कलिना कॅम्पसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा उभारणार - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी पारतंत्र्याविरुद्ध दिलेली झुंज, त्यांचे विचार आणि साहित्य यांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापीठात अभ्यास व संशोधन केंद्र सुरू करण्यात येत आहे. याच परिसरात त्यांचा पुतळा सुद्धा उभारण्यात येणार आहे. यासाठी जागा उपलब्ध झाली आहे अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
सावरकरांचे क्रांतिकारक रूप सर्वांनाच ज्ञात आहे. मात्र, जेव्हा त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात दोन वर्षांसाठी नजरकैदेत ठेवण्यात आले, तेव्हा त्यांच्यावर प्रक्षोभक भाषणे आणि लिखाण करण्यास बंदी घालण्यात आली होती. त्या काळात त्यांनी सामाजिक समतेसाठी केलेले कार्य फारसे समोर आले नाही. रत्नागिरीतील पतितपावन मंदिराच्या उभारणीत त्यांनी सर्व जातींसाठी मंदिर खुले केले. त्यांनी सामूहिक भोजन आणि आंतरजातीय विवाहाचे आयोजनही केले. सावरकरांचे हे सामाजिक योगदान आणि विचार लोकांपुढे यावेत, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार हे अध्यासन केंद्र उभारण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सामाजिक विचार व्यापक होता. त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी 'पतितपावन मंदिर ते चैत्यभूमी' अशी यात्रा काढण्यात आली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करताना म्हटले होते की, देशाला 2047 पर्यंत जगात पहिल्या क्रमांकावर घेऊन जायचे असेल आणि प्राचीन वैभव पुन्हा मिळवायचे असेल तर गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडले पाहिजे. त्यासाठी भारतीय ज्ञानपरंपरा आणि इतिहास नीट शिकवावा लागेल. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्र नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment