अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टात जीसीसी ची महत्वपूर्ण भूमिका
महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टात जागतिक क्षमता केंद्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ही केंद्रे केवळ भांडवल घेऊन येत नाहीत, तर ज्ञान, जागतिक कार्यपद्धती, संशोधन व विकास, नेतृत्व आणि उच्च मूल्याधारित रोजगार घेऊन येतात. महाराष्ट्रातील प्रतिभावान मनुष्यबळाला ही केंद्रे थेट जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडतात आणि जागतिक पातळीवरील निर्णयक्षमतेचे सघन केंद्र निर्माण करतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.
उद्योग, शासन आणि शिक्षण क्षेत्राच्या संयुक्त प्रयत्नातून महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी भारतातील आघाडीचे आणि सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनविण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, महाराष्ट्र हे केवळ ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सच्या ऑपरेशन्सचे केंद्र न राहता नवोन्मेष, संशोधन, उत्पादन विकास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र बनावे, ही राज्याची महत्वाकांक्षा आहे. पुण्याची मजबूत तंत्रज्ञान परिसंस्था, कुशल मनुष्यबळ आणि आयटी व उत्पादन क्षेत्राचा अनोखा संगम यामुळे एआय, रोबोटिक्स, सायबर सिक्युरिटी, अॅडव्हान्स्ड इंजिनिअरिंग आणि आरअँडडीसाठी पुणे सक्षम ठरत आहे.
जीसीसीच्या माध्यमातून रोजगारासोबतच संशोधन, बौद्धिक संपदा आणि जागतिक संधी निर्माण होत असून, महाराष्ट्रातील युवकांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सक्षम करण्यावर शासनाचा भर आहे. उद्योग, शिक्षणसंस्था, स्टार्टअप्स आणि शासन यांच्या समन्वयातून महाराष्ट्राला तंत्रज्ञान व नवोन्मेषाचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
गुंतवणूकदारांना आवश्यक पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी, डिजिटल व्यवस्था आणि व्यवसाय सुलभता उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. ‘महाराष्ट्र तयार आहे, पुणे तयार आहे,’ असा विश्वासही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
जीसीसीप्रोजचे मुख्य सल्लागार निलेश देशमुख यांनी या एक दिवशीय परिषदेची भूमिका विशद केली. शासनाच्या सकारात्मक सहकार्याबद्दल त्यांनी राज्य शासनाला धन्यवाद दिले
No comments:
Post a Comment