स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन
केंद्रासाठी आवश्यक निधी देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून सावरकरांचा जीवनप्रवास उलगडेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील विविध पैलूंमध्ये इतकी ताकद होती की, त्यांतील एक-एक पैलूंवर समग्र संशोधन करता येईल. त्यांच्या नावाने मुंबई विद्यापीठात स्थापन संशोधन केंद्रास आवश्यक निधी दिला जाईल.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे आणि ब्रिटिश सरकारविरुद्धच्या कृतीमुळे ब्रिटिशांनी त्यांची बॅरिस्टर पदवी काढून घेतली. ही पदवी परत मिळवण्यासाठी विद्यापीठाने सविस्तर प्रस्ताव तयार करावा. राज्यशासन यासंदर्भात इंग्लंडमधील संबंधित संस्थांशी पत्रव्यवहार करेल आणि त्यांना मरणोत्तर बॅरिस्टर पदवी देण्यासाठी प्रयत्नशील राहील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनप्रवास प्रेरणादायी असून, लहानपणीच स्वातंत्र्यालढ्यात सहभागी होऊन त्यांनी ‘अभिनव भारत’ सारखी संस्था स्थापन केली. इंग्रज ज्याला ‘सिक्रेट सोसायटी’ म्हणत. या संस्थेच्या माध्यमातून भारतीयत्व आणि भारतीय स्वातंत्र्याबाबत जनजागृती, संघटन करून त्यांनी क्रांतीला चालना दिली. विशेषतः जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे त्यांनी भाषांतर केले आणि क्रांतीसंदर्भातील धडे देण्याचे काम केले. सन 1857 च्या युद्धाला सुरुवातीला ‘शिपाई बंड’ असे संबोधले गेले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे पहिले व्यक्ती होते, ज्यांनी या संघर्षाला केवळ शिपायांचं बंड न मानता, तो एक स्वातंत्र्यलढा होता, असे ठामपणे सांगितले. ‘भारतीय इतिहासातील सहा सुवर्णपाने’ या त्यांच्या पुस्तकातून इंग्रजांच्या दडपशाहीखाली दडपलेला इतिहास त्यांनी समाजासमोर आणला. त्यांचा आत्मविश्वास, धाडस आणि निर्णायक कृती आजही प्रेरणादायी ठरते. देशासाठी झगडताना त्यांनी कधीही हार मानली नाही. बौद्धिक, सामाजिक आणि क्रांतिकारी योगदान दिले. आजच्या पिढीसाठी त्यांचे योगदान अत्यंत प्रेरणादायी आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment