खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मधुमित्र-मधुसखी पुरस्कार जाहीर
- ज्ञानेश्वर मलीले, गणेश बुरकुल, राजेंद्रदास बैरागी, श्वेता वायाळ यांना पुरस्कार
- चंद्रकांत तरे, संजय मारणे, दयावान पाटील, विद्यानंद आहिरे यांचा विशेष सन्मान
- छत्रपती संभाजीनगर येथे 20 मे 2026 रोजी होणार पुरस्कारांचे वितरण
- मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची पत्रकार परिषदेतून माहिती
मुंबई, दि. 15 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने दिले जाणारे 2026 सालचे ‘मधुमित्र’ व ‘मधु-सखी’ पुरस्कार लातूरचे ज्ञानेश्वर मलीले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांना जाहिर झाले आहेत. याशिवाय निवड समितीने ठाण्याचे चंद्रकांत तरे, पुण्याचे संजय मारणे, कोल्हापूरचे दयावान पाटील आणि जळगावचे विद्यानंद आहिरे यांची विशेष सन्मानासाठी निवड केली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या ‘मधाचे गाव’ तसेच जागतिक मधमाशी दिनाच्या निमित्ताने योजलेला ‘मधु मित्र – मधु सखी पुरस्कार’ तसेच मंडळाच्या विविध कार्याविषयीची सभापती साठे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेतून माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील उपस्थित होते.
‘मधु मित्र’ आणि ‘मधु सखी’ पुरस्काराचे वितरण 20 मे 2026 या जागतिक मधमाशी दिनी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात होणार असल्याचे सांगून सभापती साठे म्हणाले की, महाराष्ट्रातील मधमाशीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने 2023 पासून ही पुरस्कार योजना सुरू केली आहे. या पुरस्कारामध्ये स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कमेचा समावेश आहे.
राज्यात मधमाशीपालनास प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाच्या मध संचालनालयामार्फत प्रशिक्षण, जनजागृती मेळावे, मध महोत्सव, ‘मधाचे गाव’ योजना तसेच मधुमित्र-मधुसखी पुरस्कार असे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सभापती साठे यांनी सांगितले. ‘मधाचे गाव’ योजनेसाठी राज्य शासनाने 17 कोटी रुपयांची तरतूद केली असून पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांतील दहा गावांमध्ये काम सुरू झाले आहे. गेल्या दोन महिन्यांत 348 मधपाळांना प्रशिक्षण देण्यात आले असून 1750 मधपेट्या, संरक्षण पोशाख, मध यंत्र आणि अन्य साहित्याचे वितरण करण्यात आले आहे.
या योजनेमुळे निसर्ग संवर्धन, मध उत्पादनवाढ, ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास साठे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ गेली 65 वर्षे कार्यरत असून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना आणि मध केंद्र योजना यांची अंमलबजावणी मंडळामार्फत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment