लोकसहभागातून २०३० पूर्वी क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य साध्य करू
- राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर
क्षयरोग निर्मूलनासाठी शासनाच्या प्रयत्नांना समाजातील विविध घटकांची साथ आवश्यक आहे. सर्वांच्या सहभागातून २०३० पूर्वी क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य निश्चितपणे साध्य करता येईल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी व्यक्त केला.
राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले की, केंद्र किंवा राज्य शासन एकट्याने सामाजिक बदल घडवू शकत नाही. त्यासाठी नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील सहकाऱ्यांचा सक्रिय सहभाग व सहकार्य आवश्यक आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली क्षयरोगमुक्त भारत अभियानाशी संबंधित ‘निक्षय मित्र’ उपक्रम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः निक्षय मित्र झाले असून, अनेक लोकप्रतिनिधी आणि समाजातील नागरिकांनीही या उपक्रमात सहभाग घेतला आहे. क्षयरुग्णांना औषधांसह आवश्यक प्रथिनयुक्त आहार उपलब्ध करून देण्यासाठी निक्षय मित्र योगदान देत आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये रजोनिवृत्ती आणि पीसीओडीसाठी स्वतंत्र दवाखाने सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी सांगितले. पीसीओडीमुळे अनेक किशोरवयीन मुलींना शारीरिक तसेच मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर संबंधित आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम महत्वाचा ठरत आहे.
No comments:
Post a Comment