वरसाळे ते वाणापाडा रस्त्याचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार
-मंत्री जयकुमार गोरे
मुंबई, दि. २८ - पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील वरसाळे ते वाणापाडा हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेच्या टप्पा दोन अंतर्गत मंजूर असून, त्याचा कार्यारंभ आदेश 12 डिसेंबर 2024 रोजी देण्यात आला आहे. सद्यस्थितीत या रस्त्याचे काम सुरू असून मार्चपर्यंत काम पूर्ण होईल, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत सांगितले.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वरसाळे ते वाणापाडा या रस्त्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा विधानसभा सदस्य संजय केळकर यांनी सभागृहात उपस्थित केला.
यावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, रस्त्याच्या मंजूर लांबीप्रमाणे काम होत आहे. सध्या रस्त्याचे खडीकरण सुरू असून अंतिम थराचे कामही सुरू आहे.
मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत होणारी सर्व कामे तपासणीनंतरच पूर्णत्वास नेली जातात. तपासणी झाल्याशिवाय ठेकेदाराला देयक मिळत नाही. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही. काम निधीअभावी थांबलेले नसून रस्त्याचे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात येतील. संबंधित ठेकेदार व प्राधिकरणांना सूचना देऊन हे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल, असेही मंत्री गोरे यांनी सांगितले.
या चर्चेत विधानसभा सदस्य शेखर निकम, हरीश पिंपळे यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment