‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा युवकांशी संवाद
भारतीय संस्कृतीचा वारसा जपत युवकांनी
भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत योगदान द्यावे
-राज्यपाल आचार्य देवव्रत
मुंबई, दि. ७ : भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची व मोलाची आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी युवकांनी विचार, कृती आणि नव कल्पनांच्य माध्यमातून पुढे येऊन भारतीय संस्कृतीचा वारसा जपत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
राष्ट्रीय युवा महोत्सव-विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२५-२६ राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्यातून निवड झालेल्या युवकांशी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास क्रीडा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे,
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सह सचिव एस. राममूर्ती, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील पांढरे, सहाय्यक संचालक मिलिंद दीक्षित, मुंबई विभागाच्या क्रीडा उपसंचालक सुवर्णा बारटक्के व राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड झालेले विद्यार्थी उपस्थित होते.
राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभाग हा राज्यातील युवकांसाठी गौरवाची व प्रेरणादायी बाब असल्याचे गौरवोद्गार काढून दिल्ली येथील संवाद कार्यक्रमासाठी निवड झालेल्या युवकांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शुभेच्छा दिल्या.
राज्यपाल आचार्य देवव्रत युवकांशी संवाद साधताना म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला नवे स्वरूप देण्यात आले असून देशातील सर्व राज्यातून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक परीक्षा घेण्यात आली. त्यातून निवड झालेल्या तीन हजार गुणवंत युवकांना थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे. मेहनत, परिश्रम व गुणवत्तेच्या बळावर या स्पर्धेसाठी निवड झालेल्या युवकांचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कौतुक केले. ते म्हणाले, या स्पर्धेसाठी झालेली युवकांची निवड ही विकसित राष्ट्र निर्माणातील त्यांच्या कष्टाच्या भूमिकेची पावती आहे.
No comments:
Post a Comment