Monday, 1 June 2026

कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट

 कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि

पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट

-पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर राज्य शासनाचा भर

मुंबई, दि. १ जून : कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून राज्यातील पशुपालन व्यवसायाला भरभराटी आणावी, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे केले. 

'कारगिल' कंपनीने 'सिजेंटा फाउंडेशन इंडिया' आणि 'डिजिटल ग्रीन इंडिया' यांच्या भागीदारीत महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात 'एकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रम' सुरू केला आहे. मंत्रालयात आयोजित या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात श्रीमती मुंडे बोलत होत्या. 

विभागाचे सचिव एन. रामास्वामी, कारगिल इंडियाचे अध्यक्ष आणि कारगिल ॲनिमल न्यूट्रिशन अँड हेल्थचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक रविंदर बलाईन, डिजिटल ग्रीन इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी भसीन आणि सिनजेंटा फाउंडेशन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम बोराडे आदी उपस्थित होते. तर अहिल्यानगर जिल्ह्यातून पशुपालक शेतकरी आणि इतर संबंधित व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमास उपस्थित होत.

श्रीमती मुंडे म्हणाल्या की, शासनाचा नेहमीच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यावर आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर राहिला आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय हा आपल्या ग्रामीण जीवनमानाचा मुख्य कणा आहे. कारगिल, सिजेंटा फाउंडेशन आणि डिजिटल ग्रीन यांचा हा संयुक्त उपक्रम आपल्या 'विकसित महाराष्ट्र' आणि 'विकसित भारत' या संकल्पनेला गती देणारा ठरेल.

तंत्रज्ञान, 'फार्मरचॅट' सारखे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डिजिटल मार्गदर्शन आणि थेट दारात पोहोचणारी 'पशु आरोग्य मित्र' फिरती पशुवैद्यकीय सेवा यांच्या माध्यमातून अहिल्यानगरमधील हजारो शेतकऱ्यांना थेट फायदा होईल. 'पशु सखी'च्या माध्यमातून महिलांचा वाढणारा सहभाग ग्रामीण महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देईल. हा पथदर्शी प्रकल्प संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वासही श्रीमती मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi