Friday, 15 May 2026

नाशिक जिल्ह्यातील अंबोली-वेळुंजे वळण योजनेसाठी ४९ कोटी २६ लाखाची तरतुद

 नाशिक जिल्ह्यातील अंबोली-वेळुंजे वळण योजनेसाठी ४९ कोटी २६ लाखाची  तरतुद

मुंबई, दि. १४ : नाशिक जिल्ह्यातील अंबोली-वेळुंजे प्रवाही वळण योजनेसाठी ४९ कोटी २६ लाख रुपयांची तरतूद करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या प्रकल्पामुळे १६५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

 

अंबोली-वेळुंजे प्रवाही वळण य़ोजना दमणगंगा खोऱ्यातील वाल नदीच्या नाल्यावर प्रस्तावित आहे. या योजनेव्दारे पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्व वाहिनी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. या योजनेद्वारे ३२.०४ दशलक्ष घन फूट पाणी उपलब्ध होणार आहे. यापैकी ४.८३ दशलक्ष घ. फू. पाणी साठा स्थानिक वापरासाठी तर २७.२१ द.ल.घ. फू. पाणी साठा गोदावरी खोऱ्यात प्रवाही पध्दतीने वळविण्याचे नियोजन आहे. ४९.२६ कोटी पैकी ४६ कोटी रुपये प्रत्यक्ष कामासाठी तर ३.२६ कोटी रुपये अनुषांगिक कामासाठी मंजूर करण्यात आले आहेत.

 

प्रकल्पास युनिक पायाभूत आयडी देण्याची कार्यवाही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने करावयाची आहे. कामास दिलेल्या मान्यतेपैकी भूसंपादनासाठी १३.४६ कोटी, कामांसाठी २४.३३ कोटी, पुलासाठी ३.९० कोटी, इमारतीसाठी ३२ लाख, दळणवळणासाठी ३.७० कोटी, वृक्षारोपणासाठी १५ लाख, देखभालीसाठी १२ लाख आणि संकीर्ण १.७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

0000


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi