चंद्रपूर जिल्ह्यात कोळंबी पालन व्यवसायाला चालना देणार
– मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबई, दि. २५ : चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मत्स्य शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कोळंबी पालन व्यवसायाच्या विस्ताराला राज्य शासन प्राधान्य देत आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील तलावांमध्ये जम्बो प्रॉन्स जातीच्या कोळंबी बीजांचे संचयन करून झिंगे उत्पादन वाढविण्याच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोळंबी पालन व्यवसायाला चालना देण्यासाठी टायगर प्रॉन्स जातीचे सुमारे तीन कोटी कोळंबी बीज विशेष बाब म्हणून शासनामार्फत उपलब्ध करुन देण्याबाबत आढावा बैठक मंत्रालयात झाली त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, मत्स्यव्यवसाय आयुक्त तथा महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदीप, महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री राणे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील कोळंबी पालन व्यवसायाला चालना देण्यासाठी सुमारे ३ कोटी कोळंबी बीज उपलब्ध करून देण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे निवेदन सादर केले आहे. या प्रस्तावाच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपलब्ध जलसंपत्तीचा अधिक परिणामकारक वापर करून मत्स्य उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment