केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, पुणे आणि मुंबईतील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी कमी करण्यासाठी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक शहराबाहेरून वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुरत-नाशिक-अहिल्यानगर-सोलापूर या नव्या महामार्गामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी सुमारे ४० ते ४५ टक्के वाहतूक पुणे आणि मुंबईत प्रवेश करणार नाही. तसेच, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम ऐतिहासिक स्वरूपाचे झाले असून, या मार्गावर वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच ज्ञानेश्वरीत उल्लेख असलेल्या वृक्षांची लागवड करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
राज्यातील इतर महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांनाही गती देण्यात येत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. नाशिक फाटा ते खेड या ३० किलोमीटर लांबीच्या सुमारे ८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, भूसंपादन पूर्ण होताच कामाला सुरुवात केली जाईल. खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचे उद्घाटनही लवकरच करण्यात येणार आहे. तसेच, जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ठाणे ते पुणे आणि पुढे शिरूरमार्गे छत्रपती संभाजीनगरपर्यंत जोडणाऱ्या सुमारे १० हजार कोटी रुपयांच्या नव्या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
No comments:
Post a Comment