पिंपरी-चिंचवडची भविष्यातील पाणी गरज लक्षात घेऊन पवना जलवाहिनी प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल
- राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि. २ : पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्राची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता पवना जलवाहिनी प्रकल्प तातडीने मार्गी लावणे आवश्यक असून, शासनाकडून आवश्यक अनुदान उपलब्ध करून हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.
सदस्य महेश लांडगे यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चा सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, २०२९-३० पर्यंत पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या सुमारे ५५ लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असून शहराला सुमारे २,९४९ एमएलडी पाण्याची आवश्यकता भासणार आहे. ही भविष्यातील गरज लक्षात घेऊन पवना जलवाहिनी प्रकल्प पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की, प्रकल्पाच्या खर्चात वाढ होऊन तो आता सुमारे १,०१५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून अनुदान कशा स्वरूपात देता येईल, याचा विचार सुरू आहे. तसेच प्रकल्पाला विरोध करणाऱ्या धरणग्रस्त व स्थानिक संघटनांच्या मागण्या समजून घेऊन त्यांचे योग्य निराकरण करतच प्रकल्प पुढे नेण्यात येईल.
या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल आधीच आयआयटी मुंबईकडून तयार करून घेण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत हा अहवाल सादर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment