उरण येथील ‘भारत मुंबई कंटेनर टर्मिनल’ला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित
-सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
· जुलैअखेर दुरुस्ती पूर्ण होणार
मुंबई, दि. 23 : उरण येथील ‘भारत मुंबई कंटेनर टर्मिनल’ला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित असून जुलैअखेर दुरुस्ती पूर्ण होणार आहे; तसेच पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.
उरण (जि. रायगड) येथील भारत मुंबई कंटेनर टर्मिनलला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत विधानपरिषद सदस्य अभिजात वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.
मंत्री भोसले म्हणाले की, संबंधित पुलामध्ये कोणतीही संरचनात्मक त्रुटी आढळलेली नाही. पुलालगतच्या भरावाचा काही भाग खालच्या मातीच्या थरात झालेल्या नैसर्गिक स्थिरीकरणामुळे (सेटलिंग); तसेच काही प्रमाणात अतिवजनाच्या वाहनांच्या वाहतुकीमुळे खचला असण्याची शक्यता आहे. मात्र, पुलाच्या सुरक्षिततेवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.
या दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून तो संबंधित ठेकेदाराकडून देखभाल करारातील (मेंटेनन्स क्लॉज) तरतुदीनुसार करण्यात येत आहे. भरावाची दुरुस्ती; तसेच आवश्यक काँक्रीटीकरणाचे काम जुलै 2026 अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment