Thursday, 29 September 2022

JSW गुंतवणूक

 जेएसडब्ल्यू सोबत सामंजस्य करारकोकणात होणार 4 हजार 200 कोटींची गुंतवणूक

- उद्योगमंत्री उदय सामंत

· पेण येथे होणार ९६० मेगावॅटचा पीएसपी प्रकल्प.

            मुंबई, दि. 29 : जेएसडब्ल्यू आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभाग यांच्यामध्ये पेण (रायगड) येथील निओ एनर्जी प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या माध्यमातून कोकणात सुमारे ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक आहे. पेण येथे ९६० मेगावॅटचा पीएसपी प्रकल्प उभा राहणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

            सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग मंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी.अनबलगन, कंपनीचे शिष्टमंडळ व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

स्थानिकांना रोजगाराच्या संधी

            जेएसडब्ल्यूच्या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. जास्तीत - जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभाग काम करीत असल्याचे उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

            मंत्री श्री. सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणारे हे शासन आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यामध्ये ७५ हजार तरूणांना रोजगार देण्याचा मानस राज्य सरकारचा असून त्याअनुषंगाने उद्योग विभाग कार्य करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


***

पुरस्कार

 गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयलयांना लोक प्रशासन पुरस्कार.

          मुंबई, दि. 29 : भारतीय लोकप्रशासन संस्थेच्यावतीने देण्यात येणारा लोकप्रशासन 2021-2022 मधील नवोपक्रमासाठीचा ‘स्व.डॉ. एस एस. गडकरी स्मृती’ पुरस्कार गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना आज येथे जाहीर करण्यात आला.

            मंत्रालयातील समिती कक्ष येथे भारतीय लोकप्रशासन संस्थेची महाराष्ट्र प्रादेशिक शाखेची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. त्यामध्ये हा पुरस्कार घोषीत करण्यात आला. संस्थेचे मानद अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे सचिव डॉ. विजय सतबीर सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.


            श्री. क्षत्रिय म्हणाले, राज्यासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने संस्थेचे बरेच उपक्रम राबविणे शक्य झाले नाही. ते उपक्रम आता आपण मोठ्या प्रमाणात राबवणार आहोत. कोरोनाच्या काळात काही उपक्रम आपण दूरदृष्यप्रणालीद्वारे राबविण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी उपस्थित सदस्यांनी विविध सूचना मांडल्या.


            शाखेच्या आगामी उपक्रमाविषयी बोलताना श्री. क्षत्रिय म्हणाले, बी.जी. देशमुख निबंध स्पर्धा 2022-2023 साठी ‘नेतृत्व आणि समाजात महिलांची विकसित भूमिका’, ‘शहरातील प्रशासनातील बदल आणि आव्हाने’ हे दोन विषय असून अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याचबरोबर डॉ. एस. एस. गडकरी यांच्या नामांकनासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव मागविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.



भवताल

 नमस्कार.


“भवताल” मासिकाचा सप्टेंबर २०२२ चा अंक शेअर करत आहोत.

या अंकात पुढील महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे=

• भारताच्या उंबरठ्यावर? (पाकिस्तानातील भयंकर पुरांचा भारताशी संबंध) 

• लाल गळ्याचा माशीमार (फॅक्ट्स अँड फिगर्स)

• जळूपुराण (रक्त पिणाऱ्या जळूचे दोन भिन्न अनुभव)

• 'लख्ख' प्रदूषण (प्रकाशाची दुसरी बाजू)

• भवताल कट्ट्याची पन्नाशी

• इको - अपडेट्स

या अंकासोबत अंकाचे कव्हर आणि अंकासाठी नावनोंदणी करण्याची लिंकही देत आहोत.

कव्हर आणि लिंक आपल्या संपर्कात शेअर करावी. त्यांनाही "भवताल" मासिकासाठी नावनोंदणी करायला सांगावे आणि पर्यावरणविषयक दर्जेदार मजकूर वाचण्याचे आवाहन करावे, ही विनंती.

नावनोंदणीसाठी लिंक:

https://bhavatal.com/connectus/masik-nondani-information

- टीम भवताल

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


दिलखुलास

 दिलखुलासकार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे

मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांची मुलाखत

 

           मुंबईदि. 29: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासया कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त (अ.का.) दिलीप शिंदे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआरया ॲपवर शुक्रवार  दि. 30 सप्टेंबर आणि शनिवार दि. 1 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.

             महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015’ आणि सेवा पंधरवडा याविषयी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून माहिती दिली आहे. राज्यातील नागरिकांना पारदर्शकगतीमानकालबद्ध सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015’ पारित करण्यात आला आहे. नागरिकांना अधिकार देणारा आणि प्रशासनाला उत्तरदायी करणारा हा क्रांतिकारी कायदा आहेअसे  मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी सांगितले.

000

मूर्तींचे छायाचित्र व चलचित्र काढण्यास बंदी

 विसर्जनानंतर पाण्यात तरंगणाऱ्यामूर्तींचे छायाचित्र व चलचित्र काढण्यास बंदी

            मुंबई, दि. 29 : नवरात्र उत्सवाच्या मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात वाहून न गेलेल्या देवी मूर्तींचे छायाचित्र काढून त्याचा प्रसार होतो. यामुळे जनमानसाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. अशा मूर्तींचे छायाचित्र व चलचित्र काढण्यास बंदीचे आदेश आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बृहन्मुंबईचे पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

            बृहन्मुंबईमध्ये होणाऱ्या देवी मूर्तीच्या विसर्जनानंतर अर्धवट विरघळलेल्या मूर्ती भरतीच्या वेळी किनाऱ्यावर वाहून येतात किंवा तरंगतात. या मूर्ती महानगरपालिकेचे कर्मचारी गोळा करतात. दि. 5 ते 7 ऑक्टोबर दरम्यान विसर्जनाच्या प्रसंगाचे छायाचित्र काढणे, चलचित्र काढणे, प्रकाशित करणे आणि प्रसारित करण्यास बंदीचे आदेश आहेत. कलम 144 अन्वये विशेष अधिकारान्वये पोलीस उप आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. नमुद कालावधीनंतर आवश्यक असल्यास यासंदर्भातील आदेशाची अंमलबजावणी केली जाऊ शकते, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


००००

विद्या पीठ निवड समिती

 राज्यपालांकडून मुंबई, पुणे व संस्कृत विद्यापीठासाठी

कुलगुरु निवड समिती गठीत.

            मुंबई, दि. 29 : राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठांच्या कुलगुरु निवडीसाठी तीन स्वतंत्र निवड समिती गठीत करण्यात आली आहे.

            मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरु निवडीसाठी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती यतींद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. आयआयटी (बनारस हिंदू विद्यापीठ) वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोद कुमार जैन व राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये हे या निवड समितीचे सदस्य असतील.

            सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरु निवडीसाठी राज्यपालांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती शुभ्र कमल मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. आयआयटी कानपूरचे संचालक डॉ. अभय करंदीकर व शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर हे या समितीचे सदस्य असतील.

            कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या नव्या कुलगुरु निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप कुमार जोशी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली आहे. वेरावळ गुजरात येथील श्री सोमनाथ संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू गोपबंधू मिश्र व राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी हे या समितीचे अन्य सदस्य असतील.

००००

Governor constitutes Search Committees for selection of Mumbai, Pune and Sanskrit Varsity VCs

            Mumbai, 29th Sept : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari in his capacity as Chancellor of universities has constituted search committees for the selection of new vice chancellors for the University of Mumbai, Savitribai Phule Pune University and the Kavikulaguru Kalidas Sanskrit University.

            Justice Yatindra Singh (Retd.) former Chief Justice of Chhattisgarh High Court will be the Chairman of the Search Committee for the selection of new vice chancellor for the University of Mumbai.

            Prof. Pramod Kumar Jain, director IIT (BHU) Varanasi and Anand Limaye, Additional Chief Secretary (Home) will be the other members of the committee.

            The search committee for the selection of new vice chancellor of the Savitribai Phule Pune University will be chaired by Justice Subhro Kamal Mukherjee, former chief justice of the high court of Karnataka.

            Dr Abhay Karandikar, Director, IIT Kanpur and Deepak Kapoor, Additional Chief Secretary, Government of Maharashtra will be the other members of the Committee.

            The Governor has also constituted a Search Committee for the selection of new vice chancellor of the Kavikulaguru Kalidas Sanskrit University.

            The committee will be led by former chairman of Union Public Service Commission Prof. Dr. Pradeep Kumar Joshi. Prof. Gopabandhu Mishra, former vice chancellor of Shree Somnath Sanskrit University, Veraval, Gujarat and Vikas Chandra Rastogi, Principal Secretary of the higher and technical education department will be the other members of the committee.

0000


 

जनजागृती

 गावांमध्ये स्वच्छतेच्या सातत्यासाठी सरपंचांनी जनजागृती करावी

- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

'स्वच्छता ही सेवा' अभियानअंतर्गत सरपंच संवाद.

            मुंबई दि. 29 : गावांमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहावे, ग्रामस्थांचे आरोग्य सुधारावे यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेचे महत्व पटणे आवश्यक आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सरपंचांनी सक्रिय पुढाकार घेतल्यास गावाचा विकास अधिक गतीमान होवू शकतो, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.


            दि.१५ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर या कालावधीत 'स्वच्छता ही सेवा' अभियानाचे आयोजन केंद्र व राज्य शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या अभियानात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली "स्वच्छता के लिए एकजुट भारत' मोहिमेअंतर्गत सरपंच संवादाचे ऑनलाईन प्रणालीव्दारे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यातील प्रत्येक तालुका पंचायत समिती कार्यालयातून संबधित तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, पंचायत समितीचे पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


            पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील म्हणाले, "स्वच्छता ही सेवा" या उपक्रमांतर्गत गावागावांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यात यावी. गावातील कचराकुंडया व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई, कचरा स्त्रोतांच्या ठिकाणी सुका व ओला कचरा वेगळे करण्यासाठी जनजागृती उपक्रम, श्रमदान यासारखे उपक्रम घ्यावेत. कचरा संकलन आणि विलगीकरण करण्यासाठी केंद्राची निर्मिती, प्लॅस्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन, एकल प्लॅस्टिक वापराच्या (SUP) दुष्परिणामांबद्दल सभेचे आयोजन करावे. पाणवठ्याजवळील परिसर स्वच्छ ठेवून त्यांच्या सभोवताली वृक्षारोपण करणे, यासारखे विविध उपक्रम सरपंचानी आयोजित करावेत, असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.


            ग्रामपंचायती हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्यासाठी प्रयत्न करून दि २ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वच्छतेची प्रतिज्ञा घ्यावी, दि २ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वच्छ भारत दिवस निमित्ताने ग्रामसभांचे आयोजन करुन हागणदारी मुक्त अधिक (ODF Plus) अंतर्गत विविध घटकांची कामे पूर्ण झालेल्या गावांचे ODF Plus अंतर्गत ठराव घ्यावेत, अशा सूचनाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.


            गतवर्षात केंद्र शासनाने निश्चित करून दिलेल्या विविध अभियान अंतर्गत देशस्तरावरील १ आणि पश्चिम विभागीय राज्यामध्ये विविध ०६ पारितोषिके राज्याला प्राप्त झाली आहेत. तसेच स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) २०२१ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयाला पश्चिम विभागीय राज्यामध्ये द्वितिय क्रमांक प्राप्त झाला आहे. ही सर्व पारितोषिके सरपंचांनी स्वच्छता मोहिमेला दिलेल्या नेतृत्वामुळे असल्याचे नमूद करून मंत्री गुलाबराव पाटील यांनी या सर्वांचे अभिनंदन केले.


            सद्यस्थितीत राज्यात ३ हजार ८८६ गावे हागणदारीमुक्त अधिक (ODF PLUS) म्हणून गावांनी ग्रामसभेमध्ये ठराव पारित करुन सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीने जाहीर केली आहेत. यामध्ये २ हजार ९८० गावे थ्री स्टार (मॉडेल) या प्रवर्गामध्ये जाहीर केली आहेत. त्याबदल मंत्री श्री. पाटील यांनी सरपंचांचे अभिनंदन केले.


            सरपंच संवादामध्ये औरंगाबाद, नांदगाव, रोहा, वाशीम, वाळवा, कोरेगाव, ब्रम्हपुरी या तालुक्यातील सरपंचांनी उपस्थित केलेल्या स्वच्छतेच्या व जल जीवन अभियानासंदर्भातील विविध मुद्यांवर मंत्री श्री. पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत राज्यात झालेल्या प्रगतीची माहिती, सहसचिव तथा अभियान संचालक, अभय महाजन यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांनी केले.


-----०००-----



Featured post

Lakshvedhi