७८ हजार वृक्ष लागवड आणि इंधन बचतीची व्यापक मोहीम
-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
· स्वच्छ, हरित आणि सक्षम एसटी घडवण्याचा संकल्प;
· एसटीचा ७८ वा वर्धापन दिन
मुंबई, दि. १ : महाराष्ट्राच्या जनमानसाशी अतूट नाळ जुळलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण एसटी परिवाराने ‘स्वच्छ एसटी, हरित एसटी आणि बचत करणारी सक्षम एसटी’ घडविण्याचा निर्धार करावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.
एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात मंत्री सरनाईक म्हणाले की, ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद अंगीकारून एसटीने गेली ७८ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अखंड सेवा पोहोचवली आहे. डोंगर-दऱ्या, दुर्गम आदिवासी भाग, ग्रामीण क्षेत्रे, शहर आणि महानगरांना जोडणारी लालपरी ही केवळ वाहतुकीचे साधन नसून महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाची जीवनवाहिनी बनली आहे.
एसटीच्या या गौरवशाली प्रवासामागे लाखो अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक, निवृत्त सेवक आणि प्रवाशांचे योगदान असल्याचे नमूद करत त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. अनेक संकटांच्या काळातही एसटी कर्मचाऱ्यांनी निष्ठेने आणि समर्पणाने सेवा देत समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले असून अशा प्रत्येक कर्मचाऱ्याला आज सलाम करण्याची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.