क्रीडासह अनेक क्षेत्रात महाराष्ट्राकडून देशाचे नेतृत्व -राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे राज्यपालांच्या हस्ते वितरण
पुरस्कार विजेत्यांनी राज्यातल्या खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम करावे –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शंकुतला खटावकर, प्रदीप गंधे यांना जीवनगौरव पुरस्कार
पुणे, दि. १८: महाराष्ट्राने उद्योग, शिक्षण, सामाजिक सुधारणा तसेच क्रीडा क्षेत्रातही देशाचे नेतृत्व केले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी मुलांना लहान वयापासूनच विविध क्रिडाप्रकारांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०२२- २३ व २०२३-२४ वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पणनमंत्री जयकुमार रावल, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, प्रशांत बंब, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा व युवक सेवा आयुक्त हिरालाल सोनवणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात सन २०२२- २३ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू प्रदीप गंधे यांना तर सन २०२३-२४ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना वितरित करण्यात आला.
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कारप्राप्त खेळाडू शकुंतला खटावकर आणि प्रदीप गंधे यांचे विशेष अभिनंदन करतानाच सर्व पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, आज खेळ हे तांत्रिकदृष्ट्या तसेच शारीरिकदृष्ट्या अत्यंत स्पर्धात्मक झाले आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई तसेच ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां अशा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्या मुलांना खूप लहान वयापासूनच खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागेल. शाळा आणि पालकांनी मुलांना खेळ आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
विविध क्रीडाप्रकारांमध्ये अनेक मुली पुढे येत विविध स्पर्धांमध्ये पदके मिळवत असल्याचा आनंद आहे. गेल्या काही वर्षात आपल्या दिव्यांग खेळाडूंनी ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भविष्यात सर्व क्रीडा प्रकारात आपण वर्चस्व गाजवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये खुल्या जागांची कमतरता आहे तिथे शाळा आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांना खेळाच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी स्थानिक मैदाने आणि क्रीडा क्लब यांच्यासोबत सहयोग करू शकतात, आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात क्रीडा संकुले स्थापन करण्यात आली असून क्रीडा सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे, असेही श्री. राधाकृष्णन यांनी नमूद केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात व्हाव्यात यासाठी प्रयत्न करीत असून महाराष्ट्राने आपल्या खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी तयार करण्यास पुढाकार घ्यावा, 'विकसित भारत' बाबत चर्चा करत असतानाच आपण ऑलिंपिकमध्येही सर्वाधिक पदके मिळविण्याबाबतही विचार केला पाहिजे. आपले खेळाडू त्यात यशस्वी होतील असा आशावादही राज्यपालांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment