शेतकऱ्यांना कर्जमाफी हा मास्टरस्ट्रोक
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
· सामाजिक भान बाळगून अर्थव्यवस्थेला चालना देणारा अर्थसंकल्प
मुंबई दि. ६: ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राचा समतोल विकास साधणारा व्हिजनरी असा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीसाठी तरतूद करून सामाजिक भान ठेवले आहे तर दुसरीकडे राज्यातील कानाकोपऱ्यातील गावे आणि शहरे एकमेकांशी व्यवस्थित जोडून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम केले आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी शिंदे यांचे स्वागत केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा अभिनंदन केले.
प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासन अशा चार स्तंभांवर विकसित महाराष्ट्र २०४७ ची उभारणी होणार असून एक निश्चित अशी विकासाची दिशा आता मिळाली आहे असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करून पात्र शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय म्हणजे राज्य शासनाचा मास्टरस्ट्रोक आहे असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, बळीराजाच्या पाठीशी राज्य शासन कायम ठामपणे उभे आहे हे यातून सिद्ध होते. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ होणार आहे तसेच नियमित कर्ज परतफेड केली असल्यास ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देखील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल याची खात्री वाटते.
No comments:
Post a Comment