Monday, 7 November 2022

महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान.

 महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान.

            नवी दिल्ली 07 ; आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चार परिचारिकांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. यातील मनिषा जाधव, राजश्री पाटील, अल्का कोरेकर या तीन परिचारिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


        वर्ष 2021 चे राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 50 परिचारिकांना तसेच परिचारक यांना पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार उपस्थित होत्या.


        सोलापूर जिल्ह्यातील मोरूची येथील मनिषा भाऊसो जाधव, सहायक नर्सिंग मिडवाइफरी (ANM) यांना आरोग्य क्षेत्रात 16 वर्षांचा अनुभव आहे. आतापर्यंत त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य विभागातील योजनांची प्रभावीरित्या अंमलबजावणी केलेली आहे. श्रीमती जाधव यांनी माता आणि बालकल्याण क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. क्षयरोग्यांना हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे. त्यांच्या या कामांची दखल घेत आज त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


        जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला आरोग्य सहाय्यक (एलएचवी) राजश्री तुळशीराम पाटील यांना आरोग्य क्षेत्राचा 22 वर्षाचा अनुभव आहे. श्रीमती पाटील यांचा केंद्र तसेच राज्य शासनाच्या आरोग्य योजनांमध्ये सक्रिय सहभाग असतो. श्रीमती पाटील यांना जिल्हा, राज्य पातळीवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.


        पुणे येथील राज्य ग्राम आरोग्य परिचारिका (वीएचएन) तसेच राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या निवृत्त मेट्रन अल्का कोरेकर यांनाही फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरविण्यात आले. श्रीमती कोरेकर यांनी तीन दशकांपासून अधिक काळ आरोग्य क्षेत्रात सेवा दिलेली आहे. सध्या त्या राज्य सार्वजनिक आरोग्य परिचारीका आहेत. 1989 मध्ये रायगड येथे आलेल्या पुरामध्ये तसेच लातूर येथे आलेल्या भुकंपाच्या प्रसंगी पुनर्वसन झालेल्या रूग्णांची सेवा श्रीमती कोरेकर यांनी केली आहे. सन 2018 मध्ये त्यांना युनिसेफतर्फे लसीकरणाची उत्कृष्ट अंमलबजावणी करण्याबाबत अ दर्जाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. कोविड काळात केलेल्या रूग्ण सेवांमुळे राज्य शासनाच्यावतीने विविध 4 पुरस्कार तर जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीनेही त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे.


            अंजली अनंत पटवर्धन यांनाही फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार जाहीर झाला होता. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.


महाराष्ट्राची सुपूत्री मीरा धोटे यांना फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार


            मूळ नागपूरच्या असणा-या मीरा धोटे यांनाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती धोटे या दिल्लीतील जयप्रकाश नारायण अपेक्स ट्रॉमा सेंटर, एम्स येथे उपनर्सिंग अधीक्षक होत्या. मागील 30 वर्षापासून त्या आरोग्य क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांनी नर्सिंग व्यवस्थापनात पदविका घेतलेली आहे. कोविडच्या काळात एम्समध्ये सुनियोजित पद्धतीने व्यवस्थापन करण्यात श्रीमती धोटे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. संक्रमण देखरेख, कायाकल्प, स्वच्छ भारत हे आरोग्याशी संबंधित उपक्रम राबविल्याबद्दल श्रीमती धोटे यांना अनेक प्रमाणपत्रांनी यापूर्वीही सन्मानित करण्यात आलेले आहे.  


            प्रदान करण्यात आलेले पुरस्कार वर्ष 2021 असून एकूण 50 परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वरूपात पदक, प्रशस्तीपत्र आणि 50 हजार रूपये रोख प्रदान करण्यात आले आहे. हा पुरस्कार 1973 पासून देण्यात येत आहे.


००००


 

आनंदी पहाट* *त्रिपुरारी पौर्णिमेची*

 🚩⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🚩       


           🌻 *आनंदी पहाट* 🌻


              *त्रिपुरारी पौर्णिमेची*


🚩🔱🚩🔆🪔🔆🚩🔱🚩


        *भारतीय संस्कृतीतील पौराणिक कथांमुळे सण निर्माण झालेत पण अजूनही त्याचे संदर्भ भविष्यात अधिकाधिक स्पष्ट होत आहेत.*

        *त्रिपुर.. अर्थात तीन अशी नगरे जी आकाशातही फिरू शकत होती. येथील असूर शक्तीशाली झाला. मानव.. देवदेवतानाही अर्थातच सज्जन शक्तीला त्रास देवू लागला. मग सारे शरण गेले ते शंकरांना.*

        *मानवाची चिंता परमेश्वरच करतो. चातुर्मासात भगवान विष्णूंच्या अनुपस्थितीत विश्वाचा गाडा भगवान शंकर हे चालवून मानवाला आश्वस्त करतात.*

        *मदमत्त त्रिपुरासूराने मानवाला.. देवादिकांना वेठीस धरले होते शिवाय त्याला मरणाचे भय नव्हते. त्याने तपस्येने ब्रह्मदेवाकडून अभयाचे वरदानही प्राप्त केले होते. पण तरीही सज्जन शक्तीला त्रास देणाऱ्या असूराचा अंत हा होतोच.*

        *या त्रिपुरासूर दैत्याला शंकराने आजच्याच पौर्णिमेला नष्ट केले म्हणून आज भयमुक्तीची.. आनंदाने दिवे, काकडा लावून संपन्न त्रिपुरारी पौर्णिमा.*

        *जीवनातील आनंदाचे मूळ दडलेय ते मानवी स्वभावात. लोभ.. मोह आणि अहंकार हे स्वभावातील त्रिपूर. त्यांच्यामुळे जीवनात दुःख निर्माण होत जीवन अंधकारमय होते. चांगल्या मनुष्याचाही असूर होतो. या जाणिवेसाठीच कथा आहेत.*

        *लोभ.. मोह.. अहंकार हे दैत्याचे गुण. ते वाढले की सामान्य मनुष्यही दैत्य होतो. पण हे दैत्य गुण नष्ट झाले की जीवन उजळणारच. आज दैत्य गुणांचा अर्थात अवगुण नष्ट व्हावेत म्हणून शेकडो दिवे उजळणार. मंदिरांच्या दगडी दीपमाळातीलही दिवे हा अंधार नष्ट करणार. गावगंगेत दान केलेले.. वाहात जाणारे दिवे गावोगावाचा अंधार नष्ट करणार. अंधार कितीही असू दे.. पणतीच्या या लहानश्या वातीने लाखो दिवे लागणार. लाखोंचे जीवन उजळणार.*

       *भगवान शंकराचे पुत्र कार्तिक यांचे दर्शन आज सर्वांना मिळणार. तर कोकणात आज देवदिवाळी साजरी होणार.*

         *मानवाची काळजी परमेश्वर सदैव करतो. भगवान विष्णूंच्या अनुपस्थितीत मानवाचे रक्षण केले ते भगवान शंकरांनी. आज ते पुन्हा स्वगृही कैलासी परतणार. आज या दोघांची भेट होते म्हणून आज शिवाला तुळस तर विष्णूंना बेल वाहतात.*

        *या त्रिपुरासूराला नष्ट केल्याने शंकराचे नाव पडले त्रिपूरारी. आज त्यांच्याकडे हीच प्रार्थना की या जगातील हे भयावह अंधारपर्व संपवून चराचर चैतन्याने उजळवून टाका. हे भोलेनाथा संकटाना दूर सारणारा अशी तुझी कीर्ती आहे.*


🌷🔱🌸🔆🙏🔆🌸🔱🌷


  *_शंभो, शंकरा, करुणाकरा,_*

  *_जग जागवा !_*


  *_अंधार हा लोपवा_*

  *_द्यावा प्रकाश नवा_*

  *_चराचर उजळाया चैतन्याची_* 

  *_ज्योत चेतवा, हे शिवा !_*


  *_सांब सदाशिव हे त्रिपुरारी, शंभो !_*

  *_हे भवतारक दु:ख निवारी, शंभो !_*


  *_संमार्जिली अंगणे_*

  *_पान्हावली गोधने_*

  *_आसावला आसमंत अमृताने_* 

  *_चिंब नाहवा, हे शिवा !_*


  *_सांब सदाशिव हे त्रिपुरारी, शंभो !_*

  *_हे भवतारक दु:ख निवारी, शंभो !_*


  *_तू आपदा वारणारा_*

  *_तू दु:खिता तारणारा_*

  *_होई कृपावंत, विश्वातले आर्त,_*

  *_अभयंकरा शांतवा, हे शिवा !_*


  *_सांब सदाशिव हे त्रिपुरारी, शंभो !_*

  *_हे भवतारक दु:ख निवारी, शंभो !_*


🌹🔱🌷🪔🌻🪔🌷🔱🌹


  *गीत : सुधीर मोघे* ✍

  *संगीत : सुधीर फडके*

  *स्वर : अनुराधा पौडवाल*

  *चित्रपट : थोरली जाऊ (१९८३)*


  🎼🎶🎼🎶🎼 🎧


        ‼ *ॐ नमः शिवाय* ‼

         

    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

                *०७.११.२०२२*


🌻🪔🌸⚜🔱⚜🌸🪔🌻

चलो कोलाड*

 *चलो कोलाड*

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांच्या मानवी साखळी आंदोलनात सहभागी व्हा!

🙏🙏🙏


*नमस्कार मित्रहो,*


मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त ज्येष्ठ पत्रकार मा.श्री.एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील पत्रकारांनी आंदोलन उभे करीत चौपदरीकरण करण्यास शासनाला भाग पाडले. मात्र आज ११ वर्षे काम सुरु होऊन उलटून गेल्यानंतर या महामार्गाची दुरवस्था कायम आहे. चौपदरीकरणाचे काम देखील अपूर्णच आहे. *पेण ते इंदापूर दरम्यान महामार्गावर भले मोठे खड्डे* पडले आहेत. या खड्डयांमुळे महामार्गच गायब झाला आहे. त्यामुळे सदर महामार्गावर पुन्हा मोठया प्रमाणावर अपघात होत आहेत. त्यामुळे तातडीने या महामार्गाची दुुरुस्ती करण्याची गरज आहे. आतापर्यंत राज्यकर्त्यांनी अनेकदा आश्‍वासने दिली आहेत. मात्र महामार्गाची दुर्दशा कायमच आहे. त्यामुळे सदर रस्त्याची दुुरुस्ती व्हावी या मागणीसाठी *रायगड प्रेस क्लबच्या* वतीने कोकणासह रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे *बुधवार दि.९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता कोलाड* ता.रोहा येथे महामार्गावर शांतता आणि लोकशाही मार्गाने मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार *मा.श्री.एस.एम.देशमुख सर* यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात *मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त मा.श्री.किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे* यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ पत्रकार उपस्थित राहणार आहेत. तरी आपण या आंदोलनासाठी आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त पत्रकार सदस्यांसह वेळेवर आंदोलनाला उपस्थित राहून आपल्या एकजूटीची ताकद पुन्हा एकदा निद्रीस्त शासन आणि प्रशासनाला दाखवून देऊ. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून किमान दहा ते पंधरा सदस्यांनी उपस्थिती रहावे असे आवाहन करत आहोत.

कळावे.


*बुधवार दि.९ नोव्हेंबर २०२२*

*सकाळी १०:३० वाजता*

*कोलाड ता.रोहा*


निमंत्रक :- 

*रायगड प्रेस क्लब कार्यकारिणी व सर्व सदस्य.*

दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

 दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

            मुंबई, दि. 7 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य मंत्रिमंडळाने अलीकडेच घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर मंगळवार दि. 8 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत दिलखुलास कार्यक्रम प्रसारित होईल.


००००

पायाभूत सुविधांबाबतची माहिती प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेसोबतप्राधान्याने जोडावी

 पायाभूत सुविधांबाबतची माहिती प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेसोबतप्राधान्याने जोडावी

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. 7 : प्रधानमंत्री गतीशक्ती योजना पायाभूत सुविधांच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. आपल्याकडे विविध योजनांची माहिती उपलब्ध आहे. तथापि संबंधित विभागांनी ही माहिती एका पोर्टलवर एकत्रित ठेवावी. यासाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लीकेशन सेंटरने (एमआरसॅक) सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


            प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रकल्पांची माहिती एकत्रित उपलब्ध व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, अपर मुख्य सचिव नितीन करीर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार, एमआरसॅकचे संचालक डॉ. ए.के.जोशी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, राज्यात पायाभूत सुविधांसह विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांना प्रधानमंत्री गती शक्ती योजनेशी जोडण्यासाठी त्या प्रकल्पांची माहिती एकत्रितपणे पोर्टलवर ठेवणे गरजेचे आहे. यादृष्टीने नियोजन करून तातडीने ही सर्व माहिती अपलोड करण्यात यावी. सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासाठी प्राधान्याने पुढाकार घ्यावा. तसेच एमआरसॅकला ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.


00000

राज्यातील प्रस्तावित विकास प्रकल्पांना आशियाई विकास बँकेने निधी उपलब्ध करून द्यावा

 राज्यातील प्रस्तावित विकास प्रकल्पांना

आशियाई विकास बँकेने निधी उपलब्ध करून द्यावा

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. 7 : राज्यातील विकास प्रकल्पांना एशियन डेव्हलमेंट बँकेचे मोठे सहकार्य लाभत आहे. तसेच सहकार्य करत राज्यातील प्रस्तावित विकास प्रकल्पांना निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेच्या संचालक मंडळाला केले.


            एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (एडीबी) कार्यकारी संचालक मंडळाच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत एडीबीच्या प्रतिनिधी मंडळासह राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, संबंधित विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, ‘देशाच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 50 टक्के आहे. राज्य शासनामार्फत सामाजिक आणि आर्थिक विकासाचे विविध प्रकल्प राबविण्यात येत असून ग्रामीण भागात विकासाचे आणखी प्रकल्प राबविण्याची आवश्यकता आहे. वातावरणीय बदल आणि अनिश्चित पाऊस यामुळे कृषी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानावर परिणाम होत आहे. कृषी क्षेत्रात शाश्वतता आणण्यासाठी ज्या भागात अधिक पाऊस पडतो त्या भागातील पाणी, नदीजोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे कमी पावसाच्या भागात वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल. 


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कॉप 26 परिषदेत केलेल्या आवाहनानुसार राज्य शासन प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत असल्याचे, उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले. याचाच एक भाग म्हणून परिवहन विभागांतर्गत पारंपरिक इंधनावर चालत असलेल्या बसेस ग्रीन आणि स्वच्छ इंधनावर परिवर्तित केल्या जाणार आहेत. एडीबीच्या सहकार्याने शासनाचे मेट्रो प्रकल्प देखील सुरू आहेत. या दोन्ही प्रकल्पांमध्ये यापुढे देखील एडीबीचे सहकार्य अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.


            ऊर्जा क्षेत्रात राज्य महत्त्वपूर्ण योजना राबवित असून शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज मिळावी यासाठी सौर उर्जेवर फिडर चालविण्यात येणार आहेत. यामुळे वीज उपलब्ध होण्याबरोबरच पर्यावरण रक्षणाला देखील लाभ होईल असे सांगून राज्याचे महत्वाकांक्षी प्रकल्प तातडीने मार्गी लागावेत यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील वॉर रूम मध्ये निर्णय घेतले जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी एडीबीच्या प्रतिनिधींना दिली. राज्याच्या विकासाचे आणि पर्यावरणपूरक असे हे सर्व प्रकल्प दर्जेदारपणे आणि वेळेत पूर्ण केले जातील, असे सांगून राज्याच्या प्रस्तावित प्रकल्पांना एडीबीने निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


            यावेळी जलसंपदा, परिवहन, ऊर्जा विभागांमार्फत प्रस्तावित महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत सादरीकरण करण्यात आले.


00000

दिव्य दिवाळी


 

Featured post

Lakshvedhi