Friday, 17 July 2026

क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेण्याचे उद्दिष्ट

 क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेण्याचे उद्दिष्ट

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         ५ हजारांहून अधिक क्वांटम प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे उद्दिष्ट

 

मुंबई, दि. १७ : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे तीन प्रमुख आधारस्तंभ ठरणार आहेत. या क्षेत्रात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत असे महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन प्रभावीपणे राबवून राज्यात सक्षम क्वांटम इकोसिस्टीम उभारण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

आय-हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीने आयोजित क्वांटम टेक्नॉलॉजी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल बी. रेड्डी, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, आयसर, सी-डॅक तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे प्राध्यापक आणि अधिकारी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जग अतिशय वेगाने बदलत असून डेटा-आधारित अर्थव्यवस्थेपासून आता उच्च गतीच्या डेटा प्रोसेसिंगच्या युगात प्रवेश होत आहे. भविष्यातील जागतिक स्पर्धेत एआय, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान निर्णायक भूमिका बजावणार आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राप्रमाणेच क्वांटम क्षेत्रातही भारताने कुशल मनुष्यबळाच्या बळावर जागतिक नेतृत्व मिळविण्याची संधी साधली पाहिजे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi