‘एआय’च्या वापराबाबत एसओपी तयार करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करणार
– गृह राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई, दि. 30 : कृत्रिम बुद्धिमत्ता (‘एआय’) आधारित अत्याधुनिक साधने आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता, त्याचा गैरवापर रोखण्यासाठी राज्य शासन एआयच्या वापराबाबत प्रमाणित कार्यपद्धती (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर – एसओपी) तयार करणार आहे. यासाठी तज्ज्ञांची समिती पुढील 30 दिवसांत स्थापन करण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य सना मलिक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री कदम बोलत होते.
राज्यमंत्री कदम म्हणाले की, एआयच्या माध्यमातून व्यक्तींची ओळख पटविणे, संभाषणांचे विश्लेषण करणे तसेच विविध प्रकारची वैयक्तिक माहिती संकलित करण्याची क्षमता वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या गोपनीयतेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याच्या वापरासाठी स्पष्ट नियमावली असणे आवश्यक आहे.
ते म्हणाले की, व्यक्तीची वैयक्तिक माहिती विनापरवानगी संकलित करणे किंवा तिचा गैरवापर करणे याविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कारवाईची तरतूद आहे. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता आणि व्यापक वापर लक्षात घेता, त्याच्या वापराची व्याप्ती, मर्यादा, निर्बंध आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करणारी एसओपी तयार करणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment