पाईपलाईन दुरुस्तीनंतर खैरी गावातील पाणी पिण्यायोग्य
- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
मुंबई, दि. 28 : गावांमध्ये पाणीपुरवठा प्रणालीद्वारे पाणी दिले जाते आणि टाक्यांमधील पाण्याची चाचणी वेळोवेळी केली जाते. तसेच पाण्याचे शुद्धीकरण व्हावे यासाठी क्लोरीन टाकण्याचीही व्यवस्था गाव पातळीवर केली जाते. खैरी गावातील पाईपलाईन दुरुस्तीनंतर घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांनुसार पाणी पिण्यास योग्य आढळले आहे, असे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खैरी (ढालगाव) ग्रामपंचायत क्षेत्रात दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत विधानसभा सदस्य संजय मेश्राम यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर पुढे म्हणाल्या, दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना काही आजार उद्भवल्यास, तातडीने तपासणी करून पाण्याचा स्रोत पिण्यायोग्य आहे की नाही हे पाहिले जाते आणि गरज भासल्यास तो स्रोत बदलला जातो. तीन वेगवेगळ्या स्तरांवर वेळोवेळी पाण्याची तपासणी केली जाते. जिथे पाईपलाईन फुटल्याने दूषित पाणीपुरवठा होतो, तेथे ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद पातळीवर पाईपलाईन बदलण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येते.
या चर्चेत विधानसभा सदस्य सुलभा गायकवाड यांनी सहभाग घेतला.
0000
No comments:
Post a Comment