Wednesday, 26 August 2026

डिजिटल अरेस्ट’ सारखा प्रकार नाहीच; सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० वर तत्काळ संपर्क साधाpl शेअर

 डिजिटल अरेस्टसारखा प्रकार नाहीच; सायबर फसवणूक झाल्यास तातडीने

१९३० वर तत्काळ संपर्क साधा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती हा सर्वात प्रभावी उपाय

'डिजिटल अरेस्टसायबर जनजागृती लघुपटाचे आणि १९३० महाराष्ट्र सायबर अँथमचे लोकार्पण

 

मुंबई, दि. २६ : सायबर गुन्हेगारांकडून पोलीस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावाने नागरिकांना भीती दाखवून, घाबरवून फसवणूक केली जाते. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारांना बळी न पडता सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३०या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र सायबरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल अरेस्टया सायबर जनजागृती लघुपटाचे आणि १९३० महाराष्ट्र सायबर अँथमचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, पोलीस महासंचालक सदानंद दाते, अतिरिक्त पोलीस महासंचालक (सायबर) संजय शिंत्रे, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र सायबर सेलचे प्रमुख यशस्वी यादव उपस्थित होते.

यावेळी लघुपट व १९३० महाराष्ट्र सायबर अँथम मध्ये योगदान देणारे कलाकार आशिष विध्यार्थी, पंकज त्रिपाठी, शरद केळकर, सोनाली बेंद्रे, जावेद जाफरी, गायिका सुनिधी चौहान, अभिषेक बॅनर्जी, मंगेश देसाई, समय रैना आदी कलाकार उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सायबर फसवणुकीनंतरचा गोल्डन अवरअत्यंत महत्त्वाचा असून, या काळात तक्रार नोंदविल्यास फसवणुकीची रक्कम रोखण्याची किंवा परत मिळविण्याची शक्यता अधिक असते. मात्र नागरिकांकडून तक्रार नोंदविण्यास तीन ते पंधरा दिवसांचा विलंब झाल्यास पैसे अनेक खात्यांमधून वळविले जातात आणि त्यांची रिकव्हरी अत्यंत कठीण होते. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विलंब न करता १९३० वर संपर्क साधणे आवश्यक आहे.

मोबाईल, ऑनलाइन व्यवहार, विविध पेमेंट गेटवे आणि डिजिटल माध्यमे ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत. तंत्रज्ञानामुळे जीवन सुलभ झाले असले, तरी त्याचबरोबर नागरिक सायबर गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यताही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगारांचा मुकाबला करण्यासाठी पोलिस यंत्रणेला आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासोबतच नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi