Friday, 23 December 2022

अनुसूचित जमातीची रिक्त पदेतातडीने भरण्याची कार्यवाही करणार

 अनुसूचित जमातीची रिक्त पदेतातडीने भरण्याची कार्यवाही करणार

- मंत्री दीपक केसरकर


            नागपूर, दि. 23 : अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर रिक्त झालेल्या तीन हजार 898 जागांवरील गट 'क' आणि गट ‘ड’ या पदांची भरती प्रक्रिया जुलै 2023 पर्यंत, तर गट 'अ' आणि 'ब' मधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत सांगितले.


            अनुसूचित जमाती संवर्गातील ज्या - ज्या कर्मचाऱ्यांनी वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही किंवा ज्या कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे, अशा कर्मचाऱ्यांबाबत सदस्य सर्वश्री विनोद निकोले, डॉ. किरण लहामटे यांच्यासह अन्य सदस्यांनी लक्षवेधीद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता. यावर बोलताना मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले, की नाम साधर्म्य यामुळे दिलेले दाखले जात प्रमाणपत्र पडताळणी निकषात अवैध ठरले आहेत. त्यामुळे 3 हजार 898 जागा रिक्त करण्यात आल्या आहेत. तसेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भरावयाच्या 75 हजार जागांमध्ये आरक्षणाप्रमाणे अनुसूचित जमातीच्या जागा भरण्यात येतील. त्यामुळे नोकरीपासून वंचित राहिलेल्या मूळ आदिवासी बांधवांना 100 टक्के न्याय देण्यात येईल. याशिवाय असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून पडताळणीसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात येतील.


            अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून अधिसंख्य पदावर सामावून घेण्यात आले आहे. त्यांना अनुकंपा किंवा पदोन्नतीचा लाभ देण्यात येत नाही, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

मुंबई उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्गावरीलवाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बैठक घेणार

 मुंबई उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्गावरीलवाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बैठक घेणार

- मंत्री उदय सामंत.

            नागपूर दि 23 : इस्माईल युसुफ महाविद्यालय ते पंप हाऊस, बिंबिसार नगर ते आरे चेक नाका जंक्शन, ओबेराय मॉल रस्ता जंक्शन ते आरे चेक नाका जंक्शन या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नागपूर अधिवेशन संपल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधी, विविध यंत्रणा यांची बैठक आयोजित करून मार्ग काढला जाईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.


            मुंबई उपनगरातील पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने सदस्य रवींद्र वायकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.


            मंत्री श्री. सामंत म्हणाले की, इस्माईल महाविद्यालय ते पंप हाऊसपर्यंतच्या सेवा रस्त्याच्या कामाकरिता मे.करगवाल कन्स्ट्रक्शन यांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी कार्यादेश दिले असून त्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे.


            या सर्विस रोडचे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण होण्यासाठी शासनाच्या वतीने कारवाई केली जाईल, तसेच बायपासचे काम चांगल्या प्रकारे होईल या दृष्टीने प्रयत्न करणार. मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या जमिनीसंदर्भात महापालिकेला सूचना दिल्या जातील. तसेच अनधिकृत बांधकामाच्या बाबत वस्तुस्थिती तपासून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री श्री सामंत यांनी सांगितले.


            पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ओबेरॉय जंक्शन ते आरे चेक नाका यादरम्यान सर्वोदय नगर येथील सेवा रस्त्यावर बेकायदेशीर उभ्या असणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या गाड्यावर मुंबई पोलीस वाहतूक विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. या मार्गावर वाहतूक विभागामार्फत गस्त करण्यात येत असून वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

भवताल’ तर्फे ‘वंडर्स ऑफ जिऑलॉजी

 भूवैज्ञानिक रचनांबाबत नेमकी माहिती नसेल तर त्याच्या कशा दंतकथा बनतात याची उदाहरणे जागोजागी पाहायला मिळतात. मात्र, ‘भवताल’ तर्फे ‘वंडर्स ऑफ जिऑलॉजी’ या इकोटूरमुळे अशा अनेक भूरचनांचा अर्थ उलगडू लागला आहे. याचे एक ठसठशीत उदाहरण पहिला बॅचमध्ये पाहायला मिळाले.


या बॅचमध्ये पालघर जिल्ह्यातून चार शिक्षक सहभागी झाले होते- किशोर काठोले, रोहिदास वाघ, पंढरीनाथ भोईर आणि कमलाकर बिरारी. त्यांनी त्या भागातील नदीत एकमेकांना समांतर जाणारे दोन खोलगट मार्ग पाहिले होते. जणू, रथाच्या किंवा गाड्याच्या चाकांमुळे तयार झालेली चाकोरी. त्यामागचे भूवैज्ञानिक कारण माहीत नसल्याने दंतकथा निर्माण झाली- तिथून अमूक देवाचा रथ गेल्यामुळे हा मार्ग तयार झाला.


या शिक्षकांनी ‘वंडर्स ऑफ जिऑलॉजी’ या इकोटूरमध्ये अशी भूरचना पाहिली. त्याच्या निर्मितीचे कारण, नेमका अर्थसुद्धा समजला. त्यावरून असे स्पष्ट झाले की याचा संबंध आपल्या भागातील भूवैज्ञानिक इतिहासाशी आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेला काळा पाषाण (बेसॉल्ट) आढळतो. त्याचे मुख्यत: आडवे थर पसरलेले आहेत. मात्र, पृथ्वीच्या पोटात असलेला लाव्हारस या खडकांमधील कमकुवत क्षेत्रं हेरून वर सरकला. तो तिथेच घट्ट झाला. त्यामुळे खडकाच्या या उभ्या भिंतीसुद्धा निर्माण झाल्या. आपल्या खडकाची निर्मिती झाली त्याला साडेसहा कोटी वर्षे उलटून गेली. एवढ्या मोठ्या कालखंडात पाऊस, प्रवाह, वारा, ऊन हे घटक, तसेच पृथ्वीच्या पोटातील हालचाली यामुळे खडकाचे वरचे थर झिजून गेले. 


परिणामी, या उभ्या भिंतींचा वरचा भाग आता पृष्ठभागावर दिसत आहेत. या भिंती बाजूच्या खडकापासून स्पष्टपणे वेगळ्या दिसतात. त्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळतात. आता या भिंतींचे भूवैज्ञानिक रहस्य उलगडल्यामुळे त्यांचा खराखुरा अर्थ या शिक्षकांना लागला. शिक्षकांच्या भूविज्ञाबाबतच्या साक्षरतेमुळे आता हा नैसर्गिक इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे.


आपण चालवत असलेल्या उपक्रमातून हे साध्य होत असेल तर त्यापेक्षा आनंद आणखी कोणता?


- अभिजित घोरपडे



--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862


/ bhavatal@gmail.com


हसा लेको

 बस स्थानकावर एक स्त्री एका पुरुषाजवळ येते आणि म्हणते,


"माफ करा सर, मी एक छोटासा सर्व्हे करत आहे, मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकते का?"


माणूस म्हणतो, "हो, हो, विचारा ना!


स्त्री: "तुम्ही बसमध्ये प्रवास करत असाल आणि एखादी महिला बसमध्ये आली आणि तिला जागा उपलब्ध नसेल तर तुम्ही तिच्यासाठी तुमची जागा सोडाल का?"


माणूस - "नाही."


स्त्री: "बसमध्ये चढलेली बाई जर गरोदर असेल तर तुम्ही तुमची जागा सोडाल का?


माणूस: "नाही."


स्त्री: "ती बाई जर एखादी वृद्धा असेल तर तुम्ही तुमची सीट द्याल का?"


माणूस: "नाही."


स्त्री: "तू एक स्वार्थी माणूस आहेस, तुझ्यात मूलभूत संस्कारही नाहीत. तु स्वतःला समजतोस तरी कोण?"


माणूस: "बस ड्रायव्हर!"


😂😂

विदर्भातील शेती आणि फळपीकांसाठी ३ हजार १०३ कोटींची नुकसान भरपाई वितरित

 विदर्भातील शेती आणि फळपीकांसाठी ३ हजार १०३ कोटींची नुकसान भरपाई वितरित


विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७५० कोटींची मदत


- मंत्री उदय सामंत.

            नागपूर, दि. २२ : विदर्भातील सतत पडणाऱ्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाने पहिल्यांदाच ७५० कोटी रुपयांची मदत दिल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

वीज कंत्राटी कामगारांना भरतीमध्ये प्राधान्य देणार

 वीज कंत्राटी कामगारांना भरतीमध्ये प्राधान्य देणार


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती.

            नागपूर, दि. 22 : महावितरण कंपनीमध्ये वर्ग-३ व वर्ग-४ संवर्गातील तांत्रिक व अतांत्रिक कामगारांची जवळपास २६,६४८ पदे रिक्त आहेत. कंत्राटी कामगारांना सेवेत थेट घेता येत नसल्याने भरती प्रक्रियेत कंत्राटी कामगारांना प्रत्येक वर्षी अधिकचे गुण देऊन प्राधान्य देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.


            वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता, प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.


            श्री. फडणवीस यांनी सांगितले की, महानिर्मिती व महापारेषण कंपनीमध्ये लाईटमन तथा तत्सम कामगारांची पदे नाहीत. मात्र राज्य शासन लवकरच महावितरणमध्ये मोठ्या प्रमाणात पदभरती करणार आहे. यामध्ये कंत्राटी कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा महामंडळाच्या पद्धतीने विमा संरक्षण देण्यात येईल. प्रत्येक वर्षी पाच गुण देऊन गुणवत्ता यादीवर येण्यासाठी प्रयत्न केले जातील.


            महानिर्मिती कंपनीमध्ये कंत्राटदाराच्या अधिनस्त अंदाजे १७,४४३ कंत्राटी कामगार कार्यरत असून महापारेषण व महावितरणमध्ये सर्वसाधारणपणे अनुक्रमे ३,९४० व २१,५५१ कंत्राटी कामगार बाह्यस्त्रोताच्या माध्यमातून काम करतात.


            महावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपनीमध्ये कामाच्या स्वरूपानुसार प्रासंगिक तसेच तात्पुरती कामे कंत्राटदाराकडून निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून करून घेतली जातात. प्रत्येक वेळेस कंत्राटदार नेमताना बाह्यस्त्रोत कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन अदा केले जाण्याची अट निविदा तसेच संबंधित कंत्राटदाराच्या कार्यादेशामध्ये अंतर्भूत केली जाते. मात्र कंत्राटदार कमी वेतन देतात, याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्याने कंत्राटी कामगारांना त्यांच्या बँक खात्यात थेट वेतन दिले जाईल. कंपनी अधिनियमानुसार किमान वेतनाप्रमाणे वेतन देण्यासाठी वेतन समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. शिवाय वीज मंडळाचे कोणत्याही स्थितीत खाजगीकरण करण्याचा शासनाचा विचार नाही, असेही एका उपप्रश्नाला उत्तर देताना श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            यावेळी झालेल्या चर्चेत सर्वश्री सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, महादेव जानकर, अनिकेत तटकरे, सचिन आहेर आणि अनिल परब यांनी सहभाग घेतला.


००



पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना

 पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना.

- शंभूराज देसाई


            नागपूर, दि. 22 : “पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. वेगावर नियंत्रण, लेन कटिंग टाळणे, अवजड वाहनांनी नियम पाळणे या बाबींकडे लक्ष देण्यात येईल”, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.


            विधानसभा सदस्य भीमराव तापकीर यांनी नियम ९४ अन्वये उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.


            ते म्हणाले, “रस्ते सुरक्षेसंदर्भात सुधारित धोरण यापूर्वीच तयार करण्यात आले आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभाग, पोलिस, महामार्ग पोलिस, राष्ट्रीय रस्ते विकास यंत्रणा यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील”. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक १७ ऑक्टोबर, २०२२ रोजी बैठक घेऊन यंत्रणेला यासंदर्भात निर्देश दिले असल्याची माहिती मंत्री श्री. शंभूराज देसाई यांनी दिली.


            “या महामार्गावर अपघात टाळण्यासाठी जे प्रयत्न करण्यात येत आहेत त्यामुळे सन २०१६ पासून अपघात संख्या आणि अपघातामुळे होणारे मृत्यू यात घट होत असल्याचे दिसून येत आहे. स्पीड गनची संख्या वाढवणे, अवजड वाहने डाव्या मार्गिके मधूनच जातील याकडे लक्ष देणे याबाबत परिवहन विभाग आणि महामार्ग पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, अधिक सुरक्षित प्रवासासाठी ज्या उपाययोजना आवश्यक आहेत त्या केल्या जातील”, असे मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi