्याला व्यापक लोकसहभागाची जोड देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील ३६ जिल्ह्यांत एकाचवेळी झालेल्या या उपक्रमात तीन लाखांहून अधिक नागरिक सहभागी झाले. या सहभागातून जलसंधारणाचा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला, असे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
जलसंधारण हा केवळ शासनाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या भवितव्याशी निगडित विषय आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांना लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने ‘वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा महाराष्ट्रातील जनतेची जलसंधारणाबाबतची जागरूकता आणि सहभागाची भावना अधोरेखित करणारा आहे, असे मंत्री राठोड यांनी सांगितले.
प्रत्येक सहभागीने तीन किलोमीटर अंतर चालत जलसंधारणाचा संदेश दिला. तीन लाखांहून अधिक नागरिकांच्या सहभागातून हा सामूहिक प्रवास पूर्ण झाला. ही केवळ आकडेवारी नसून माती आणि पाणी संवर्धनासाठी महाराष्ट्राच्या जनतेने व्यक्त केलेली सामूहिक बांधिलकी आहे, असेही त्यांनी नमूद केले.