प्रकल्पाची उद्दीष्टे
तुरुंगातील बंदी व सुटका झालेल्या कैद्यांचे पुनर्वसन, तुरुंग व्यवस्थेत सामाजिक कार्यकर्त्यांना संस्थात्मक बनवण्याची प्रक्रिया तयार करणे, तुरुंगातील बंदींना मानसिक स्थैर्य मिळण्याकरिता मदत करणे आणि तुरुंगाचे प्रशासकीय कामकाजाच्या सुरळीतपणासाठी मदत करणे हे या प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्ट आहेत.
सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका
सामाजिक कार्यकर्त्याने कायदेशीर मार्गदर्शन आणि मदत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि मोफत कायदेशीर साहाय्य सेवा प्रदान करण्यासाठी वकीलांशी संपर्क साधणे, आरोग्य आणि स्वच्छता, मानसिक आरोग्य सेवा आणि समुपदेशनाची तरतूद करणे, प्रथमोपचार आणि सामुदायिक आरोग्य विषयक अल्पकालीन प्रमाणित प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, आरोग्यविषय जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे, तुरुंगामध्ये आणि तुरुंगामधून सुटल्यानंतर कल्याणकारी आणि पुनर्वसन सेवांची तरतूद करणे इत्यादी कामे सामाजिक कार्यकर्ते करत असतात.
बंदी कल्याण व पुनर्वसन प्रकल्पांतर्गत कारागृहातील बंदीच्या विनंतीनुसार व संबंधित तुरुंग अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या कालावधीमध्ये पाच मध्यवर्ती कारागृह व ब्रोस्टल स्कूल, नाशिक मधील एकूण 16 हजार 994 बंदींपर्यंत सामाजिक कार्यकर्ते पोहोचू शकले आहे. त्यापैकी 12 हजार 275 हे न्यायाधीन बंदी असून 4 हजार 719 बंदी व ब्रोस्टल स्कूलमधील 26 किशोरबंदीसोबत कार्य करण्यात आले आहे.
या कार्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी कैद्यांची प्राथमिक माहिती गोळा केली. त्यानुसार त्यांना समुपदेशन, कायदेशीर मार्गदर्शन, तसेच उच्च न्यायालयाद्वारे कायदेशीर मदत, न्यायालयीन भेटी, वकिलांच्या भेटी, पीआर बाँडवर सुटका करण्यासाठी साहाय्य, जामिनासाठी कुटुंबासोबत पाठपुरावा, पोलिस स्टेशनला भेटी, गृहभेटी, कुटुंबामधील व्यक्तींसोबत फोनद्वारे संपर्क, निवारा गृहांचा शोध आणि बंदी मुक्त झाल्यानंतर मुक्त बंदी योजना, त्यांच्या मुलांसाठी बाल संगोपन योजना आणि बंदी पुनर्वसन होण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे.
कैद्यांच्या मुलांना शैक्षणिक साहाय्य, बंद्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण, कायदेविषयक सत्र, मार्गदर्शन शिबिर, वैद्यकीय शिबिर, तसेच बंद्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बंदी सुटल्यानंतर छोट्या व्यवसायासाठी साहाय्य, बंदी सुटल्यानंतर गरजू बंदीना प्रवास खर्च, बंद्यांच्या कुटुंबासाठी रेशन पुरविणे, तसेच बंद्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारी विभाग व स्वयंसेवी संस्थांकडून संसाधने उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे.
समुपदेशन कार्य
पाच मध्यवर्ती कारागृहातील 12 हजार 588 बंदीचे समुपदेशन करण्यात आले. या समुपदेशनात कौटुंबिक परिस्थिती विचाराने त्रस्त, जामीन कार्यास विलंब लागल्याने चिंतेत असलेले, कुटुंबीय सदस्यांची आर्थिक बिकट परीस्थितीबाबत चिंताग्रस्त ,वैद्यकीयदृष्ट्या अडचणीत असलेले, तथा मानसिक अवस्थ असलेले बंदी. अशा विविध प्रकारचे अडचणीत असलेल्या बंदी सोबत समुपदेशन कार्य करण्यात आले. समुपदेशन केलेल्या बंदींसोबत गरजेनुसार भेट देऊन त्यांच्या अडचणीचे निराकरण करण्यात आले.
फोनवरून संपर्क
कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, वकील मुलाखत, कागदपत्रांची व्यवस्था करणे, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, संबंधित स्वयंसेवी संस्था, प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी बंदीच्या विनंतीनुसार संबंधिताना फोनद्वारे संपर्क करण्यात आला आहे. एकंदरीत प्रकल्प चालू झाल्यापासून पाच मध्यवर्ती कारागृहातील बंद्यासाठी एकत्रितपणे 37 हजार 802 वेळा फोनद्वारे संपर्क करण्यात आला आहे.
कोरोना काळात कारागृहात मुलाखत सुविधा बंद होती, त्यावेळी बंदी बांधवांकडे उपलब्ध असलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करण्याची सुविधा उपलब्ध होती. ज्या बंदी जणांचे बाहेरील पोलीस स्टेशनमधून पडताळणी झालेले संपर्क क्रमांक आलेले आहेत, अश्याच बंदी जणांना फोन सुविधा सुरु आहे. मात्र संपर्क क्रमांक पडताळणी न झालेल्या प्रकरणात बंद्यांच्या विनंतीनुसार तथा उप अधीक्षक यांच्या सूचनेनुसार बंदी निहाय नातेवाईक व संबंधित पोलीस स्टेशन सोबत फोनद्वारे समन्वय साधून 4 हजार 552 केसेसमध्ये कार्य पूर्ण करण्यात आले.
No comments:
Post a Comment