अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी
- मंत्री नरहरी झिरवाळ
मुंबई, दि. १० : राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्यांक घटकातील पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य, शैक्षणिक सुविधा आणि पायाभूत विकासाचा लाभ देऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचे काम केले जात असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य इद्रिस नायकवडी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. त्यावेळी ते बोलत होते. चर्चेत सदस्य जगन्नाथ अभ्यंकर, सुधाकर अडबाले यांनी सहभाग घेतला. मंत्री झिरवाळ म्हणाले की, अल्पसंख्यांक विभागामार्फत विविध योजनांवर सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ९४७.७४ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. खर्चाचे प्रमाण ८४.८४ टक्के आहे. त्यामुळे निधीची कमतरता नसून उपलब्ध निधीचा खर्चही समाधानकारक झाला आहे. परंतु काही प्रकरणांमध्ये अनेक संस्थांकडून प्रस्ताव उशिरा प्राप्त होत असल्याने त्यांना वेळेत लाभ देता येत नाही. या प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यात येतील.
पात्र शाळांना आवश्यक मंजुरी देण्यात येईल, तसेच अनुदान न मिळण्यामागे प्रशासनाची किंवा संबंधित संस्थेची चूक असल्यास त्याची तपासणी करून जबाबदार असलेल्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.
0000
No comments:
Post a Comment