Tuesday, 16 May 2023

-20 उर्जा संक्रमण कार्य गटाची बैठक आजपासून मुंबईत सुरू

 जी-20 उर्जा संक्रमण कार्य गटाची बैठक आजपासून मुंबईत सुरू


हवामान बदलाचा सामना आणि ऊर्जा सुरक्षेच्या हमीसाठीअपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करावा

- केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे

            मुंबई, 15 :- भारताच्या जी-20 अध्यक्षतेखालील तिसरी उर्जा संक्रमण कार्य गट (ETWG) बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत जी-20 सदस्य देश, विशेष निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA), आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमधील 100 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत.


            तिसऱ्या उर्जा संक्रमण कार्य गट (ETWG) बैठकीच्या पहिल्या दिवशी, भारत सरकारचे रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आपल्या विशेष संबोधनात शाश्वत ऊर्जा स्रोत आणि त्यांचे संवर्धन तसेच कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या धोरणांचा विकास आणि अवलंब करण्याला प्राधान्य देण्यावर भर दिला. “शाश्वत भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी जी-20 राष्ट्रांवर एक अद्वितीय जबाबदारी आहे.” असेही श्री. दानवे म्हणाले.


            या दृष्टीने या अशा प्रकारच्या ऊर्जा संक्रमणाबाबत (उर्जास्रोतांच्या वापरातील बदल) भारत आघाडीवर असून जगात करत असलेले नेतृत्व खूप महत्त्वाचे आहे, धोरणे आखणे आणि नियमन करणे याबाबत सरकार महत्त्वाची भूमिका बजावू शकते. निधी पुरवठा आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण करण्यात वित्तीय संस्था सुद्धा महत्त्वाचे योगदान देऊ शकतात. उद्योग जगत, दीर्घकाळ चालू शकणाऱ्या पद्धती राबवून अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या क्षेत्रात गुंतवणूक करू शकते. एकापेक्षा जास्त सदस्य राष्ट्र असलेल्या जागतिक संघटना विकसनशील राष्ट्रांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य पुरवू शकतात आणि सर्वात शेवटचे आणि महत्वाचे म्हणजे, नागरिकही त्यांच्या दैनंदिन जीवनात ऊर्जेचा योग्य पद्धतीने वापर करून या चळवळीचा एक भाग बनू शकतात, असे काही उपायही रावसाहेब पाटील दानवे यांनी या बैठकीत आपले विचार मांडताना सुचवले.


            ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आणि ईटीडब्लूजीचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी तिसऱ्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. नूतन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव भूपिंदरसिंग भल्ला आणि खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज हे देखील या बैठकीत आणि विचारविनिमयामध्ये सहभागी होते. 


            तिसऱ्या ईटीडब्लूजी बैठकीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मंत्रिस्तरीय परिपत्रकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली.


            या बैठकीच्या निमित्ताने तीन इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये धोरणकर्ते, बहुस्तरीय संघटना, वित्तीय संस्था, व्यापारी संघटना आणि विषयतज्ञ सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी या इतर कार्यक्रमांमध्ये पुढील उपक्रमांचा समावेश होता.


            कमी खर्चाचे आंतरराष्ट्रीय अर्थसाहाय्य मिळवण्याच्या उद्देशाने बहुस्तरीय विकास बँकांसोबत कार्यशाळा– बॅटरी, साठवणूक, हरित हायड्रोजन, किनारपट्टीवरील वारे, जैवऊर्जा आणि कार्बन कॅप्चर युटीलायजेशन यांसारख्या उदयोन्मुख आणि महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी देशांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे सुनिश्चित करण्यावर या चर्चेत भर देण्यात आला.


            न्याय्य संक्रमण आराखड्यावर परिसंवाद – कोळसा क्षेत्रातील संक्रमणासमोर, प्राथमिकतेने कोळशावर आधारित अर्थव्यवस्थांसमोर असलेल्या आव्हानांबाबत परिसंवादात चर्चा करण्यात आली. संस्थामक शासन, भूमी आणि पायाभूत सुविधा मालमत्ता यांचा इतर कारणांसाठी वापर, जागतिक स्तरावरील यशस्वी उपक्रमांमधील तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि सहकार्याद्वारे तंत्रज्ञानात्मक आणि आर्थिक साहाय्य यावर भर देण्यात आला.  


            जैवइंधनावर परिसंवाद - जागतिक जैवइंधन आघाडी तयार करण्यासह जैवइंधनासंदर्भात सहकार्यविषयक आघाडी बळकट करण्याच्या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानासह जैवइंधनाचा विकास आणि वापर अधिक गतीने करण्याच्या उपाययोजनांवर या परिसंवादात चर्चा झाली.


या मंत्रिस्तरीय परिपत्रकाच्या मसुद्यावरील चर्चा आणि प्रगती बैठकीच्या दुसऱ्या दिवशी देखील सुरू राहील. 17 मे 2023 रोजी या तिसऱ्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या बैठकीचा समारोप होणार आहे. सदस्य देशांमधील करार आणि सहमती स्वच्छ ऊर्जा संक्रमणाबाबत जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी सहाय्यकारक ठरण्याची अपेक्षा आहे. 


०००



 


वृत्त क्र. 1554


दिल्लीत छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी !


            नवी दिल्ली, 15 : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती रविवारी सायंकाळी महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरी करण्यात आली.


            या कार्यक्रमांचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव समिती 2023 दिल्ली यांच्यावतीने करण्यात आले. विचारमंचावर लाखोजी जाधवराव यांचे वंशज शिवाजीराव जाधवराव, संस्थापक अध्यक्ष किशोरभाऊ चव्हाण, अध्यक्ष विलासभाऊ पांगारकर, विजय काकडे, विधीज्ञ राज पाटील, बडोदा घराण्याचे राजे शिर्के, प्रदीप साळुंखे उपस्थित होते.


            मार्गदर्शनपर भाषणात प्रमुख पाहुणे लाखोजी जाधवराव यांचे वंशज शिवाजीराव जाधवराव यांनी इतिहासकालीन अनेक पैलूंचा उलगडा केला. माँ जिजाऊ यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाचा पाढा वाचताना विदर्भ - मराठवाडा- पश्चिम महाराष्ट्र - कोकण व दक्षिण भारत हे कार्यक्षेत्र कसे होते याबद्दल त्यांनी सांगितले.


            कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासभाऊ पांगारकर म्हणाले, आमच्या समितीची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत असून राष्ट्रीय स्तरावर छत्रपती संभाजी महाराज यांचा स्वराज्य निर्मितीचा अखंड तळपणारा दीपक देशभरातील शालेय स्तरावर पोहचावा म्हणून केंद्र शासनातर्फे सुद्धा विशेष उपक्रम राबविला गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.     


             प्रख्यात वक्ते प्रा. प्रदीप साळुंके म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांनी सोळाव्या वर्षी लिहिलेले महत्त्वपूर्ण ग्रंथ आणि त्यातून मांडलेली स्वराज्याची संकल्पना अत्यंत महत्त्वाची असून त्या मधून प्राप्त संदेशच खरी एकात्मतेची हाक देणार असून अठरा पगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य रक्षणार्थ आपले आयुष्य वेचले. म्हणी वाक्यप्रचारातून त्यांनी आजच्या परिस्थितीवरही बोट ठेवले. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कधी हार मानली नाही तोच संदेश त्यांच्या मावळ्यांनी घ्यावा, असे त्यांनी यावेळी आवाहन केले.


            विजय काकडे, कमलेश पाटील, इंजि.तानाजी हुस्सेकर, विधीज्ञ राज पाटील, बडोदा घराण्याचे राजे शिर्के यांचीही प्रबोधनपर भाषणे झाली.


            कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण म्हणाले, शासनातर्फे साजरे करण्यात येणारे राष्ट्रीय पुरुषांच्या जयंती कार्यक्रमाच्या यादीमध्ये 14 मे हा दिवस छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती म्हणून समाविष्ठ केल्यामुळे राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. राष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करावी. यासह मराठा टुरिझम नावाने शिवरायांचा भौगोलिक इतिहास जोडणारा प्रकल्प केंद्र सरकारने हाती घ्यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. 


            या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिती कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील यांनी केले. समितीचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.राजाराम दमगीर यांनी आभार व्यक्त केले.


            कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र सदन येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यासह या परिसरात असणाऱ्या महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सदनाच्या आतील भागात असणाऱ्या छत्रपती शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, अर्धाकृती पुतळ्या

स पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


00000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi