पुलगाव-आर्वी, मूर्तिजापूर–यवतमाळ, मूर्तिजापूर–अचलपूर रेल्वे प्रकल्पाला
गती देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी पाठपुरावा सुरू
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. ८ : पुलगाव-आर्वी, मूर्तिजापूर–यवतमाळ, मूर्तिजापूर–अचलपूर या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तन प्रकल्पासाठी राज्य शासन पूर्वीप्रमाणेच ५० टक्के आर्थिक हिस्सा उचलण्यास तयार असून, या प्रकल्पाला लवकर मंजुरी मिळून कामाला गती मिळावी यासाठी केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली.
परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–हावडा ब्रॉडगेज मार्गावरील मूर्तिजापूर जंक्शनपासून अचलपूर आणि यवतमाळ या मार्गांवरील रेल्वे सेवा सध्या बंद आहे. या रेल्वे मार्गाच्या पुनर्बांधणीसाठी आणि गेज परिवर्तनासाठी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे अंतिम स्थान सर्वेक्षण (फायनल लोकेशन सर्व्हे) पूर्ण झाले आहे.
२०१७ मध्ये प्रकल्पाच्या खर्चातील ५० टक्के हिस्सा उचलण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आला होता. या प्रकल्पाचा खर्च आता वाढला असला तरी वाढीव खर्चासह ५० टक्के हिस्सा उचलण्याची राज्य शासनाची तयारी असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले
No comments:
Post a Comment