Saturday, 6 September 2025

विविध लाभाच्या योजनांचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांना देण्यासाठी देखील आधार क्रमांक प्रमाणीकरण आवश्यक आहे.

 राज्यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करुन अशा आधारधारक मुलांची नोंद संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांमार्फत सरल प्रणालीअंतर्गत करण्यात येते. शिक्षण विभागाकडील विविध लाभाच्या योजनांचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांना देण्यासाठी देखील आधार क्रमांक प्रमाणीकरण आवश्यक आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाबाबत शासनाच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांची आधार पडताळणी करण्याचे काम प्राधान्याने करण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. शिक्षण विभागाने प्रत्येक गटसाधन केंद्रावर दोन असे एकूण 816 आधार संच उपलब्ध करुन दिलेले आहेत. विविध माध्यमाच्या शाळांमधून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि आवश्यक दुरुस्ती दोन्‍ही कामे सध्या गटस्तरावर सुरू आहेत. तथापिआधार प्राधिकरणामार्फत विद्यार्थ्यांच्या आधारकार्डवरील माहितीमध्ये विसंगती आढळून येत असल्यामुळे पडताळणी प्रलंबित राहत आहे.

राज्यातील विविध माध्यमांच्या शाळांमधून 2 कोटी 4 लाख 63 हजार 392 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत यापैकी 1 कोटी 91 लाख 35 हजार 296 विद्यार्थ्यांची नावे आधार प्राधिकरणाकडील माहितीशी जुळत असल्याने वैध ठरली आहेत. उर्वरित पाच लाख 27 हजार 602 विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नाहीत. तर, 63 हजार 009 विद्यार्थ्यांची आधार पडताळणी प्रलंबित आहे. तसेच, 7 लाख 37 हजार 485 विद्यार्थ्यांचे आधार अवैध ठरले आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi